म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी झटणाऱ्या चळवळीला गुरूवारी गणपती विसर्जनाच्या निमित्ताने मूर्तिदानातून ‘लाख’मोलाचे बळ मिळाले. रंकाळा, पंचगंगा नदी, राजाराम बंधारा, कळंबा, कोटीतीर्थ येथे भाविकांनी उत्स्फूर्तपणे मूर्तिदान केल्यामुळे पर्यावरणपूरक उत्सवाचे बीज रूजल्याचे चित्र दिसून आले. विसर्जन कुंड, काहिलीमध्ये मूर्ती प्रतिकात्मक बुडवून त्यानंतर दान करण्यासाठी दिली जात होती. दान केलेल्या मूर्तींच्या संकलनासाठी महापालिकेने सर्व विसर्जनस्थळी ट्रॉलीची सोय केली होती. शहरासह जिल्ह्यात मिळून जवळपास चार लाखांवर मूर्ती दान करण्यात आल्या.
गेल्या सात दिवसांपासून घराघरात चैतन्याचे रूप घेऊन विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी भाविक सहकुटुंब सहपरिवार सहभागी झाल्याने शहरातील नदी, तलाव येथे उत्साहाला भरते आले. गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसानेही बाप्पांच्या विसर्जनादिवशी विश्रांती घेतली. लहान मुलांसह महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणल्या जात होत्या. तसेच अपार्टमेंट, कॉलनी, गल्ली, सोसायटी येथील सर्वांनी एकत्रितपणे मूर्ती आणण्यासाठी सजवलेल्या हातगाडीचा वापर केला. गणपती बाप्पा मोरयाचा अखंड गजर आणि चुरमुऱ्याची उधळण यामुळे विसर्जन सोहळ्याला मांगल्याचे रूप आले. नदी, रंकाळा, कळंबा, खण याकडे जाणारे रस्ते गणरायाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
पर्यावरणपूरक उत्सवाला प्रतिसाद देत गुरूवारी घरगुती मूर्ती आणि गौरी विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना अबालवृद्धांनी मूर्तिदानाची संकल्पपूर्ती करीत प्रदूषणमुक्तीच्यादृष्टीने भक्कम पाऊल टाकले. पंचगंगा घाट, रंकाळा, राजाराम तलाव, राजाराम बंधारा, कोटीतीर्थ, कळंबा तलाव आणि जिल्ह्यात सुमारे चार लाखांवर मूर्ती दान करण्यात आल्या.
==
प्रशासनाची योग्य व्यवस्था, पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांकडून केले जाणारे आवाहन यामुळे भाविकांमधून जिल्ह्यातून जवळपास चार लाखांवर मूर्ती दान झाल्या. जिल्हा परिषद प्रशासनाने यंदा चांगले नियोजन केल्याने मूर्तिदान व निर्माल्यदान चळवळीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात दोन लाख २४ हजार ९६८ मूर्ती तर १४६ घंटा गाडी व १०८८ ट्रॅक्टर निर्माल्य दान झाले.
कळंब्यावर शंभर टक्के प्रतिसाद
कळंबा येथे मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या एकाही भाविकाने मूर्तीचे विसर्जन तलावात केले नाही. त्यामुळे या भागात ठेवलेल्या काहिलींत मूर्ती प्रतिकात्मक विसर्जित करून त्यानंतर दान करण्यात आली. कळंब्यात शंभर टक्के मूर्तिदान चळवळ यशस्वी झाली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट