जुन्या कमानीच्या पुलांकडे सर्वच विभागांचे दुर्लक्ष
Satish.ghatage@timesgroup.com
Tweet:satishgMT
कोल्हापूर
जुन्या कमानीच्या पुलाची देखभाल करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाला सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, महानगरपालिका व नगरपालिकांनी केराची टोपली दाखवली असून दगडी पुलांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. फलक लावणे, वीज व्यवस्था अशा तुटपुंज्या उपायोजना करुन बोळवण केली जात आहे.
२०१६ मध्ये रायगड जिल्ह्यातील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली होती. या समितीच्या सूचनांच्या अनुषंगाने राज्य सरकारने पूल ज्यांच्या कार्यक्षेत्रात येतात त्यांना पुलाच्या देखभालीबाबत कोणत्या उपाययोजना कराव्यात याचा आदेश काढला आहे. दगडी पुलावर उगवणाऱ्या वनस्पती व झाडे मुळासकट काढून टाकावीत, पुलावर विजेची सोय करावी, पुलांच्या रस्त्यांवर दोन्ही बाजूला ब्लिंकर्स तर मध्यरेषवर रिफ्लेटिव्ह बसवावेत, पुलाच्या सद्यस्थितीची माहिती देण्याचे फलक लावावेत. तसेच रम्बलर स्ट्रिप्स बसवावेत अशा सूचना केल्या होत्या.
जिल्ह्यात लहान मोठे एकूण ४२५ पूल आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जिल्ह्यातील २४ पुलांची जबाबदारी आहे. त्यामध्ये अंकली, औरवाड (ता. शिरोळ), भोगावती (करवीर), कूर (भुदरगड), निढोरी (कागल), व्हिक्टोरिया (आजरा), इचलकरंजी (हातकणंगले) हे दगडी पूल आहेत. या पुलांची डागडुजी पावसाळ्यापूर्वी केली असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला जात आहे. पुलांसबधित माहिती, वीज व्यवस्था, ब्लिंकर्स, रिफ्लेटिव्ह बसवलेले नाही. तसेच सद्यस्थितीची माहिती देणाऱ्या फलकांचा अभाव आहे. उपअभियंत्यांची संख्या कमी आहे, असे कारण सांगितले जात असल्याने दुर्घटना रोखण्याच्या महत्वाच्या सूचनेकडे डोळेझाक केली जात आहे. तसेच सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करण्यासाठी मंजुरी, निविदा याच्या घोळात पावसाळा संपेल अशी भितीही व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्गाकडे पंचगंगेवरील शिवाजी पूल, शाहूवाडी, मलकापूर, कडवी नदीवरील वारुळ गाडीगौंड हे पूल आहेत. शिवाजी पूल वगळता अन्य तीन पूल हे रामभरोसे आहेत. शिवाजी पूल धोकादायक असल्याने आणि २६ जानेवारी रोजी पूलाचा कठडा तुटून १३ बळी गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग आली आहे. पुलाच्या सुरवातीला पुलाची स्थिती दर्शवणारे फलक लावले आहेत. तसेच महानगरपालिकेच्या सहकार्याने विजेची सोय केली आहे. सौरउर्जेवरील ब्लिंकर्स रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावले असले तरी पावसाळ्यात सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे ब्लिंकर्स कुचकामी ठरले आहेत. पुलावरील झाडेझुडपे काढण्यात आलेली नाहीत. तसेच भल्यामोठ्या केबल्स लोंबकळत आहेत.
जिल्हा परिषदेकडे ११ दगडी पूल आहेत. या पुलाचे निखळलेले दगड व रेलिंगचे काम पावसाळ्यापूर्वी केले आहे. पण सरकारने उपाययोजनेसाठी ज्या सूचना पाठवल्या आहेत, त्यासाठी निधीची कमतरता असल्याने कायमस्वरुपी फलकाऐवजी फ्लेक्सचे फलक लावले जाणार आहेत.
कोल्हापूर शहरात विल्सन पूल, शेळके पूल, हुतात्मा गार्डन पूल, गोखले कॉलेज पूल, संभाजी पूल, जुना पूल आहेत. या पुलांच्या देखभालीकडे महानगरपालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. जयंती पुलावरील मुख्य विल्सन पुलावरील झाडेझुडपे काढलेली नाहीत. या पुलावर विजेची पुरेशी सोय नाही. अन्य पुलांवर जरी विजेची सोय असली तरी झाडेझुडपे काढणे, तुटलेले कठडे, रेलिंग यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पूल ज्यांच्या अखत्यारीत आहेत त्यांच्याकडून पुलाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने तुटपुंज्या उपाययोजना केल्या जात असल्याने पुलांचा धोका वाढला आहे.
००००
कोट
'जिल्हा परिषदेकडील ११ पुलांच्या देखभालीसाठी सूचनांचे पालन केले जात आहे. पण निधीअभावी काही उपाययोजना करण्यासाठी अडचणी येत आहेत. पुलावर सूचनांचे फ्लेक्स फलक लावले जातील. तसेच उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे निधी मागणीसाठी प्रस्ताव केला जाईल.
तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद
००००
'शिवाजी पुलासह फलक, विजेची सोय, ब्लिंकर्स लावण्यात आले आहेत. रम्बलर स्ट्रिप्स लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीकडे परवानगी मागितली जाईल. तसेच उपाययोजनासाठी नवीन अंदाजपत्रक तयार करुन खर्चासाठी प्रस्ताव करण्यात येईल. मलकापूर, शाहूवाडी, वारुळ पुलावर लवकरच फलक उभारण्यात येतील.
व्ही.जी. गुळवणी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग
००००
'पुलांवरील झाडेझुडपे काढण्यात आली आहेत. तसेच जयंती पूल वगळता सर्व पुलांवर स्ट्रीट लाईटस् आहेत. अन्य सुविधांची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे.
नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महानगरपालिका