Anuradha.Kadam@timesgroup.com
कोल्हापूरः महापालिका निवडणुकीत आपापल्या पक्षातर्फे उमेदवार ठरवण्यापासून ते महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागातील महिला उमेदवारांच्या नावाची निश्चिती करण्यासारख्या महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या पक्षाच्या कोअर कमिटीत महिला नेत्यांनाच नो एन्ट्री असल्याचे चित्र आहे.
महिलांनी राजकारणात यावे यासाठी सरकारने ५० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र केवळ शोभेच्या बाहुल्या म्हणून नव्हे तर सक्षम लोकप्रतिनिधी घडाव्यात यासाठी महिलांना राजकारणात प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला पक्षनेत्यांकडूनच तिलांजली देण्याचा प्रकार या प्रवृत्तीमुळे वाढत आहे. कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी आणि नेता अशा टप्प्याने महिलांची राजकारणात प्रगती होणे अपेक्षित असताना पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत महिला नेत्या आणि महिला पदाधिकाऱ्यांना जमेतच न धरले जाणे हे एकतर्फी कारभाराचे द्योतक असल्याचे निदर्शनास येत आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदाही सर्व प्रभागांमधून इच्छुक महिला उमेदवारांनी रिंगणात पाऊल टाकले आहे. यावर्षी ८१ प्रभागांपैकी ४१ प्रभाग हे महिलांसाठी राखीव आहेत. नगरसेवकांच्या बरोबरीने नगरसेविका महापालिका सभागृहात जाणार आहेत. यावर्षी भाजप शिवसेना युती नसल्यामुळे या दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र उमेदवार जाहीर होणार आहेत. तर काँग्रेसनेही स्वबळावर महापालिका निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यामुळे काँग्रेसकडून ४१ महिला उमेदवारांची निवड करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. महापालिकेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या ताराराणी आघाडीनेही आपल्यावतीने महिला उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी चंग बांधला आहे. तर राष्ट्रवादीच्या कोट्यातूनही महिला उमेदवारांची नावे निश्चित करण्याची लगीनघाई सुरू आहे. आजी माजी नगरसेवकांनी महिला आरक्षित प्रभागात आपल्या कुटुंबातील महिलांची वर्णी लावण्यासाठी नेत्यांशी संपर्कयंत्रणा वाढवली आहे.
प्रत्येक पक्षात महिला उमेदवारांच्या निवडीवर विशेष चर्चा होत आहेत. त्यासाठी पक्षनेत्यांनी कोअरकमिटी तयार केली आहे. मात्र या कोअर कमिटीमध्ये पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष यांना समाविष्ट करून घेतलेले नाही. महिला नेत्यांकडून नाराजी ओढवली जाऊ नये यासाठी नेत्यांकडून एखादा फोन केला जातो मात्र इच्छुकांकडून आलेल्या मागणीवर विचार करण्यासाठी, उमदेवारांची सक्षमता तपासण्यासाठी होणाऱ्या चर्चेत मात्र कोअरकमिटीच्या बैठकीपासून महिला नेत्यांना लांबच ठेवले जात आहे. हे चित्र सध्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या प्रमुख चारही पक्षांमध्ये सारखेच आहे. ज्या प्रभागात महिला आरक्षण आहे त्या प्रभागातील इच्छुक महिला उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठीही महिला नेत्यांना जमेत धरले जात नाही.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, भाजपचे महानगराध्यक्ष महेश जाधव, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष आर. के. पोवार, आदिल फरास, राजू लाटकर, तर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आदी नेतेच इच्छुकांच्या उमेदवारी निश्चितीबाबत कोअर कमिटीमार्फत निर्णय घेत आहेत. या पक्षातील कुणीही महिला नेत्या व पदाधिकाऱ्यांना या समितीमध्ये स्थान नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट