गावातील अरुंद रस्त्यांवरून खोदाई करताना घरांना पोहचणारा धोका, वाहतूक पूर्णपणे बंद होणार असल्याने त्यासाठी नसलेला पर्याय, शेतजमिनींमधून जाणाऱ्या पाइपलाइनबाबत महापालिका प्रशासनाकडून काहीच न मिळालेला प्रतिसाद यामुळे थेट पाइपलाइन योजनेतील देवाळे, तुरंबे, कपिलेश्वर, सोळांकूर, पनोरी येथील ग्रामस्थांचा विरोध कायम आहे. या पाच ठिकाणच्या ग्रामस्थांशी अजून चर्चा झाली नसल्यामुळे तसेच इरिगेशनच्या मंजुरीअभावी २८ किलोमीटरच्या पाइपलाइनच्या कामाबाबत अनिश्चितता आहे. यातील काही गावांत काम सुरू करण्याचे आदेश आयुक्त व पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना दिले. त्यामुळे वादाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने निकृष्ट कामाचा आरोप करत थेट पाइपलाइन योजनेचे काम बंद पाडले होते. त्यानंतर महापौर हसीना फरास, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पदाधिकारी व नगरसेवकांसह मंगळवारी पुईखडीपासून थेट पाइपलाइन योजनेच्या काळम्मावाडी धरणापर्यंतच्या मार्गावरील कामाची पाहणी केली. ग्रामस्थांनी केलेल्या विरोधासह अधिकारी, कंत्राटदाराच्या प्रतिनिधींनी तांत्रिक अडचणीही त्यांच्यासमोर मांडल्या.
देवाळेत काळ्या मातीत टाकलेल्या पाइपलाइनखाली मुरुमाचा बेस करण्यात आला नसल्याची शंका व्यक्त करण्यात आली. तेथे पाइपलाइन टाकण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला. तुरंबे ते कपिलेश्वर या गावांदरम्यान पाइपलाइन शेतातून, प्रचंड वळणे घेत टाकण्यात येणार आहे. पाइपलाइन तेथे पोहोच करण्यात आल्या आहेत. पण ग्रामस्थांच्या विरोधामुळे काम थांबले आहे. कपिलेश्वर गावातील मुख्य रस्ता २० फूट रुंदीचा आहे. तेथे खोदाई करायची असल्यास शेजारील जुन्या घरांना धोका पोहोचणार आहे. तेथील मुख्य रस्ताच बंद होणार असल्याने वाहतुकीसाठी अन्य पर्याय नाही. रस्त्याशेजारी तलाव असून खोदाईमुळे त्यातील पाणी वाहून जाऊन दुसऱ्या बाजूच्या घरांना, शेतीला फटका बसण्याची भीती ग्रामस्थांनी महापौर, आयुक्तांसमोर व्यक्त केली. काम करताना होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी महापालिकेने उचलावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी ग्रामस्थांची महापालिकेत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
सोळांकूरमधील पाइपलाइन नेमक्या कोणत्या रस्त्यावरुन टाकायची याची अजून अधिकाऱ्यांच्या स्तरावर चर्चाच आहे. सोळांकूरमधील मुख्य रस्ता अरुंद आहे. तिथून पाइप टाकल्यास शेजारील घरांना धोका होईल. त्यामुळे परीट गल्लीतून पर्यायी मार्ग सुचविण्यात आला. मात्र हा मार्ग अधिक धोकादायक असल्याने नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे नेमकी पाइप कुठून टाकायची हा प्रश्न अनुत्तरीत आहे. दोन्ही मार्गांना पर्याय म्हणून शेजारच्या डोंगरातून गेलेल्या कॅनॉलच्या बोगद्याजवळून पाइप टाकता येते का याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र ‘आता वारंवार मार्ग बदलणे तांत्रिकदृष्ट्या योग्य होणार नाही. मुख्य रस्त्यावरील वाहतुकीबाबत काही पर्याय करता येतो का ते पाहून तिथूनच पाइपलाइन टाकण्यात येईल’, असे आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले. मात्र याबाबत मुख्य रस्त्यावरील नागरिकांशी चर्चा झालेली नाही.
पनोरी येथेही नंदकुमार सूर्यवंशी व अन्य चार शेतकऱ्यांच्या शेतातून पाइपलाइन टाकण्यात येणार असल्याने त्यांनी विरोध केला आहे. त्याबाबत नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी आहे. मात्र ही जागा संपादन केली जात नसल्याने भरपाई देण्याची व्यवस्था नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे सूर्यवंशी यांनी अन्य शेतकऱ्यांशी चर्चा करू असे सांगून याबाबत निर्णय दिलेला नाही. याशिवाय ठिकठिकाणी कॅनॉलवरून पाइप टाकण्यासाठी पूल बांधायचे आहेत. तेथील परिसराची पाहणी करुन अधिकाऱ्यांना काम सुरू करण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
पदाधिकाऱ्यांचे भावनिक आवाहन
ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे योजनेचे काम थांबले असल्याने महापौर हसीना फरास, उपमहापौर अर्जुन माने यांच्यासह आदिल फरास यांनी ठिकठिकाणच्या ग्रामस्थांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरवासियांचा पाणीप्रश्नी गेली ४० वर्षे झगडा सुरू आहे. या योजनेमुळे ज्या समस्या येत असतील तर त्याबाबत चर्चा करू. मार्ग काढू, पण काम थांबवू नका. कोल्हापूरकरांसाठी कामाला चालना मिळेल अशी पाऊले उचलावीत. ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. त्यावर अनेक ग्रामस्थांनी, आमचा योजनेला विरोध नाही. पण होणाऱ्या नुकसानीबाबत महापालिकेने जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.
झालेले काम तपासू
‘यापूर्वी झालेल्या कामाबाबत साशंकता असल्याने काम खोदून काढून नेमके कसे काम झाले आहे हे आम्ही तपासणार आहे. याबाबतची कल्पना आयुक्तांना देण्यात येईल’ असे सांगून महापौर हसिना फरास यांनी ‘आयुक्त डॉ. चौधरी यापुढे लक्ष घालणार असल्याने काम व्यवस्थित होईल’, असा विश्वास व्यक्त केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट