आरोग्याबाबत सजग राहा, रक्तदाब टाळा ००००० उच्च रक्तदाबाच्या रुग्णांतील संख्येत अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, पूर्वी पन्नाशीनंतर आढळणारा हा विकार आता पंचविशीत आला आहे. तरुण पिढीतील रक्तदाबाचे प्रमाण लक्षणीयरीत्या असून, त्याबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. आज जागतिक रक्तदाब दिन. यानिमित्त (वर्ल्ड हायपरटेन्शन डे) डॉ. प्रल्हाद केळवकर यांच्याशी सचिन पाटील यांनी साधलेला संवाद. ०००० कोणत्या वयोगटात रक्तदाबाचे प्रमाण अधिक आहे? पूर्वी रक्तदाब पन्नाशीनंतर जाणवायचा, पण आता बदलत्या जीवनशैलीमुळे १९ वर्षांच्या तरुणांतसुद्धा तो आढळतो. अनेकदा आपल्याला ब्लडप्रेशरची समस्या आहे याची जाणीवही कित्येकांना नसते. उच्च रक्तदाबात जाणवणारी लक्षणे इतर रोगांसारखी आढळल्याने त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. गेल्या १० वर्षांत रक्तदाबातील वयाचा आलेख खाली घसरतो आहे. अगदी तिशीच्या आतील रुग्णांची संख्या मोठी आहे. काही तरुण या वयात मला कसा काय रक्तदाब? असा प्रश्न उपस्थित करतात, पण आता ही वस्तुस्थिती बनली आहे आणि ती स्वीकारून पुढे जाणे गरजेचे आहे. तरुणांमध्ये रक्तदाब वाढण्यामागील कारणे काय आहेत? सध्याचे युग स्पर्धात्मक आहे. प्रत्येकाला प्रचंड यश, पैसा, प्रसिद्धी मिळवायची आहे. यासाठी आजची पिढी धडपडताना दिसते. अपेक्षापूर्ती झाली नाही किंवा नोकरीतील टार्गेट्स पूर्ण झाले नाही की मग त्यातून ताणतणाव जन्म घेतो. हायपरटेन्शनसाठी कारणीभूत असणाऱ्या इतर घटकांत मिठाचे उच्च प्रमाण, अल्कोहोलचे अतिरिक्त सेवन, स्थूलता, शरीराला हालचाली नसणे, कॉलेस्टेरॉलचे उच्च प्रमाण, आहारातील अनियमितता, जंक आणि फास्टफूडचे अवाजवी आकर्षण आणि चायनीजसारख्या पदार्थांचे सेवन यामुळे या आजाराच्या रुग्णांत वाढ होत आहे. रक्तदाबाला अनुवंशिकता हेही एक महत्त्वाचे कारण आहे. रक्तदाबाचा शरीरावर काय परिणाम होतो ? रक्तदाब शरीरातील महत्त्वाच्या अवयवांची हानी करतो. त्याचा हृदयावर मोठा परिणाम होतो. याशिवाय मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार होणे, पक्षाघाताचा झटका येणे असे धोके संभवतात. हृदयाचा आकार वाढतो, त्याबरोबर डोळ्यांवरही दीर्घकाळ परिणाम जाणवतो. अतिउच्च रक्तदाबामुळे किडनीवर परिणाम होऊन युरिनची मात्रा कमी झाल्याने किडनी निकामी होण्याचे प्रकार घडतात. मेंदूत रक्तस्राव होऊन लकवा मारणे असे प्रकार घडतात. रक्तदाबावर मात करण्यासाठी काय काळजी घ्यावी तसेच कोणत्या उपाययोजना कराव्यात? रक्तदाब टाळण्यासाठी किंवा निदान झाल्यानंतर आपल्या रोजच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल करणे गरजचे असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वजन बीएमआयप्रमाणे असावे. वजन जास्त असेल तर ते कमी कमी करणे गरजेचे आहे. तसेच धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींत उच्चरक्तदाबाचे प्रमाण अधिक असते. तंबाखूजन्य पदार्थांत 'निकोटिन' व 'कार्बन मोनॉक्साइड' ही विषारी द्रव्ये असतात, यामुळे रक्तवाहिन्या कठीण होण्याचा संभव असतो. यासाठी अशा पदार्थांचे सेवन प्रयत्नपूर्वक टाळावे. तसेच मद्यपान करणाऱ्यांतही उच्च रक्तदाब आढळतो. आहारात जाणीवपूर्वक मिठाचा अतिरेक टाळावा. योगसाधना, ध्यानधारणा, सकारात्मक विचार करावेत. आजकाल तरुणांनी वजने उचलल्याने ब्लडप्रेशर वाढल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे व्यायामाचा अतिरेक टाळल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येणे शक्य आहे. जागतिक रक्तदाब दिनानिमित्त तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? ब्लडप्रेशरपासून स्वत:ला वाचविण्यासाठी तरुणांनी आपल्या आरोग्याबाबत सजग आणि जागरूक राहणे गरजेचे आहे. नियमित ध्यान, व्यायाम, सकस आहार आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याविषयी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. प्रत्येकाने वेळेचे व्यवस्थापन योग्यरीत्या केल्यास ताणतणावाची तीव्रता कमी करणे शक्य आहे. यश मिळवण्यासाठी धडपडताना कष्टाबरोबर क्षमतेकडे लक्ष द्यावे, त्यामुळे अनावश्यक येणारे मानसिक दडपण टाळता येईल. आयुष्य सुंदर करायचे झाल्यास आरोग्यही सुंदर राहणे गरजेचे आहे. सचिन पाटील फोटो टाकला आहे ००००००
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट