जान्हवी सराटे, कोल्हापूर
टी.व्ही., इंटरनेट, मोबाइल अशा सोशल मीडियाच्या साधनांचा मुलांवर अतिरेकी प्रभाव झाल्यामुळे पालक व विद्यार्थी यांच्यातील संवाद कमी होत चालला आहे. परिणामी मुलांमधील ताणतणावाच्या कारणामुळे आत्महत्या वाढत आहेत. जिल्ह्यात अल्पवयीन मुला-मुलींनी केलेल्या आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. याबाबत आभास फाउंडेशनने केलेल्या अभ्यासात गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील ५७ मुला-मुलींनी वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्येचा मार्ग निवडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे रोखण्यासाठी आभास संस्थेच्यावतीने 'संवाद' उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मुलांच्या गरजांचा विचार न करता पुरवल्या जाणाऱ्या सुविधा, पैशाला दिले जात असलेले अतिमहत्त्व, चंगळवाद यासह क्षमता लक्षात न घेता मुलांबाबत पालकांकडून ठेवल्या जात असलेल्या अवास्तव अपेक्षा यामुळेही मुले तणावग्रस्त बनत आहेत. अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या हा विषय समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे, तसेच समाजानेही यासंदर्भात आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अशी मुले बालवयात आत्महत्येसारखा पर्याय निवडतात हे गंभीर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रौढ व्यक्तींनी केलेल्या आत्महत्यांची संख्या ७६४ असून, अल्पवयीन मुला-मुलींच्या आत्महत्यांची संख्या ५७ आहे. २०१३ आणि २०१४ या दोन वर्षांत एकूण ८२१ व्यक्तींच्या आत्महत्या नोंदवलेल्या आहेत. या एकूण प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण सात टक्के आहे.
आभास फाउंडेशनने केलेल्या सर्व्हेमध्ये औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुलांसोबत संवाद वाढविण्यासाठी पालकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी संस्थेच्यावतीने शालेय आणि महाविद्यालयातील तणावग्रस्त मुला-मुलींसाठी अभिव्यक्तीचे व्यासपीठ 'संवाद' या उपक्रमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये अभिव्यक्तीचा स्वीकार, समुपदेशन, समन्वय आणि मार्गदर्शन या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात रविवारपासून करण्यात आलेली आहे.
करवीरमध्ये जास्त प्रमाण
अल्पवयीन मुलांच्या सर्वाधिक आत्महत्येच्या घटना करवीर तालुक्यात घडल्या असून, त्यांची संख्या २८ आहे. त्यापाठोपाठ गडहिंग्लज ८, शाहूवाडी ६, इचलकरंजी परिसरात ५, राधानगरी २, पन्हाळा ३, भुदरगड ३ अल्पवयीन मुला-मुलींनी आपले जीवन संपवले आहे. गगनबावडा तालुक्यात अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण शून्य नोंदलेले आहे.
मुलांच्या मनात अनेक प्रश्न घोंघावत असतात. त्यांना व्यक्त होऊ द्यायला हवे. अन्यथा ते मनाला मान्य होईल असा मार्ग निवडतात. यामध्ये आत्महत्येसारखा पर्यायही निवडला जाऊ शकतो. म्हणून मुलांशी संवाद वाढविण्यासाठी पालकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
- प्राजक्ता देसाई, सचिव, आभास फाउंडेशन
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट