कोल्हापूर शहरातील कचऱ्याच्या प्रश्नाने गंभीर रुप धारण केले आहे. कसबा बावडा परिसरातील झूम प्रकल्पस्थळावर कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. महापालिकेने कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याचे ठरविले. पुणे येथील कंपनीला याचा ठेका दिला. या प्रकल्पाला मंजुरी देऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला. पण अद्याप वीज निर्मिती प्रकल्प कागदावरच आहे. महापालिकेला संबंधित कंपनीला प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देता आलेली नाही. दुसरीकडे शहरात रोज १७० टनाहून अधिक कचरा निर्माण होत आहे. हा कचरा टाकायचा कुठे? असा प्रश्न उभा आहे.
घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प हा ३० कोटींचा आहे. पुणे येथील रोकेम कंपनीने घनकचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला होता. कसबा बावडा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरातील चार एकर जागा कंपनीसाठी आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला निधी गुंतवावा लागणार नाही. प्रकल्पाचा संपूर्ण खर्च कंपनी करणार आहे. रोकेम कंपनी आणि महापालिकेत फेब्रुवारी २०१४ मध्ये यासंदर्भात करार झाला. कंपनीला प्रकल्प उभारणीसाठी चार एकर जागा आवश्यक आहे.पण महापालिकेने कंपनीला जागा उपलब्ध करून दिली नाही. कसबा बावडा रोडवरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला दोन एकर जागा मोकळी करून देण्याच्या हालचाली झाली. जागा तयार करण्यात आली. पण कालांतराने त्या जागेवरही कचऱ्याचे डोंगर तयार झाले.
तत्कालिन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या कालावधीत कचरा टाकण्यासाठी शहरातील विविध जागांचा शोध घेण्याच्या हालचाली झाली. बिदरी यांनी चारही विभागीय कार्यालयांना जागांचा शोध घेण्याचे आदेश दिले. मात्र प्रशासकीय पातळीवरून त्या संदर्भात कसल्याच हालचाली झाल्या नाहीत. महापालिकेच्या मलकीची पुईखडी परिसरात चार एकर जागा आहे. त्याठिकाणी कचरा टाकण्याचे निश्चित करण्यात आले. पण, स्थानिक राजकारण समोर ठेवून लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध केला. सर्वसाधारण सभेत हा विषय मांडण्यात आला. मात्र, सभागृहाने पुईखडी येथील जागा कचरा टाकण्यासाठी देण्यास सहमती दिली नाही. हा विषय नामंजूर केला गेला.
घनकचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी रोकेम कंपनीला सध्याच्या प्रकल्पाला लागून पाच एकरची जागा उपलब्ध केली आहे. प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीबाबतचा प्रस्तावही सादर केला आहेत. टोप येथील खणीची महिनाभरात मोजणी होईल. त्यानंतर डीपीआर तयार केला जाणार आहे.
- डॉ. विजय पाटील मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिका
शहरात रोज १७० टनाहून अधिक कचरा तयार होतो. नोव्हेंबर २०१३ मध्ये रोकेमच्या पुण्यातील प्रकल्पाची पाहणी सर्वसाधारण सभेत (डिसेंबर २०१३) प्रस्तावाला मंजुरी वीज निर्मितीसाठी चार एकर जागेची गरज १८ महिन्यांत प्रकल्प कार्यान्वित करण्याविषयी करार राष्ट्रीय हरित लवादने टोप येथील खणीचा निकाल महापालिकेच्या बाजूने दिला येथे इनर्ट मटेरियल टाकण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट