भाजप व ताराराणी आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निम्म्याहून अधिक उमेदवारीचा टप्पा गाठला असून शिवसेना व काँग्रेसची मात्र अनेक ठिकाणच्या उमेदवारीसाठी दमछाक होणार आहे. कसबा बावड्यात काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जास्त असली तरी शहरात इतर ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे. शिवसेनेलाही काही आजी, माजी नगरसेवक सोडल्यास पुढील टप्प्यात अन्य मोठे उमेदवार मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात राष्ट्रवादी, ताराराणीतील कुणी नाराज इच्छुक आला तर तो मिळवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने दक्षिण उपनगरांमधील प्रभागातील उमेदवारी सोडल्यास मोठ्या संख्येने उमेदवारी जाहीर केलेली नाही. कसबा बावड्यात त्यांच्याकडे इच्छूक भरपूर आहेत. त्यातील एकाला दिली तर अन्य इच्छूक दुसऱ्या पक्षाचा मार्ग स्वीकारतील, अशी स्थिती आहे. पण तिथून बहुतांश ई वॉर्डमधील प्रभागातील उमेदवारीच जाहीर केलेल्या नाहीत. दाटवस्तीच्या मानल्या जाणाऱ्या बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर, शिवाजी पेठ अशा ठिकाणी तर काँग्रेसला पूर्णपणे शेवटच्या खेचाखेची होणाऱ्या टप्प्यात काही सक्षम उमेदवार मिळतील अशी शक्यता आहे. इच्छूक भरपूर आहेत पण निवडून येण्याची क्षमता असलेले किती हा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीचीही अशी काही परिस्थिती असली तरी घोषित करायच्या प्रभागांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्यांना शेवटच्या टप्प्यावर चांगले उमेदवार मिळाल्यास ते सरप्लसच ठरतील. पण काँग्रेसमध्ये ही परिस्थिती नाही.
भाजपने ताराराणी आघाडीच्या सहकार्याने उमेदवारी घोषित केल्या. त्यांच्या उमेदवारीकडे डोळे लावून बसणारे आजी तसेच माजी नगरसेवक आता काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यांची संख्या मात्र मोजकी आहे. शिवसेनेचे काही प्रभागात ताकदवान उमेदवार आहेत. पण त्यांची नावे अजून जाहीर केलेली नाहीत. पहिल्या टप्प्यात ही नावे जाहीर होण्यासारखी असताना त्यांची नंतरच्या टप्प्यात उमेदवारी जाहीर होण्याचे कारण समजत नाही. उपनगरांमध्ये शिवसेनेचे वातावरण असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचे धाडस केले जाण्याची शक्यता आहे. हे नवीन चेहरे असतील, पण प्रस्थापित अन्य पक्षांच्या उमेदवारांवरील नाराजी आपल्या मतात वळवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न झाले पाहिजेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट