केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत राज्यातील विमानतळांवरुन विमानसेवा सुरू होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर सोलापूर विमानतळाच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. बुधवारी जेट एअरवेज कंपनीचे एरिया मॅनेंजर किरण ताम्हणकरांसह दोन अधिकाऱ्यांनी सोलापूर विमानतळाची पाहणी केली. विमानतळाचे अधिकारीचे संतोष कौलगी यांनी त्यांना विमानतळाची तर उद्योजक राम रेड्डी यांनी सोलापुरातील उद्योगाची माहिती दिली.
दरम्यान, जेट किंवा अन्य कोणतीही कंपनी आता सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करणार असून, सप्टेंबर महिन्यात विमान आकाशात झेप घेणार असल्याचे खासदार शरद बनसोडे यांनी सांगितले आहे. या पूर्वी सोलापूर विमानतळावरून किंगफिशर कंपनीची सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाली होती. मात्र, काही महिन्यात ती विमानसेवा बंद पडली. प्रवाशी न मिळाल्याने किंगफिशर कंपनीला आपला गाशा गुंडाळावा लागला होता. मोठा गाजावाजा करून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विमासेवा सुरू केली होती. बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी शिंदे, मोहिते-पाटील यांनी अनेकदा प्रयत्न केले मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यावेळी साडेतीन हजार रुपये तिकीट असतानाही अनेक महिने विमानसेवा सुरू राहिली होती.
दरम्यान, केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर विमानसेवा सुरू करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख तसेच खासदार शरद बनसोडे यांनी यांनी दिल्ली दरबारी आपले वजन खर्ची घातले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोट्या छोट्या शहरांना जोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी उडान योजना जाहीर केली. त्यानुसार ज्या विमानतळावरून विमासेवा सुरू होणार आहे. त्यांना विमानतळ सुसज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोलापूरचे विमानतळ सुसज्ज आहेच शिवाय विमानतळ इमारतीत पाडकाम करून काही बदल करण्याबरोबरच प्रतीक्षा कक्षही सुधारणा करून तयार ठेवण्यात आला आहे.
पंधरा दिवसांत
चिमणी पाडणार
सोलापूर विमानतळावरून सप्टेंबर महिन्यापासून कोणत्याही परिस्थितीत सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासाठी विमानसेवेला अडथळा ठरणारी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची मोठी चिमणी पाडावीच लागणार आहे. चिमणी पाडण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाली असून, येत्या पंधरा दिवसांत चिमणी पाडून विमानसेवेत येणारा मोठा अडथळा दूर करण्यात येणार आहे, अशी माहिती माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट