म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
ताराबाई पार्क प्रभागातील पोटनिवडणूक ही एका प्रभागापुरती मर्यादित, मात्र त्या निकालावर महापालिकेतील विशेषत: स्थायी समितीतील सत्तेच्या समीकरणाची दिशा ठरणार असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. नेत्यांच्यापासून कारभाऱ्यांपर्यंत साऱ्यांनीच ही पोटनिवडणूक स्वत:ची निवडणूक असल्यासारखे राबविली. मात्र, यात भाजप-ताराराणी आघाडीला यश आले तर स्थायी समितीमध्ये काठावर बहुमत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले.
ताराराणी आघाडीकडून हा प्रभाग हिसकावून घेण्यासाठी काँग्रेस आघाडीने चाणाक्षपणे खेळी करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले. आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्तिगत लक्ष घातले. आमदार पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत प्रभाग पिंजून काढला. दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांची फौज कामाला लावत प्रत्येकावर जबाबदारी निश्चित केली. दुसरीकडे भाजप, ताराराणी आघाडीपुढे ही जागा टिकवण्याचे आव्हान होते. परिणामी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक यांनी कॉलनीनिहाय गाठीभेटी घेत फिल्डिंग लावली. कारभारी आणि नगरसेवकांची कुमक उमेदवारांच्या सोबतीला होती. दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी कुठे गाठीभेटी तर कुठे दबावतंत्राचा अवलंब करत मतदान फिक्स केले. प्रत्यक्ष मतदानादिवशीही त्याची प्रचिती नागरिकांनी घेतली. शेवटी स्थानिक उमेदवार आणि कोरी पाटी असलेल्या रत्नेश शिरोळकर यांना कौल दिला.
जानेवारीत ‘स्थायी’साठी लढाई
भाजप, ताराराणी आघाडीला महापालिकेतील सत्ता काबीज करायची आहे. दोन्ही काँग्रेस आघाडीकडील बहुमत आणि शिवसेनेच्या चार नगरसेवकांची साथ यामुळे भाजप, ताराराणी आघाडीचे सत्तेचे मनसुबे उधळले आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात महापौरपदासाठी तर जानेवारी महिन्यात स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक आहे. डिसेंबर महिन्यात स्थायीतील सोळापैकी आठ सदस्यांची मुदत संपणार असून नव्याने आठ सदस्यांची नियुक्ती होईल.दोन्ही काँग्रेसकडे बहुमत असल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत धोका नाही. मात्र स्थायीमध्ये सत्ताधारी काँग्रेसकडे काठावरचे बहुमत आहे. ‘स्थायी’त दोन्ही काँग्रेसचे मिळून आठ, भाजप ताराराणी आघाडीचे सात तर सेनेचा एक सदस्य आहे. सेनेच्या टेकूवर स्थायीत काँग्रेस सत्तास्थानी आहे. दोन्ही काँग्रेसमधील नाराज, सत्तेचा प्रभाव या बळावर भाजप आघाडीकडून स्थायीत चमत्कार करण्याची भाषा होते.
देसाई यांचे वर्चस्व सिध्द
माजी नगरसेवक नीलेश देसाई यांचा हा हक्काचा मतदार संघ समजला जातो. शिरोळकर यांच्या विजयात मोठा हातभार लावत त्यांनी मतदारसंघावरील पकड सिद्ध केली. पण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लाटकर यांनी ११९९ मतापर्यंत मारलेली मजल देसाई यांना विचार करायला भाग पाडणारी आहे. दुसरीकडे लाटकर यांचा महापालिका निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यामुळे राष्ट्रवादी अंतर्गत राजकारणही उफाळण्याची शक्यता आहे. निवडणुकीत काँग्रेस आघाडीकडून प्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुख, अर्जुन माने, नंदकुमार मोरे, अफजल पिरजादे, दुर्वास कदम, संजय घाटगे अशी यंत्रणा कार्यरत होती. तर भाजप आघाडीकडून सुहास लटोरे, सुनील कदम, सत्यजित कदम, नीलेश देसाई, विजय सूर्यवंशी, किरण शिराळे, शेखर कुसाळे, राजसिंह शेळके मारुती माने, ही मंडळी सक्रिय राहिली.
माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रभागात दडपशाही केली. काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मतदान केला तरच व्यवसाय चालू शकतील या भाषेत धमकावले. महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीवाले हुकुमशाही पध्दतीने कामकाज करत आहेत. त्यांनी प्रभागातील व्यापाऱ्यांना काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले नाही तर व्यवसाय धोक्यात येतील, अशी भीती घातली. यामुळे व्यापारी समाज घाबरला आणि आमचे मताधिक्य कमी झाले.
सत्यजित कदम, गटनेता ताराराणी आघाडी
भाजपच्या राजवटीला जनता कंटाळली असून मतपेटीतून त्यांनी उद्रेक दाखविला. ताराबाई पार्क निवडणुकीत नैतिक विजय आमचाच आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक हे पालकमंत्री पाटील यांना हाताशी धरुन दडपशाहीचे राजकारण करत आहेत. जिल्हा परिषद, कारखाने आणि ग्रामपंचायत निवडणुकीत पैसा, दडपशाहीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. दडपशाही, धमकावणे ही महाडिकांची पद्धत आहे.
शारंगधर देशमुख, गटनेता काँग्रेस
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट