बिद्री (ता.कागल) येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवार(ता.८) पासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. त्यानंतर दोन दिवस सरकारी कार्यालयांना सुट्ट्या होत्या. तसेच मंगळवार(ता.१२) हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सोमवारी (ता.११) अर्ज भरण्यास मोठी गर्दी झाली. आजअखेर अनेक मातब्बर नेत्यांसह कार्यकर्त्याचे ५२४ अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये बिद्री कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव, के.जी.नांदेकर,विठ्ठलराव खोराटे, प्रविणसिंह पाटील, धनाजी देसाई, भरत पाटील, जीवन पाटील,राजेंद्र पाटील,नंदकिशोर सुर्यवंशी, बाबूराव देसाई, बालाजी फराकटे, विकास पाटील व आर.डी.पाटील (कुरुकली )यांच्यासह कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले.
बिद्री कारखान्याच्या निवडणुकीचे रणांगण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक राजकीय मंडळी मेळावे घेत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवत असून जो गट आपल्याला मानसन्मान दिला जाईल त्या गटालाच आपला पाठिंबा राहिल असे नेतेमंडळी आपल्या मेळावा व बैठकामध्ये बोलू लागले आहेत. त्यामुळे बिद्री कारखान्यावर नेते , कार्यकर्ते व सभासदांची यांची गर्दी दिसू लागली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट