जोतिबा डोंगरावरील चैत्र पोर्णिमा यात्रेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी ही माहिती दिली. वाडी रत्नागिरी येथील यात्रेच्या तयारीचा आढावा त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.
डॉ. सैनी म्हणाले, ‘चैत्र पोर्णिमा यात्रा सुरळित आणि सुरक्षितपणे पार पडावी यादृष्टीने सर्व यंत्रणांनी तयारी पूर्ण केली आहे. या पुढील काळात सर्व यंत्रणांनी अधिक सज्ज आणि सतर्क रहावे. यात्रा कालावधीत डोंगरावर सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून काम करावे. जोतिबा डोंगरावर प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. खोबरे - वाटीला बंदी आहे. दुकानांमध्ये अग्निशमन यंत्रे बंधनकारक केली आहेत. भाविकांसाठी चारचाकी तसेच दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्रपणे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. २० ठिकाणी पार्किंग स्पॉट निश्चित केले आहे. याबरोबरच वाहतूक व्यवस्था, दर्शन रांग, बॅरेटिंग, सुरक्षा व्यवस्था, पाणीपुरवठा व स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, विद्युत, रस्ते विकास आदी सर्व व्यवस्थांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली.
यावेळी माजी मंत्री विनय कोरे म्हणाले, ‘भाविकांच्या रुढी आणि परंपरा जोपासून यात्रा काळात नियोजन करण्यास प्राधान्य द्यावे. भाविकांना त्रास होऊ नये अशी वाहतूक व्यवस्था करावी. भाविकांना पालखी तसेच सासनकाठीचेही दर्शन सुलभ होईल यादृष्टीने नियोजन व्हावे.’
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणार खेमनार, प्रांताधिकारी अजय पवार, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, देवस्थान कमिटीच्या सदस्या संगीता खाडे, सचिव विजय पवार, तहसीलदार रामचंद्र चोबे, नायब तहसिलदार आनंत गुरव, गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे, सरपंच रिया सांगळे, वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ, सर्व विभागांचे अधिकारी, पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
उष्माघाताचा धोका टाळण्याची सूचना
सध्या उन्हाचा कडाका वाढला असून उष्माघाताचा धोका गृहित धरून प्रशासकीय यंत्रणांनी विशेषतः आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली. आरोग्य विभागाने उष्माघाताबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. औषधांचा आणि लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करण्याबरोबरच अँम्ब्युलन्स, स्ट्रेचर या गोष्टी प्राधान्यक्रमाने भाविकांना उपलब्ध होतील याची दक्षता घेण्याची सूचना केली.
चोख बंदोबस्त
यात्राकाळात पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याचे अधिक्षक महादेव तांबडे यांनी सांगितले. यात्रा कालावधीत खास पथके, सीसीटीव्ही कॅमेरे, सुसज्ज व्हॅनची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. भुरटे चोर, पाकिटमारांचा बंदोबस्त करण्यासाठी विभाग सतर्क आहे असे ते म्हणाले.
कृती आराखड्याची अंमलबजावणी
यात्रेनिमित्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने उपाययोजनांचा कृती आराखडा राबविण्यास सुरूवात केली आहे. यात यात्रा काळात १०० तात्पुरती शौचालये, ३०० सुरक्षा रक्षक, २५ वॉकीटॉकी, २० वाहनतळ, २० सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, ४५ हॅलोजन, ४० केएमटी बस, अग्निशमन यंत्रणा यांचा समावेश आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट