जिल्हा नियोजन मंडळाच्या ४० जागांसाठी जुलै महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी मतदारांची यादी निश्चित झाली आहे. त्यावर हरकतींची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मतदारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर एक महिन्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान जुलैमध्येच होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका यांची नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर नियोजन मंडळाची निवडणूक होते. यासाठी मतदानही सभागृहातील सदस्यांमधूनच होते. कोल्हापूर जिल्ह्यात मंडळाच्या ४० जागा आहेत. त्यासाठी ही निवडणूक होणार आहे. यातही महिला राखीव, अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव जागा असणार आहेत. मंडळाची २०१३ मध्ये झालेली निवडणूक बिनविरोध झाली होती.
यंदाच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांत लोकप्रतिनिधींच्या सभागृहांमध्ये मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यातील मतदारांना हरकती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता ही यादी अंतिम झाली असून, ती राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. सरकारकडून अंतिम मंजुरी आल्यानंतरच उमेदवारी अर्ज भरणे, छाननी, माघार ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे त्यासाठी एकूण दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून प्रत्यक्ष जुलै महिन्यातच मतदान होणार आहे.
अंतिम मतदार यादीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासंदर्भात हरकती मागविल्या होत्या. केवळ एका मतदाराच्या नावातील बदलाला हरकत होती. मतदार यादी सरकारकडे पाठविल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
- सरिता यादव, जिल्हा नियोजन अधिकारी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट