आर्थिक स्थिती बेताची असल्याचे कारण देत महापालिकेने केएमटी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार दिलेला नाही. मार्चचा पगार जूनच्या पहिल्या आठवड्यात दिला आहे. कंत्राटी, रोजंदारी आणि कायमस्वरूपी असलेले एक हजार कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत.
आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देऊन महापालिकेने केएमटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबविले आहेत. दरमहा एक हजार कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करावी लागते. मात्र, महापालिकेचे आर्थिक गणित बिघडल्याचे कारण केएमटी प्रशासनाला दिले जात आहे. त्याचा फटका म्हणून कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचा पगार झालेला नाही. मार्च २०१७ चा पगार जूनच्या पहिल्या आठवड्यात दिला आहे. कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांची संख्या ५०० आहे, तर कायम सेवेत असलेले कर्मचारी ५०० आहेत. केएमटीच्या ताफ्यात १२० बसेस आहेत. यापैकी काही बसेस तांत्रिक कारणांमुळे नादुरुस्त आहेत.
महापालिका प्रशासन केएमटीकडून दर महिन्याला खर्चाच्या तुलनेत उत्पन्न येत नसल्याचे कारण देत आहेत. केएमटीचे उत्पन्न आणि फायदा यासह महापालिकेला अन्य मार्गाने मिळणारे उत्पन्न कमी झाल्याचे कारणही दिले जात आहे. या सर्वांचा फटका केएमटीला बसत आहे. अनेकदा निधीची तरतूद झाली तरीही टप्याटप्याने महिन्याचे वेतन केले जाते. गेले वर्षभर कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार झालेले नाहीत.
महापालिका प्रशासनाकडे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या पगाराचा प्रस्ताव दिला आहे. त्याबाबत आठवडाभरात निर्णय होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने केले जात असल्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाकडून दिले जात आहे.
- संजय इनामदार, जनसंपर्क अधिकारी, केएमटी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट