तीन सिंगल फोटो
...................
अपहरण करून खंडणी उकळणारे तिघे अटकेत
गुंड योगेश राणे टोळीचे कृत्य
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कन्सलटन्सीचे काम करणाऱ्या व्यक्तीचे अपहरण करून त्याच्याकडे २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. ३० एप्रिलला कळंब्यातील साई मंदिरापासून विजय निवृत्ती कांबळे (वय ३८, रा. निगवे खालसा, ता. करवीर) यांचे अपहरण झाले होते. विशेष म्हणजे कांबळे याच्या गावातील मित्रानेच कोल्हापुरातील कुख्यात गुंडाला माहिती देऊन अपहरण आणि खंडणीचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले.
जुना राजवाडा पोलिसांनी याप्रकरणी अपहरणकर्ते गुंड योगेश बाळासो राणे (३४, रा. शाहूपुरी, ५ वी गल्ली), आकाश आनंदा आगलावे (२५, मु. न्हाव्याचीवाडी, पो. शेळोली, ता. भुदरगड) आणि मारुती मधुकर कांबळे (२९, रा. निगवे खालसा, ता. करवीर) या तिघांना अटक केली.
करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील विजय कांबळे हे बँकांकडून कर्ज प्रकरणे मंजूर करून देण्याचे काम करतात. गावातील मित्र मारुती कांबळे हादेखील त्यांच्यासोबत काम करीत होता. मारुती कांबळे याचा कोल्हापुरातील काही कुख्यात गुडांशी संपर्क आहे. 'विजय कांबळे याच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्याचे अपहरण केले तर २५ लाखांची खंडणी उकळता येईल,' अशी माहिती मारुती कांबळेने आकाश आगलावे याला दिली. यानंतर कांबळे, आगलावे आणि योगेश राणे यांनी मित्रांच्या मदतीने विजय कांबळे यांचे अपहरण करण्याचा कट रचला. ३० एप्रिलला त्यांच्या मोबाइलवर फोन केला. 'भावाच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याने आम्हाला कर्ज मंजूर करून द्या. तुमचे असेल ते कमिशन घ्या,' असे सांगत विजय कांबळे यांना कळंब्यातील साई मंदिराजवळ भेटण्यासाठी बोलवले. त्याच दिवशी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सात ते आठजण कांबळेंना भेटले. बोलत-बोलत त्यांना इनोव्हा कारमध्ये बसवले. यानंतर त्यांनी कांबळेंना दमदाटी करण्यास सुरुवात केली.
'तू अनेकांना कर्ज मंजूर करून मोठे कमिशन मिळवतोस. आम्हाला आत्ताच २५ लाख रुपये दे. नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी देऊन त्यांना स्टीलच्या पाइपने बेदम मारहाण केली. यानंतर आयटीआय कॉलेज, पाचगाव रोड, आर.के. नगर, भारती विद्यापीठ, चित्रनगरी, गोकुळ शिरगाव, फाईव्हस्टार एमआयडीसीत फिरवले. पुन्हा त्याच मार्गाने येऊन ते कळंबा जेलच्या बाजूस थांबले. दरम्यान, अपहृत विजय यांना त्यांच्या मोबाइलवरून घरी फोन करण्यास सांगितले. यावरून घरात असलेली रक्कम आणि सोन्याचे दागिने मागवून घेतले. ५ हजार रुपये रोख आणि दागिने मिळाल्यानंतर त्यांनी गुजरीतील एका सराफाकडे ७८ हजार ५०० रुपयांना दागिन्यांची विक्री केली. सायबर चौकात एका एटीएम सेंटरमधून त्याला पैसे काढण्यासाठी दमदाटी केली. सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल मिळाल्यानंतर गुंडानी रात्री साडेअकराच्या सुमारास विजय कांबळे यांना सोडून दिले.
विजय कांबळे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांकडून संशयित अपहरणकर्ते आणि इनोव्हाचा शोध सुरू होता. गुन्ह्यातील कार शाहूपुरीतील सराईत गुंड योगेश राणे याची असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयित राणे याच्यासह मारुती कांबळे आणि आकाश आगलावे या तिघांना शुक्रवारी (ता. ८) अटक केली. मारुती कांबळे आणि विजय कांबळे हे दोघे एकत्र कन्सलटन्सीचे काम करीत होते. काही कारणावरून दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर दोघे स्वतंत्र काम करू लागले. या रागातून मारुती याने विजयला त्रास देण्यासाठी अपहरण आणि खंडणीचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अन्य पाच संशयितांचा शोध सुरू आहे. तीन संशयितांना कोर्टात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल गुजर, पोलिस नाईक समीर मुल्ला, अमर आडुळकर, सचिन देसाई, हवालदार राजाराम पाटील, आदींच्या पथकाने अपहरणकर्त्यांना अटक केली.
चौकट
राणे कुख्यात गुंड
पोलिसांनी अटक केलेला योगेश राणे हा रेकॉर्डवरील सराईत गुंड आहे. त्याच्यावर खंडणी, मारामारी, अपहरण, फसवणूक, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे असे १३ गुन्हे दाखल आहेत. शाहूपुरी, जुना राजवाडा, हातकणंगले, भुदरगड तसेच सातारा जिल्ह्यातील कराड पोलिस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. वाळू तस्करीतही त्याचा सहभाग होता.
................
चौकट
कारवाईस विलंब
विजय कांबळे यांच्या अपहरणाचा गुन्हा ३० एप्रिलला घडला. यानंतर कांबळे यांनी तातडीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यास मात्र पोलिसांना सव्वा महिना लागला. या गुन्ह्यातील केवळ तीनच संशयित अटकेत आहेत. अद्याप पाच संशयित मोकाट आहेत. कारवाईस झालेल्या विलंबाबत मात्र पोलिसांनी मौन बाळगले. राणे याची काही पोलिसांशी विशेष जवळीक आहे.