गेल्या आठ महिन्यांतील आकडेवारी, आहारातील दुर्लक्षाचा बाळाच्या वाढीवर परिणाम Sachin.patil1@timesgroup.com Tweet-sachinpMT सर्वसामान्यांचा आधारवड असलेल्या सीपीआरमधील प्रसूती विभागात गेल्या आठ महिन्यात जन्मलेली ७६६ बालके कमी वजनाची असल्याची धक्कादायक माहिती निदर्शनास आली आहे. गरोदर मातांच्या आरोग्यासह आहाराकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे बालकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या सप्ताहात देशभरात आहाराविषयी जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. गरोदर मातांना रोजच्या आहारातून शरीरास आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांची पूर्तता होणे आवश्यक असते. कारण त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होत असतो. अनेकदा महिलांच्या आहाराविषयी सजगता बाळगली जात नाही. मातेला सकस आहार मिळाल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढून इतर आजारांशी मुकाबला करण्याची तिच्या शरीराची शक्ती वाढत असते. प्रत्येक वयोगटानुसार आहाराच्या पद्धतीत बदल होत असतात. विशेषतः लहान मुले, गरोदर महिलांना सकस आहाराची नितांत आवश्यकता असते. गरोदर मातांच्या आहाराकडे दुर्लक्ष झाल्यास बाळाची वाढ पुरेशी होत नाही. त्यामुळे भविष्यात त्या बालकाला विविध आजारांसह व्यंगाला सामोरे जावे लागते. तसेच नैसर्गिक प्रसुतीत अडथळे निर्माण होतात. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गरोदर मातांच्या आरोग्याचे प्रश्न दुर्लक्षित केले जातात. .......... गैरसमजाचे प्रमाण अधिक शहरासह विशेषतः ग्रामीण भागातील महिलांमध्ये अनेक गैरसमज रुजलेले असतात. त्यामध्ये कॅल्शियम तसेच लोहाच्या गोळ्या गर्भवती मातेने घेतल्यास बाळाचे वजन वाढेल व सिझर करण्याची वेळ येते असे गैरसमज पसरवले जातात. त्यामुळे महिला अशा गोळ्यांकडे दुर्लक्ष करतात. त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो. मुख्यत: कॅल्शियम तसेच लोहाच्या गोळ्यांचा बाळावर कोणताही परिणाम होत नाही. .......... कुटुंबीयासह महिलांनी घ्यावी विशेष काळजी गरोदरपणात महिलांना लोहयुक्त आहार मिळेल याकडे कुटुंबियांनी लक्ष देणे गरजेचे असते. अजूनही ग्रामीण भागात पुरुषांच्या जेवणानंतर महिला जेवण करतात. गरोदरपणाच्या कालावधीत महिलांच्या आरोग्याकडे जास्तीचे लक्ष देणे गरजेचे असते. त्यांच्या आहारात पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, ड्रायफ्रूट, गुळ, शेंगा आदींचा समावेश असणे महत्वाचे ठरते. याबरोबरच डॉक्टरांकडून वेळोवेळी विविध तपासण्या करणे गरजेचे असते. कोल्हापूर जिल्ह्यात काविळीचे प्रमाण अधिक आढळते. त्यामुळे पाणी उकळून पिण्यावर महिलांनी भर देणे आवश्यक आहे. ............................ पॉईंटर आहारातील दुर्लक्षाचा परिणाम मुदतपूर्व प्रसुतीचा धोका बाळाच्या वाढीवर परिणाम कमी, तीव्र कमी वजनाचे बाळ बाळाला शारीरिक व्यंगाची शक्यता .......................... नैसर्गिक प्रसूती-३५२७ सीझर प्रसूती- १४१४ (सीपीआरमधील १ जाने. ते १ ऑगस्ट १८ ची आकडेवारी) ....................... कोट 'सामान्यतः जन्मलेल्या बालकाचे वजन किमान अडीच ते तीन किलो हवे. यासाठी गरोदरपणात मातेच्या सत्वयुक्त आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असते. आहाराकडे व आरोग्याच्या समस्येकडे झालेल्या दुर्लक्षामुळे बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. यासाठी कुटुंबीयांनी गैरसमज टाळून गरोदर मातांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. महिलांनी व्यसने तसेच तणाव टाळावा. जास्तीत जास्त आनंदी वातावरणात राहण्याचा प्रयत्न करावा. डॉ. प्रज्ञा पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट