शहरातील गटप्रमुखांच्या निवडीवरून शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे यांचे गट आमने सामने आल्याने संघर्ष निर्माण झाला. याच वादातून मंगळवारी (ता. २२) आमदार समर्थकांनी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या राजारामपुरीतील कार्यालयावर हल्ला केला. ट्युबलाइट आणि सोड्याच्या बाटल्या फोडण्यात आल्या. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली.
दरम्यान, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप लिंग्रस यांनी केला आहे. ६० ते ७० जणांच्या जमावाने कार्यालयात गोंधळ घालून मोडतोडीचा प्रयत्न केल्याने लिंग्रस यांच्याकडून रात्री उशिरा राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला.
शिवसेनेतील पदाधिकारी निवडीवरून आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यात वाद आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या निवडीचे आदेश दिले आहेत. यानुसार शहरात दुर्गेश लिंग्रस यांच्याकडून गटप्रमुखांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार रविवारी (ता. २०) संजय पवार आणि विजय देवणे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यानंतर गटप्रमुखांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात केली. आमदार समर्थकांच्या प्रभागांमधून गटनिवडीला सुरुवात झाल्याने आमदार समर्थक सुनील जाधव यांनी निवडींना आक्षेप घेतला. सोमवारी रात्री लिंग्रस यांचा कार्यकर्ता विराज ओतारी याला सुनील जाधव यांनी फोन करून निवडीबाबत आपल्याशी चर्चा करावी, असा आग्रह धरला. याच मुद्यावरून जाधव आणि ओतारी यांच्यात सोमवारी रात्री शिवाजी चौक परिसरात शाब्दिक चकमक झाली होती. मंगळवारी सकाळी संजय पवार, दुर्गेश लिंग्रस समर्थकांसह कसबा बावडा परिसरातील निवडींचे काम करीत होते. यावेळी जाधव आणि ओतारी यांच्यात फोनवरून पुन्हा वाद झाला.
लिंग्रस यांनी आमदार समर्थक जाधव याला फोनवरून धमकी दिल्याचे सांगत मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास आमदारांचे स्वीय सहायक राहुल बंदोडे, सुनील जाधव यांच्यासह साठ ते सत्तर कार्यकर्त्यांनी लिंग्रस यांच्या राजारामपुरीतील कार्यालयावर हल्ला केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ट्युबलाइट आणि सोड्याच्या बाटल्या फोडल्या. विभागप्रमुख योगेश शिंदे यांना धक्काबुक्की केली. अर्वाच्च शिवीगाळ केली, याशिवाय एका दुचाकीचेही नुकसान केले. विराज ओतारी याला जिवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली, अशी माहिती लिंग्रस यांनी दिली. आमदारांनीच हल्ला करण्यासाठी समर्थकांना फूस लावल्याचा आरोप लिंग्रस यांनी केला आहे. या दरम्यान आमदार क्षीरसागर हे कार्यकर्त्यांसह कसबा बावड्यात ठाण मांडून बसले होते. या प्रकाराने बावडा आणि राजारामपुरीत काही काळ तणाव निर्माण झाला होता.
राजारामपुरीतील कार्यालयावर जमाव आल्याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला. या घटनेनंतर जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव, सुजित चव्हाण, दत्ताजी टिपुगडे, राजू यादव, कमलाकर जगदाळे, आदींनी लिंग्रस यांच्या कार्यालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. भाजपचे शहराध्यक्ष संदीप देसाई यांनीही लिंग्रस यांच्या घरी जाऊन भेट घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करून घेण्याचे काम सुरू होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट