म. टा. वृत्तसेवा चंदगड
पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील एव्हीएच कंपनीवर शनिवारी संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये कंपनीची व क्वार्टर्सची नासधूस करुन पेटवून दिले. यामध्ये कंपनीच्या ३५ दुचाकी, १५ चारचाकी गाड्या, ७ टँकर, जनरेटर,१० विविध कार्यालये,१०० संगणक, फर्निचर, ५० वातानुकुलित संच, ५ सायकली, संरक्षक भिंत, इलेक्ट्रीक साहित्य, सुरक्षा रक्षकांची केबीन आगीच्या भक्षस्थानी पडली. सुमारे २५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी या परिसरात पोलिसांनी बंदी आदेश लागू केला आहे.
पोलिसांकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. सुरक्षेसाठी राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या होत्या. कंपनीमध्ये शिरुन कंपनीची मोडतोड व जाळपोळ केल्याप्रकरणी डॉ. नंदा बाभूळकर, अॅड. संतोष मळविकर, रामराजे कुपेकर, संजय नाईक, शिवाजी सावंत, सुभाष देसाई, रवि नाईक यांच्यासह ५०० आंदोलकावर चंदगड पोलिसांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
एव्हीएच प्रकल्प हा मानवी आरोग्य व पर्यावरणाला हानी पोहोचविणारा प्रकल्प असल्याने तालुक्यातील जनतेतून त्याला तीव्र विरोध आहे. हा प्रकल्प अन्यत्र हलवावा अशी मागणी जनतेची आहे. यासाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे, उपोषणे व न्यायालयीन लढाई सुरुच होती. मात्र सरकारी यंत्रणा व प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेतल्या नाहीत. प्रकल्पाला दोनदा स्थगिती देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात हा आदेश कंपनीपर्यंत पोहोचविण्याच्या अगोदरच स्थगिती उठत होती. त्यामुळे लोकांच्यामध्ये प्रचंड असंतोष होता.जनतेच्या आंदोलनाला केवळ आश्वासनापलिकडे काहीही मिळाले नाही. त्यामुळे लोकांनी चिडून शनिवारी आपला राग कंपनीवर दगडफेक करुन, वहाने जाळून, एव्हीएच कर्मचाऱ्यांना मारहाण करुन हिंसक पध्दतीने व्यक्त केला. प्रदूषण मंडळाच्या सूर्यकांत डोके व मनिष होळकर या अधिकाऱ्यांना तब्बल साडेपाच तास कोंडून ठेवले.
दरम्यान, रविवारी दुपारी एव्हीएच प्रकल्पस्थळी पोलिस महानिरिक्षक राकेश कुमार यांनी भेट देवून परिस्थितीची पाहणी करत तपासाबाबत सूचना केल्या. तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांनी स्थगितीचा आदेश कंपनीला लागू केला. एव्हीएच कंपनीची वाहने जाळून कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कंपनीचे सुरक्षा अधिकारी महादेव मनोहर काळे यांनी डॉ. नंदा बाभूळकर, अॅड. संतोष मळविकर, रामराजे कुपेकर, संजय नाईक, शिवाजी सावंत, सुभाष देसाई, रवि नाईक यांच्यासह ५०० आंदोलकांविरुध्द फिर्याद दाखल केल्याने आंदोलकावर गुन्हा नोंद केला आहे. कॉन्स्टेबल मारुती टिकारे यांनी आंदोलकांनी दगडफेक करुन स्वतःसह पो. नि. माळके, स. पो. नि. हंडे, स. पो. नि. पटेल यांना जखमी केल्या प्रकरणी आंदोलकांविरुध्द फिर्याद दिली आहे. बंदी आदेश असताना आदेशाचा भंग करुन ३०० ते ४०० लोकांनी आंदोलन करुन जाळपोळ केल्याप्रकरणी या आंदोलकावर कॉन्स्टेबल संग्राम पाटील यांनी फिर्याद दिल्याने गुन्हे नोंद केले आहेत. आंदोलकावर १४३/१४७ कलमानुसार तीन वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहेत. पोलिस निरीक्षक अंगद जाधवर, पोलिस उपनिरिक्षक शरद माळी व पी. एन. घोडके तपास करीत आहेत.
परिसरात तणावपूर्ण शांतता
दरम्यान, रविवारी पाटणे फाट्यावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कंपनीचा आवार व फाट्याला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. पाटणे फाट्यावर तणावपूर्ण शांतता होती. पोलिस यंत्रणेकडून पंचनाम्याचे काम सुरुच होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट