अजय जाधव, जयसिंगपूर
पावसाने दडी मारल्याने शिरोळ तालुक्यात कोंडिग्रे, जैनापूर, चिपरी, धरणगुत्ती,संभाजीपूर, तमदलगे, चिपरी परिसरात विहिरी व कूलनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. तालुक्यात एक जूनपासून केवळ १२१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने याचा माळरानातील पिकांना फटका बसला आहे. तालुक्यात अन्य ठिकाणी मात्र पिकांना कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांवरील पाणी योजनांनी आधार दिला आहे.
शिरोळ तालुक्यातील शेतीचे बहुतांशी क्षेत्र बागायती आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात असणाऱ्या या तालुक्यात सरासरी ३८५.३० इतके वार्षिक पर्जन्यमान आहे. यावर्षी एक जूनपासून केवळ १२१ मिलीमीटर इतकाच पाऊस पडला आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पावसाचे पाणी कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांद्वारे येथील शेतीला मिळते. यामुळेच शिरोळ तालुक्यात ३० हजार, ६८५ हेक्टर पेर क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्र बागायत आहे. यापैकी २७ हजार, ७७० हेक्टर क्षेत्रात ऊस आहे. सोयाबीन, भुईमूग, टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबीसह अन्य फळ व पालेभाज्यांचे उत्पादन येथे घेतले जाते.
यंदा मान्सूनपुर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मशागती करून पेरणी केली. पेरणीनंतर दमदार पाऊसही झाला. परिणामी पिकांची उगवण चांगली झाली. भुईमूग, सोयाबीन यासह अन्य पिके तरारून आली. मात्र यानंतर पावसाने पाठ फिरविल्यामुळे शिरोळ तालुक्यात कोंडीग्रे, तमदलगे, चिपरी, धरणगुत्ती, जैनापूर परिसरात पिकांची वाढ खुंटली. अनेक ठिकाणी पिके कोमेजून गेली. पावसाअभावी विहीरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. तालुक्यातील ऊस पिकाला मात्र नदीवरील पाणी योजनांनी आधार दिला आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील दमदार पावसामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठची पिके पाण्याखाली गेली होती. गेल्या दीड महिन्यात पाऊस थांबल्याने नद्यांच्या पातळीत घट झाली. बुधवारी तालुक्यात अंकली पूलाजवळ कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी केवळ तीन फूट आठ इंच इतकी होती. नृसिंहवाडी येथे २२ फूट, राजापूर बंधाऱ्याजवळ ११ फूट पातळी होती. तर पंचगंगेची पातळी तेरवाड बंधाऱ्याजवळ ३५ फूट ५ इंच इतकी होती. पावसाने आणखी ओढ दिल्यास ही पातळी कमी होण्याची शक्यता आहे. सध्याचे पाणी पुरेसे असले तरी आगामी काळात िपकांना पाणी देण्यासाठी असलेल्या मोटरना पाणी मिळणे शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.
पावसाने दडी मारल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतातील विहिरी व कूपनलिकांची पातळी खालावली आहे, परिणामी पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. पिके धोक्यात आली आहेत.
- भास्कर शिंदे, शेतकरी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट