अजय जाधव, जयसिंगपूर
मुसळधार पाऊस सुरू झाला अन् कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली की, काळजाचा ठोका चुकतो. २६ जुलै २००५चा महाप्रलंयकारी महापूर आठवतो. गेल्या बारा वर्षात शिरोळ तालुक्यात पाण्याखाली जाणारे रस्ते भराव टाकून उंच करण्यात आले. अनेक मार्गावर नवे पूल बांधण्यात आले. मात्र, आजही पावसाची संततधार आणि त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला की महापूर डोळ्यासमोर उभा रहातो, केवळ आठवणीनेच अंगावर रोमांच उभे राहतात.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागाच्या तुलनेत पूर्व भागात शिरोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, पाऊस पडला नाही तरी येथे नद्यांना पूर ठरलेला असतो. सातारा, सांगली जिल्ह्यातून येणारी कृष्णा, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातून येणारी वारणा, पंचगंगा तसेच दूधगंगा या नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. या नद्या शिरोळ तालुक्यास वरदायिनी म्हणून ओळखल्या जातात. मात्र संथ वाहणाऱ्या कृष्णामाईसह अन्य नद्या पावसाळ्यात रौद्ररूप धारण करतात.
सन २००५साली जून महिन्याच्या प्रारंभीच पावसाने जोर धरल्याने सुरुवातीलाच धरणे भरली. त्यानंतर अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. अलमट्टी धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा केल्याने शिरोळ तालुक्यास महापुराचा फटका बसला. शंभर वर्षातील विक्रम मोडीत काढून महापुराने नवा विक्रम केला.
त्या महापुरात शिरोळ तालुनयातील १९ हजार ५०० हेक्टर पीकक्षेत्र पाण्याखाली गेले. १३६२ घरे जमिनदोस्त झाली. चार हजारहून अधिक घरांची पडझड झाली. दुकाने, हातगाड्या पाण्याखाली गेल्याने अतोनात नुकसान झाले. रस्त्यांवर दहा ते पंधरा फूट पाणी आल्याने मदतकार्यात अडथळे आले. कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांच्या महापुराने शिरोळ तालुक्यास मोठा तडाखा दिल्याने सर्वत्र हाहाकार माजला होता. पावसाचे थैमान तसेच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने बघता - बघता पुराचे पाणी पात्राबाहेर पडले. कृष्णा व पंचगंगा नदीने रौद्ररूप धारण केले. पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने अनेक गावांना बेटाचे स्वरूप आले. महापुराने हजारो कुटूंबांचे संसार आणि शेतजमिनीतील पिकांना आपल्या कवेत घेतले. शेकडो घरे जमिनदोस्त झाली. शेतीचेही कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. अक्राळ-विक्राळ रुप धारण केलेल्या या महापुराने लोकांचे जगणे मरणप्राय केले. घरे पाण्याखाली गेल्याने प्रापंचिक साहित्याबरोबरच पशुधन वाहून गेले. अशा स्थितीत लष्कराच्या मदतीने ग्रामस्थांना यांत्रिक बोटीतून आपला गाव सोडावा लागला. राजापूर अकिवाट दरम्यान राजापुरातील पूरग्रस्तांना सुरक्षीत स्थळी हलविण्याचे प्रयत्न लष्करी जवान आपल्या नौकेतून करीत होते. सायंकाळी सहाच्या सुमारास शेवटची खेप होती. यानंतर दोन नौका जात असतानाच एक नौका पाण्यात उलटली. अन् बघता बघता दहाजण महापुरात वाहून गेले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र महापुराने त्यांना आपल्या कवेत घेतले.
शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना महापुराने वेढा दिल्याने तसेच पाणी वाढू लागल्याने पूरग्रस्तांना घरावरील छताचा, उंच इमारतींचा आधार घेतला. महापुराचे अक्राळ-विक्राळ रुप पाहून निसर्गासमोर शरणागती पत्करलेल्या माणसांना अन् पाण्यासाठी सुरक्षितस्थळी जाण्यासाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. स्थानिक गावकऱ्यांच्या तसेच लष्कराच्या मदतीने पूरग्रस्तांनी शाळा, मंदिरे, छावणीत स्थलांतर केले. शिरोळ तालुक्यात कुरुंदवाड, बस्तवाड, खिद्रापूर, मजरेवाडी, अकिवाट, टाकळी, राजापूर या नदीकाठच्या गावातील घरांत पुराचे पाणी शिरले. पुराचे पाणी दोन दिवसात उतरेल ही आशा फोल ठरली. वाढणारे पुराचे पाणी अन् आभाळातून बरसणारा पाऊस यामुळे पूरग्रस्तांनी धीर सोडला. अशा स्थितीत टाकळीवाडी येथील गुरूदत्त साखर कारखान्याने पूरग्रस्तांना आधार दिला. राजापूर, राजापूरवाडी, अकिवाट, मजरेवाडी, बस्तवाड येथील महिला, पुरुष अबालवृद्ध पूरग्रस्तांची गुरुदत्त कारखान्यावर संस्थापक अध्यक्ष, भगवानराव घाटगे व त्यांचे चिरंजीव माधवराव घाटगे यांनी राहण्याची, जेवणाची सोय केली. पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी स्वतंत्र छावणी उभारण्यात आली. पूरग्रस्तांना मानसिक आधार दिला.
शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यानेही पूरग्रस्तांची जेवणाची सोय करण्याबरोबरच त्यांच्या जनावरांसाठीही छावणी उभारून चाऱ्याची सोय केली. दत्त कारखान्याच्या वैद्यकीय पथकाने पूरग्रस्तांच्या आरोग्याची काळजी घेतली. औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी, आलास, बुबनाळ या गावातील सहा ते सात हजार पूरग्रस्तांची सोय दत्त कारखान्यावर करण्यात आली. शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांवर उपचार करण्यासाठी जयसिंगपूर मेडिकल असोसिएशनचे शंभरहून अधिक डॉक्टर व्यस्त होते. रोटरी क्लबने वैद्यकीय पथकांना स्वयंसेवकाबरोबरच औषधे पुरविली. लायन्स क्लब, जैन श्वेतांबर संघ, रेड क्रॉस सोसायटी, घोडावत ग्रुप, तुलसी ब्लड बँक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लष्कराचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यासाठी विविध सेवाभावी संस्था व संघटनांचे पदाधिकारीही धावले. महापुरात पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढताना त्यांना मोठी कसरत करावी लागली.
महापुराच्या काळात कवठेसार, कोथळी, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, नांदणी, धरणगुत्ती, शिरोळ, शिरटी, हसूर, नृसिंहवाडी येथील पूरग्रस्तांना जयसिंगपूरकरांनी मदत केली. तत्कालीन आमदार राजू शेट्टी, शरद साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर, उद्योगपती संजय घोडावत, राजेंद्र मालू, दलितमित्र अशोकराव माने, उल्हास पाटील, सावकर मादनाईक यांच्यासह सेवाभावी संस्थांच्या सदस्यांनी विस्थापितांना मदत केली. शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देऊन पूरग्रस्तांची निवाऱ्याची सोय करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले डबे पूरग्रस्तांना दिले तर काही विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून बाजारातून बिस्कीटे, दूध आणून पूरग्रस्तांच्या लहान मुलांना दिले. जयसिंगपूर शहरातून मदतीसाठी फेऱ्या काढण्यात आल्या. कुणी कपडे, कुणी पैसे, चादरी प्रत्येकाने शक्य तितकी सढळ हाताने मदत केली. पूरग्रस्तांना ताजे व चांगले जेवण मिळावे म्हणून जयसिंगपुरात घराघरात अन्न शिजले. नागरिकांनी अन्न, वस्त्र, निवारा दिला. महापूर ओसरल्यानंतर गावी परतणाऱ्या पूरग्रस्तांना पंधरा दिवस पुरेल इतका शिधाही देऊनही माणुसकीचे दर्शन घडविले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट