म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी तब्बल दोन महिन्यानंतर विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली. पथकाचे प्रमुख म्हणून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय कुमार काम पाहणार आहेत. दरम्यान, एसआयटीच्यावतीने पुण्यातील पथक शुक्रवारी कोल्हापुरात तपासासाठी येणार आहे. पानसरे हत्येच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करून तपासाची माहिती नियमित कोर्टाला द्यावी, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांच्यावतीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी होण्यापूर्वीच राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे.
संजय कुमार यांनी बुधवारी कोल्हापुरात बैठक घेतली. तपासात प्रगती नसल्याबद्दल कोल्हापूर पोलिसांची चांगलीच कानउघाडणी केली. गेल्या दोन महिन्यांत पानसरे हत्येच्या तपासात कोल्हापूर पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी परजिल्ह्यातील पोलिसांनी पोलिस महासंचालकांकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एसआयटीचे प्रमुख संजय कुमार यांनी कोल्हापूर पोलिसांना तपासासाठी एसआयटीला माहिती देण्याचे आणि सहकार्याचे आदेश दिले आहेत. एसआयटीकडून पुन्हा कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, पानसरे कुटुंबीयांचे जबाब तपासासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. तपासाचा अहवाल रोज एसआयटीला देण्याचे बंधनकारक केले आहे.
दरम्यान, पानसरे हत्येचा तपास गेली दोन महिने कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक रितेश कुमार यांनी केला होता. हत्येच्या तपासासाठी २७ पथके कार्यरत आहेत. रितेशकुमार यांनी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक जिल्ह्यातील २० पोलिस अधीक्षकांची संयुक्त बैठक बोलावून तपासासाठी पुढाकार घेतला होता. तपासाला वेग आला असताना अचानक रितेशकुमार यांची बदली करण्यात आल्याने डाव्या चळवळीतील पक्षांनी राज्य सरकारचा निषेधही केला आहे.
दरम्यान, मुंबई हायकोर्टात अॅड केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली असून, पानसरे हत्येचा तपास सीबीआयने करावी अशी मागणी केली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू असताना पानसरे यांची कन्या स्मिता सातपुते व सून मेघा यांनीही एसआयटीची मागणी केली होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट