म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्वात अधिक जागा भाजपला मिळाल्या. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसते. पुढील लोकसभा निवडणुकीची झलक आहे. भाजपने बुथ पातळीवर बांधणी केल्यामुळेच चांगले यश मिळाल्याची प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. याउलट विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजपचा विजय तांत्रिक आहे. नैतिकदृष्या काँग्रेसचाच विजय आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
दक्षिण भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या कर्नाटक काँग्रेसच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी भाजपने नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली. बुथ पातळी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सभा घेत प्रभावीपणे प्रचार केला. त्या तुलनेत काँग्रेस पक्ष मागे राहिला. पाच वर्षात समाजातील तळागाळापर्यंत योजना पोहचवल्या. मात्र काँग्रेसला निवडणुकीत त्याचा फायदा उठवता आला नसल्याचेही निकालावरून स्पष्ट झाले. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होतील. त्यापार्श्वभूमीवर कर्नाटकात भाजपला यश मिळाल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला.
कर्नाटकात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विकासाच्या मुद्यावर प्रचार केल्याने तेथे यश मिळाले. भाजपने बुथपातळीवर चांगले नेटवर्क केले होते. त्याचाही फायदा निवडणुकीत झाला. माझ्यावर सौंदत्ती विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली होती. त्या मतदारसंघात काही दिवस प्रचारासाठी गेलो होतो. तेथे भाजपचे आमदार पुन्हा निवडून आल्याचे समाधान आहे.
संदीप देसाई, अध्यक्ष, महानगर
------
कर्नाटकात प्रत्येक पाच वर्षांनी सत्तातंर होते. त्यानुसार यावेळी काँग्रेस सरकारने चांगले काम करूनही कमी जागा मिळाल्या. लोकशाहीत जनतेचा कौल अंतिम आहे. तो आम्ही मान्य करतो. काँग्रेस आणि जनता दल एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यालाही यश येईल, असे वाटते. असे झाल्यास भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही.
ए. वाय. पाटील, जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
कर्नाटकात भाजपने केवळ तांत्रिक विजय मिळविला आहे. तेथे नैतिक विजय काँग्रेसचाच आहे. एकूण मतामध्ये काँग्रेसला अधिक टक्के मते मिळाली. त्यावरून मतदारांच्या मनात काँग्रेस घट्ट असल्याचे स्पष्ट होते. तांत्रिकदृष्या पराभव कशामुळे झाला त्याचे आत्मपरीक्षण येत्या काळात होईल. त्यादृष्टीने तेथील नेते पक्षांची बांधणी करतील़
सतेज पाटील, आमदार, काँग्रेस
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमा भागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी अनेक वर्षांपासून धडपडत आहेत. दरम्यान, विधानसभेच्या तोंडावर एकीकरण समितीमध्ये फुट पडली. विस्कळीतपणा आला. मराठी विरुद्ध मराठी अशी लढत झाली. त्याचा फायदा राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना झाला. म. ए. समितीच्या उमेदवारांचा पराभव सीमाप्रश्नाच्या चळवळीला धक्का पोहचणारा ठरला. त्याची अधिक काळजी वाटते.
प्रकाश आबिटकर, आमदार, शिवसेना
कर्नाटकात काँग्रेस, जनता दल पक्ष एकत्र आले असते तर चांगले यश मिळाले असते. भाजपला इतक्या जागा मिळाल्या नसत्या. पाच वर्षे काँग्रेस सत्तेवर असल्याने काही मतदारात नाराजी असते. भाजपने पूर्ण ताकदीनीशी निवडणूक लढवली. यामुळेच काँग्रेसला कमी जागा मिळाल्या. या निकालाचा बोध महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष पक्षांनी घ्यावा असे वाटते.
हसन मुश्रीफ, आमदार, राष्ट्रवादी