मे महिन्याची सुट्टी आणि पर्यटन हे समीकरणच. या काळात पर्यटन करणे किंवा गावाकडे जाऊन आठ-दहा दिवस आरामात घालवण्याचा मोह आवरत नाही. यंदा मात्र हा मोह अनेकांना चांगलाच महागात पडला आहे. मे महिन्यात चोरट्यांनी शहरात तब्बल २२ ठिकाणी चोऱ्या आणि घरफोड्या करून सुमारे ७० लाखांचा मुद्देमाल लंपास केला. त्यामुळे मे महिन्याची सुट्टी चोरट्यांसाठी पर्वणी ठरली असून, नागरिकांच्या आनंदावर मात्र विरजण पडले आहे.
शाळा, महाविद्यालयांच्या सुट्या संपताच घरोघरी पर्यटनाचे बेत ठरतात. अनेक कुटुंबे आठ-दहा दिवस मूळ गावाकडे जाऊन सुटीचा आनंद घेतात. या काळात कुलूपबंद घरे चोरटे हेरतात. दिवसाही ऐन वर्दळीच्यावेळी चोरटे हातोहात घर साफ करतात आणि सुटीसाठी शहराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या आनंदावर विरजण पडते. चोरीच्या घटनेत रोख रकमेसह किमती ऐजही लंपास केले जात आहेत. अनेकांची आयुष्याची पुंजीही लंपास होते. यंदाच्या मे महिन्यात शहरात अनेकांना असाच अनुभव आला. शाहूपुरी, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आणि करवीर पोलिस ठाण्यात मे महिन्यात चोरीच्या २२ घडना घडल्या. या घटनांमधून रकमेसह दागिने असा सुमारे ७० लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. विशेष म्हणजे यातील केवळ ६ चोऱ्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सर्वाधिक १२ चोऱ्या शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. यात दोन ठिकाणी लूटमारीचीही घटना घडली. साइक्स एक्स्टेंशन, सीबीएस परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. बसस्थानक परिसरात महिलांची पर्स लांबवण्याचे प्रकार सलग चार दिवस घडले. त्यामुळे प्रवाशांसह पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी लूटमार करणारी कनाननगर येथील एक टोळी पकडली. त्याचबरोबर साईक्स एक्स्टेंशन येथील घरात चोरी करणाऱ्या मोलकरणीस पकडून सात तोळ्यांचे दागिने हस्तगत केले. शिवाय सीबीएस परिसरात चोऱ्या करणारी महिलांची एक टोळीही पोलिसांच्या हाती लागली.
जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेमध्येच सहा ठिकाणी चोऱ्या झाल्या. उपनगरांमधील अनेक नागरिक शहराबाहेर असल्याने काही चोऱ्यांची नोंद होऊ शकली नसल्याने घटना घडूनही याची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नाही. दाखल झालेल्या ६ चोऱ्या सुर्वेनगर, सानेगुरूजी वसाहत आणि जिवबानाना जाधव पार्क परिसरातील आहेत. शिवाय गुजरीतही एका वृद्धेच्या घरात घुसून चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबवली होती. या सहा चोऱ्यांमधील गुजरीतील चोरीचा पोलिसांनी छडा लावला. अन्य चोऱ्यांची उकल करण्याचे आव्हान कायम आहे. लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरीच्या हद्दीत तुलनेने कमी चोऱ्यांची नोंद आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात चोरीच्या दोन घटनांची नोंद आहे. यातील एका चोरीची पोलिसांनी उकल केली. राजारामपुरीतही दोन चोरीच्या घटनांची नोंद आहे. करवीर पोलिस ठाण्यात मात्र मे महिन्यात एकाही चोरीची नोंद नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चोरट्यांनी लांबवला ७० लाखांचा मुद्देमाल
गेल्या महिन्याभरात चोरट्यांनी केलेल्या चोऱ्यांमध्ये सुमारे ७० लाखांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. यात रोख रकमेसह गंठण, मंगळसूत्र, अंगठ्या, सोनसाखळ्या, चांदीचे दागिने, चांदीची भांडी, मोबाइल अशा किमती वस्तूंचा समावेश आहे. चोरट्यांनी न्यू पॅलेस परिसरात भरदिवसा चोऱ्या करून अपार्टमेंटमधील सुरक्षाव्यवस्थेचा फज्जा उडवला, तर कुत्र्याला गुंगीचे औषध घालून घरफोडी करून पोलिसांना आव्हान दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट