म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'सत्य परमात्म्याची ओळख करून जेव्हा आपण निराकार प्रभूशी आपले नाते जोडतो तेव्हा सर्वत्र चैतन्य दिसू लागते. हीच आमची ओळख बनून जाते आणि अवघे जग विश्वबंधुत्वाच्या भावनेने ओतप्रोत दिसू लागते. सत्य परमात्म्याची ओळख व ज्ञानामुळे जीवनात उज्ज्वलता येते आणि जगाशी सद्व्यवहार करू लागतो,' असे मत सद्गुरू सुदिक्षा महाराज यांनी व्यक्त केले. संत निरंकारी मंडळतर्फे हरियाणा येथील समालखा येथे ७२ व्या वार्षिक निरंकारी संत समागमचे आयोजन केले होते. तीन दिवसीय संत समागममध्ये देश, विदेशातून लाखो भाविकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून सुमारे एक लाख भाविकांचा सहभाग होता. याप्रसंगी बोलताना सुदिक्षा महाराज म्हणाल्या, 'सुखदुखाच्या पलीकडे जाऊन सहज अवस्थेमध्ये आनंदमय जीवन जगण्याचे नाव भक्ती होय. सत्याचा बोध झाल्यानंतर ईश्वराची जाणीव ठेवून आपले प्रत्येक काम करू लागतो. मनामध्ये ईश्वराच्या प्रति कृतज्ञतेचा भाव बाळगतो.' संत निरंकारी मिशनच्या ९० वर्षांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकताना सद्गुरू सुदिक्षा यांनी 'मिशनच्या प्रारंभी संदेशवाहकांनी भौतिक साधनांचा अभाव आणि विपरित परिस्थितीचा सामना करत मानवकल्याणासाठी संकल्प राहून आपले जीवन समर्पित केले.'असे नमूद केले. संत समागमच्या कार्यक्रमात शोभायात्रा काढण्यात आली. तसेच मुख्य निरंकारी प्रदर्शन, बाल प्रदर्शन, स्वास्थ प्रदर्शन लोकांच्या आकर्षणाचे ठरले. नागरिकांसाठी आरोग्य शिबिर भरविले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट