‘सहकारात शेतकरी जसा महत्त्वाचा घटक आहे, तसाच कामगारही आहे. शेतकरी टिकला पाहिजे तसा कामगारही टिकला पाहिजे. यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाचा भाव ३५०० रुपये प्रतीटन होईल. पण, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या पगाराचा आकडा अजून वाढला नाही. मात्र, आता प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारची मान्यता मिळाली तर हा प्रश्न लवकर मार्गी लागेल. राज्यातील सहकारी कारखान्यातील कामगारांनी समन्वय समिती तयार करा. त्या समितीच्या माध्यमातून कामगारांच्या बोनस व पगारवाढी प्रश्नांबाबत कामगारांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलणी करण्यास तुमच्याबरोबर मी ही पुढाकार घेईन,’ अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रावर बुधवारी आयोजित महाराष्ट्र राज्य साखर कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे माजी अध्यक्ष खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार जयंत पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थिती होते.
पवार म्हणाले, शेतकऱ्यांनी सदन होण्यासाठी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे केले पाहिजेत. शेतकरी कारखानदार झाला पाहिजे. परंतु तो टाटा-बिर्लांसारखा नको तर शेतात घाम गाळणार कारखानदार झाला पाहिजे. यासाठी यशवंतराव चव्हाण साहेबांनी सहकारी कारखानदारी उभारण्यावर भर दिला. त्यानंतर वसंतदादा पाटील यांनीही तिच भूमिका घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांची अर्थिक उन्नती होण्यास मदत झाली. कामगारांच्या हिताचा विचार झाला पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये ८० टक्के शेतकरी दोन एकराच्या आतील अल्पभूधारक आहेत. त्यांच्यासाठी साखर धंदा हा अतिशय महत्त्वाचा आहे. साखरेपासून वीज, अल्कोहोल, इथेनॉल यासह इतर अनेक उपपदार्थ तयार होत असल्याने साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत. महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था सहकारामुळे मजबूत ठेवण्यामागे साखर कामगारांचे मोठे योगदान आहे. या योगदानात कामगारांची भूमिकाही महत्वाची ठरली आहे. आता मी साखर कामगाराच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या समस्यांचा पाठपुरावा करणार आहे. या वेळी हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, तात्यासाहेब काळे यांचेही भाषण झाले.
राज्यातील साखर कामगारांच्या वतीने शरद पवार यांना चांदीचा मंगलकलश, शाल, श्रीफळ आणि आमदार बाळासाहेब पाटील यांचा दुर्गामातेची मुर्ती देवून गौरव करण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट