शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना हमीभाव मिळावा, कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी गेल्या पंधरवड्यात आंदोलन केले होते. आंदोलनकाळात कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहेत. पोलिसांच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारने जाहीर केल्याने, याचे परिपत्रक येताच जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत.
गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला होता. आंदोलन काळात कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून वाहनांची तोडफोडही करण्यात आली. आंदोलनाचा गैरफायदा घेऊन काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाची लूटही झाली. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.
शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलनातील शेतकऱ्यांवरील आंदोलन काळातील गुन्हे मागे घेण्याची कबुली सरकारने दिली होती. ज्या आंदोलकांकडे लुटीचा मुद्देमाल सापडला नाही अशाच शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जातील असे सरकारने जाहीर केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० आंदोलक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
आंदोलने आणि गुन्हे
पुणे-बेंगळुरू महामार्गावर शिये येथे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको केला होता, त्यामुळे आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि सुमारे २५० हून अधिक शेतकऱ्यांवर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. मार्केट यार्ड येथे विक्रेत्यांची भाजी भिरकावल्याबद्दल रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अॅड. माणिक शिंदे यांच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर जिल्ह्यात १३५ शेतकऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. अशा सुमारे ४०० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट