Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

​प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पासपोर्ट ही आता केवळ चैन उरली नसून ती गरज बनली आहे. पासपोर्टची वाढती मागणी पाहता प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या दीड महिन्यात​ राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये पासपोर्ट केंद्र कार्यान्वित होणार असल्याचे परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी जाहीर केले.

कोल्हापूर येथील मुख्य पोस्ट कार्यालयात महाराष्ट्रातील पहिल्या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद‍्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. ज्ञानेश्वर मुळे बोलत होते. यावेळी खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक खासदार संभाजीराजे छत्रपती, महापौर हसीना फरास, पोस्टमास्टर जनरल विनोदकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पुण्याचे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार आदी प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. मुळे म्हणाले, ‘सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात केवळ साडेसात लाख नागरिकांकडेच पासपोर्ट आहे. पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूरच्या नागरिकांना पासपोर्टसाठी पुण्याला जावे लागत असल्यामुळे वेळ आणि पैसे खर्च होत होते. मात्र या सेवाकेंद्रामुळे वर्षाकाठी कोल्हापूरकरांचे दहा ते पंधरा कोटी रुपयांची बचत होणार आहे. एखाद्या विकासकामासाठी लोकप्रतिनिधी एकत्र आल्यास उत्कृष्ट काम होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून पासपोर्ट सेवा केंद्राचे नाव घेता येईल. रोज ५० नागरिकांना पहिल्या टप्प्यात पासपोर्ट वितरणाची सुविधा मिळणार असून भविष्यात हा विस्तार वाढवण्यात येणार आहे असे सांगून डॉ. मुळे म्हणाले, ‘पासपोर्ट, हायकोर्ट आणि एअरपोर्ट या तीन गोष्टी पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास कोणीही रोखू शकत नाही,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘विविध कारणांनी परदेशात जावू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यासाठी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रामुळे पासपोर्ट मिळणे सोपे होणार आहे. कोल्हापुरात हे केंद्र तातडीने होणे गरजेचे होते. पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले.’

खासदार संभाजी राजे म्हणाले, ‘पासपोर्ट केंद्राप्रमाणेच कोल्हापूरचे प्रश्न सुटावेत यासाठी राजकारण विरहीत प्रयत्न करण्यात येतील.’

खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘पासपोर्ट प्रक्रिया सोपी व्हावी, एजंटगिरी नाहीशी व्हावी आणि सेवा अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी. सविनय कायदेभंगाचे गुन्हे असणाऱ्यांना पासपोर्ट देण्याबाबतचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने सकारात्मक घ्यावा,’ असे आवाहन केले.

धनंजय महाडिक म्हणाले, ‘कोल्हापुरातील पासपोर्ट केंद्र बंद झाल्यानंतर कोल्हापूरकरांची होणारी गैरसोय पाहिली आहे. दरडोई उत्पन्नामध्ये देशात दुसऱ्या स्थानावर असलेल्या कोल्हापुरात पासपोर्ट केंद्र असावे यासाठी पाठपुरावा केला आणि तो यशस्वी झाला. आता पोलिस पडताळणी प्रक्रिया शि​थील करण्यासाठी बैठक घेऊ.’ यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ​अमित सैनी, विनोदकुमार शर्मा, अतुल गोतसुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रक्रिया सोपी होणार

सविनय कायदेभंगाचे गुन्हे अनेकांवर आहेत,अशा स्थितीत सर्व सामान्यांच्या हक्कासाठी लढा देणारे सामान्य कार्यकर्ते पासपोर्ट सुविधेपासून वंचित राहू नयेत यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही डॉ. मुळे यांनी यावेळी सांगितले. पासपोर्टची प्रक्रिया सोपी करण्यासाठी अनेक बदल करण्यात आल्याचे सांगून आता काही मोजकीच कागदपत्रे स्वसाक्षांकित करुन घेतली जातात.

आमच्यावरही गुन्हे

पासपोर्ट वितरण प्रकियेतील महत्त्वाचा भाग असलेल्या पोलिस पडताळणीमध्ये संबंधित अर्जदाराच्या नावावर कोणता गुन्हा नोंद आहे का हे तपासले जाते. यावरून व्यासपीठावर चांगलीच खसखस पिकली. खासदार महाडिक म्हणाले, ‘कोल्हापूर हे चळवळीचे आणि आंदोलनाचे शहर आहे. सामा​जिक कार्यासाठी रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते कोल्हापुरात आहेत. विद्यार्थी चळवळीही सातत्याने होत असतात. त्यामुळे अशा आंदोलनातून गुन्हे नोंद असतील त्यामध्ये शिथीलता आणावी. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अनेकांवर असा सविनय कायदेभंगाचा गुन्हा नोंद असेल. माझ्यावरच काही सामाजिक गुन्हे नोंद आहेत. राजू शेट्टी यांनीही माझ्यावर ४२ गुन्हे नोंद असल्याने मी परदेशी कसा जाणार? असा सवाल करताच हशा पिकला.

फॉर्म भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष लवकरच

पासपोर्ट मिळण्यासाठीच्या प्रक्रियेला येणाऱ्या खर्चापेक्षा एक रुपयाही कुणाला देऊ नका असे आवाहन करत डॉ. मुळे यांनी सांगितले की, पासपोर्टसाठी अर्ज भरण्याची पद्धत ज्यांना अवगत नाही त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्षही लवकरच तयार केला जाणार आहे. सध्या पोस्ट ऑफ‌िस केंद्रातील अधिकारी व कर्मचारी शंका निरसन करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर-वैभववाडी पायाभरणी लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोल्हापूर-वैभववाडी या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाची पायाभरणी आजच करू शकलो असतो. पण, हा प्रकल्प सुरू करताना संपूर्ण तयारीनेच सुरू करणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत प्रकल्पाचा पायभरणी कार्यक्रम करू,’ अशी निःसंदिग्ध ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे दिली.

मध्य रेल्वेच्या विविध विकासप्रकल्पांचा प्रारंभ आणि लोकार्पण सोहळा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर रेल्वेस्टेशनवर झालेल्या या कार्यक्रमात प्रभू यांच्याहस्ते रिमोट कंट्रोलद्वारे प्रारंभ व लोकार्पण कार्यक्रम झाला. कार्यक्रमास खासदार संभाजीराजे छत्रपती, धनंजय महाडिक, राजू शेट्टी यांच्यासह खासदार प्रकाश हुक्केरी, महापौर हसीना फरास, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. शर्मा आदी प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर-वैभववाडी प्रकल्पाबाबत रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले, ‘या प्रकल्पामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचाही फायदा आहे. कोल्हापूरचे उद्योजक, व्यापारी यांना यामुळे व्यवसायवृद्धीच्या संधी मिळणार आहेत. पूर्वी ‘पश्चिम महाराष्ट्राचा विकास, कोकण भकास,’ अशा घोषणा कोकणात दिल्या जायच्या. आता मात्र, या रेल्वे प्रकल्पामुळे कुणीच भकास राहणार आहे. यामुळे संपूर्ण राज्याचा आणि देशाचा फायदा होणार आहे. आजच जयगड बंदरला रेल्वेने जोडण्याच्या पायाभरणी समारंभ झाला. त्यामुळे भविष्यात जयगडही कोल्हापूरशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहे.’

‘पूर्ण तयारीनंतरच पायाभरणी’

रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले, ‘पूर्वी एखाद्या रेल्वे प्रकल्पाची घोषणा म्हणजेच प्रकल्प अशी परिस्थिती होती. अनेकदा प्रकल्पाच्या घोषणा व्हायच्याआधी पायाभरणी समारंभ व्हायचे. कोल्हापूर-वैभववाडी प्रकल्प मात्र मी पूर्ण, पैशांची तरतूद आणि प्रकल्पाचा संपूर्ण प्लॅन करूनच सुरू करणार आहे.’ रेल्वेसाठी राज्याला ४०८ पटीने जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत ५० हजार कोटी रुपयांच्या कामाची सुरुवात करण्यात आल्याचेही प्रभू यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक निकषावर आरक्षण हवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जातीवर आधारित आरक्षण न देता गरज आणि आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, अशा मागणीचा सूर शनिवारी आरक्षण परिषदेत उमटला. त्यासाठी देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्याचेही आवाहन करण्यात आले.

लोकमंच संस्थेतर्फे येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आरक्षण परिषद झाली. आरक्षण विषयावर काम करणारे विविध राज्यातील मान्यवर उपस्थित राहून परखडपणे मते मांडली.

आरक्षण विरोधी चळवळीचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजप अनुसूचित मोर्चाचे प्रमुख शांत जाटव (गाझियाबाद) म्हणाले, ‘इंग्रजांनी खऱ्या अर्थाने आरक्षणाचे ब‌िजारोहन केले. त्यानंतर विविध राज्यात जातनिहाय जनगणना होऊन आरक्षण देण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांनीही आरक्षणाची संकल्पना मांडली. वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले. लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली. जाती जातींमधील दरी कमी करण्यासाठी जातीच्या आधारावर आरक्षण देऊ नये. परिस्थिती, आर्थिक निकषावर आरक्षण‌ मिळावे, यासाठी पंतप्रधानांना पत्र पाठवावे.’

भारतीय आरक्षण मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोकुमार पांडे (उत्तर प्रदेश) म्हणाले, ‘आरक्षणाचा विषय राजकीय केला जात आहे. नेते राजकीय स्वार्थापोटी दिशाभूल करीत आहेत. पण जनतेला वास्तव समजले आहे. त्यामुळे नेत्यांच्या भूलथापांकडे आता दुर्लक्ष होत आहे. वर्षानुवर्षे एकाच घटकाला आरक्षणाचा लाभ मिळत आहे. इतर गरीब, मागास समाजासही आरक्षण मिळावे.’

राष्ट्रीय आझाद मंचचे महासचिव स्वागतिका पती (मध्यप्रदेश) म्हणाल्या, ‘राष्ट्रीय स्तरावर आरक्षणावर समिक्षा होणे काळाची गरज आहे. आरक्षणाचा फायदा उठवत अनेक नेते मोठे झाले. पण त्यांच्याच समाजातील वंचित घटक आजही विकासापासून लांब आहे. त्याचाही‌ विचार झाला पाहिजे. सर्वच क्षेत्रात समान संधी ‌मिळण्यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे.’

प्रा. मधुकर पाटील म्हणाले, ‘आरक्षणामुळे मागास समाजाच्या कुटुंबात शिक्षण जाऊन पोहचले. नोकऱ्या मिळाल्या. पण दुसऱ्या बाजूला आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजात बेरोजगारी वाढते आहे. गुणवत्ता असूनही संधी मिळत नाही. शेतीची तुकडे पडल्याने आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. दुष्काळ पिकू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही, अशी अवस्था मराठा समाजाची झाली आहे. यामुळे आरक्षणाची समीक्षा झाली पाहिजे. त्यावर खुलेपणाने विचार मांडले पाहिजे.’

यावेळी शिप्रा चक्रवर्ती यांचेही भाषण झाले. आयोजक सुनील मोदी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी परिषदेचा हेतू स्पष्ट केला. परिषदेस पारस ओसवाल, विजय देवणे, संजय पवार आदी उपस्थित होते.


मोठा पोलिस बंदोबस्त…

परिषदेला सुरुवातीला विरोध झाला होता. त्यामुळे परिषदेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोठा पोलिस बंदोबस्त ‌राहिला. खासगी सुरक्षा रक्षकही तैणात होते. निमंत्रित शेकापचे प्रवीण गायकवाड या परिषदेला गैरहजर राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेआठ लाख कोटींची गुंतवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रेल्वे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा घटक असून, देशभरात रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी ८ लाख ५६ हजार कोटींचा गुंतवणूक कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राला न्याय देण्याच्या भुमिकेतून राज्यात १ लाख ३६ हजार कोटी रेल्वे विकासासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात विकासाची रेल्वे वेगाने धावेल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला.

रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले, ‘रेल्वे वाईट स्थितीत अडकली होती. निधी नाही म्हणून गुंतवणूक नाही. गुंतवणूक नाही त्यामुळे उत्पन्न नाही आणि उत्पन्न नसल्याने विकासाच्या योजना नाहीत, अशा स्थितीतून रेल्वेला बाहेर काढण्यासाठी देशापातळीवर रेल्वेमध्ये ८ लाख, ५६ हजार कोटीच्या गुंतवणुकीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम तयार केला आहे. महाराष्ट्राला अधिक निधी देताना इतर कोणत्याही राज्यावर अन्यायह होणार नाही याची काळजी घेतली आहे. देशाच्या लोकसंख्येत आणि प्रगतीत राज्याचा असलेला वाटा लक्षात घेऊन हा निधी दिली आहे.’ केवळ अर्थ संकल्पावर विसंबून न राहता १.५० लाख कोटी निधी उभा करण्यात आला आहे. तर, अडीच वर्षांमध्ये रेल्वेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अर्थ संकल्पाच्या माध्यमातून ३.५० लाख कोटी रुपयांचा निधी उभा केल्याची माहिती रेल्वेमंत्री प्रभू यांनी दिली. यातूनच देशभरातील ४०० रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘आजच अॅक्शन प्लॅन’

रेल्वेमंत्री कोल्हापुरात येणार असल्याने त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी प्रवासी संघटना, उद्योजक यांनी गर्दी केली होती. खासदार राजू शेट्टींनीही त्यांच्या भाषणात या मागण्या ऐकून घेण्याची विनंती रेल्वेमंत्र्यांना केली होती. त्यावर कोल्हापूर संदर्भात लोकप्रतिनिधींनी केलेल्या आणि इतर सर्व मागण्यांचा विचार करून आराखडा आजच तयार करण्याच्या सूचना रेल्वेचे महाव्यवस्थापक शर्मा यांना व्यासपीठावर बोलवून दिल्या.

कोल्हापूर रेल्वे स्थानकाची दूरवस्था झाली आहे. त्याचे नूतनीकरण करण्याची गरज आहे. कोल्हापूरचे रेल्वे स्टेशन हायटेक व्हावे अशी आमची मागणी आहे. कोल्हापुरात राजस्थानी लोकाकंची संख्या लक्षणीय आहे त्यांच्यासाठी जोथपूर रेल्वे सुरू करावे, दिल्लीला जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहता निजामुद्दीन एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवाव्यात आणि ही रेल्वे अमृतसरपर्यंत नेण्यात यावी.

धनंजय महाडिक, खासदार

कोल्हापूर-पुणे प्रवासासाठी सध्या सहा तास लागतात. ट्रॅफिक असेल, तर सात तास लागतात. पुण्याशी कोल्हापूरच नव्हे, तर सांगली, मिरज, कऱ्हाड येथील लोकांची असलेली कनेक्टिविटी पाहता कोल्हापूर-पुणे शताब्दी एक्स्प्रेस सुरू व्हावी. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. पण, याबाबत रेल्वमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून लवकर निर्णय घ्यावा.

- संभाजीराजे छत्रपती, खासदार

८ लाख ५६ हजार कोटी

देशभरात रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी गुंतवणूक

१ लाख ३६ हजार कोटी

महाराष्ट्रातील रेल्वेची गुंतवणूक

४ हजार कोटी

ऊर्जेवरील खर्चातून केलेली बचत

४१ हजार कोटी

पुढील १० वर्षांत होणारी बचत

१ हजार मेगावॉट

अपारंपरिक ऊर्जेतून वीज निर्मिती

या प्रकल्पांचे उद्‍घाटन

- सांगलीतील विश्रामबाग ते माधवनगर रस्त्यावरील उड्डान पुलाच्या कामाचा प्रारंभ

- पुणे-मिरज-लोंढा दुहेरीकरणाचे कोनशिला अनावरण

- पुणे-दौंड मार्गाचे विद्युतीकरण

- पुणे स्थानकावर जलशुद्धीकरण यंत्र,

- पुणे स्टेशनवरील सौर ऊर्जा प्रकल्प व मोफत वायफाय सुविधा

- पुणे-दौंड- बारामती विभागाच्या डीईएमयू सेवेचा प्रारंभ

कोठे किती निधी?

हातकणंगले-इचलकरंजी:१० कोटी

मुंबई-अहमदाबाद रेल्वे :७६ हजार कोटी

यवतमाळ-आचलापूर-आरवी रेल्वेसाठी: २ हजार १७७ कोटी

फलटण-पंढरपूर रेल्वे लाइनसाठी :१ हजार १४९ कोटी

देहू-आष्टीसाठी: १ हजार ५६० कोटी

हातकणंगले-इचलकरंजी नवीन लाइनसाठी :१० कोटी

पुणे-मिरज-लोंढा या ४६० किलोमीटरसाठी :४ हजार ७८६ कोटी

अहमनगर-बीड- परळीसाठी: ७८० कोटी

लातूर-कुर्डूवाडी-मिरज विद्युतीकरणाची सुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खणीत बुडून पोलिसाच्या मुलाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाळा सुटल्यानंतर मित्रांसमवेत खणीत पोहायला गेलेल्या आदित्य संदीप आबिटकर (वय १५, नागदेव कॉलनी, फुलेवाडी) या विद्यार्थ्याचा शनिवारी बुडून मृत्यू झाला. शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्मचारी संदीप आबिटकर यांचा तो मुलगा होता. फुलेवाडी रिंगरोड पाडळी रोडवरील व्हटकर खणीत शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

अदित्य पाडळी खुर्द रोडवरील अल्फान्सो स्कूलमध्ये नववीत शिकत होता. शनिवारी सकाळी तो शाळेला गेला होता. शाळा सुटल्यानंतर मित्रांसमवेत तो फुलेवाडी रिंगरोड परिसरातील कोतवालनगर येथील व्हटकर खणीत पोहायला गेले. अदित्यला पोहायला येत होते. तो व त्यांचे तीन मित्र पाण्यात उतरले पण काही वेळाने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. अदित्यला वाचवण्यासाठी मदतीसाठी मित्रांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. खणीशेजारी असलेल्या शेतातील मजूर खणीकडे धावले मात्र, तोपर्यंत अदित्य बुडाला होता. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. करवीर पोलिस व अग्निशमन दलाला वर्दी देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अदित्यचा मृतदेह बाहेर काढला. करवीर पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद झाली आहे. अदित्यच्या पश्चात वडील, आई व लहान भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्ची निघाली दहावीच्या परीक्षेला

$
0
0

पंढरपूर : सैराट चित्रपटामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनलेली अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिची मंगळवारपासून दहावीच्या परिक्षा सुरू झाली. अकलूजच्या शाळेत तिचा परीक्षा क्रमांक आल्याने मुख्याध्यापिका मंजुषा जैन आणि शिक्षकांनी तिचे गुलाबपुष्प देत स्वागत केले.

सैराट चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे तिचे शिक्षण थोडेसे बाजूला पडले होते. शूटिंगच्या कालावधीतही घरी अभ्यास करून तिने नववीला ९० टक्के गुण मिळवीत आपली अभ्यासातील गुणवत्ता सिद्ध केली होती. मात्र, सैराटनंतर तिला तिच्या शाळेलाही जाणे चाहत्यांमुळे अवघड बनू लागल्यावर तिने अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशाला या शाळेतून आपले नाव काढून बाहेरून दहावीची परीक्षा देण्यासाठी १७ नंबर फॉर्म भरला होता. सैराटाच्या कानडी रिमेकमध्येही ती काम करीत असल्यामुळे दहावीच्या महत्वाच्या वर्षातील ८ ते ९ महिने शूटिंगमध्ये गेले होते. त्यानंतर आर्चीने गेल्या दीड महिन्यात तिने अभ्यासावरच लक्ष केंद्रित करून दहावीच्या परीक्षेची तयारी केली आहे.

वर्षभराच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच पेपर देत आहे. शूटिंग संपल्यानंतर अभ्यासाठी जेमतेम दीड-दोन महिन्यांचा वेळ मिळाला, त्यात होईल तितका अभ्यास केला. परीक्षेच्या निमित्ताने मैत्रिणींना भेटता आले, याचा आनंदही घेत आहे.

- आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरच्या महापौरपदी शोभा बनशेट्टीउपमहापौरपदी शशिकला बत्तुल, भाजप सत्ताधारी; शिवसेना विरोधात

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी शोभा बनशेट्टी; तर उपमहापौरपदी शशिकला बत्तुल यांची निवड करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली; तर शिवसेना विरोधात बसणार आहे. असे असले तरी मुंबईच्या धर्तीवर सोलापुरात शिवसेना आणि भाजप हातात हात घालूनच काम करणार आहेत. काँग्रेस पक्षाला पदांपासून दूर ठेवण्यासाठी भाजप-सेनेने ही खेळी केली आहे.

महापौर आणि उपमहापौरपदासाठी चौरंगी सामना होणार होता. मात्र, एमआयएमने आपले उमेदवार माघार घेतल्याने तिरंगी सामना झाला. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या शोभा बनशेट्टी यांनी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम आणि काँग्रेसच्या प्रिया माने यांचा पराभव केला. बनशेट्टी यांना अपेक्षेप्रमाणे ४९ मते पडली. अंकाराम यांना २१; तर माने यांना १८ मते मिळाली. एमआयएमच्या उमेदवार नगरसेविका नूतन गायकवाड यांनी माघार घेतली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या शशिकला बत्तुल यांनी सेनेचे नगरसेवक अमोल शिंदे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक किसन जाधव यांचा पराभव केला. बत्तुल यांना ४९, शिंदे यांना २१; तर जाधव यांना १८ मते मिळाली. एमआयएमचे नगरसेवक अझहर हुंडेकरी यांनी माघार घेतली. महापौर आणि उपमहापौर या दोनही पदांच्या निवडीसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. सर्वाधिक ४९ जागा जिंकणाऱ्या भाजपने मनपात सत्ता स्थापन केली. बहुमतासाठी ५३ आकडा अपेक्षित होता, मात्र संख्याबळानुसार भाजप सत्तेत आला. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत एमआयएम, बसपा आणि माकपाने मतदान न करता तटस्थ राहणे पसंत केले. पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी काम पाहिले.

दरम्यान, २१ सदस्य असलेला शिवसेना पक्ष विरोधी बाकावर बसला. जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी यशस्वी खेळी करीत काँग्रेसला ऐनवेळी खिंडीत गाठले आणि बाजूला ठेवण्यात यश मिळविले. महापौर आणि उपमहापौर या दोनही पदाचा कालावधी सव्वा वर्षांचा ठेवण्यात आला असून, तसे राजीनामा पत्र दोन्ही पदाधिकाऱ्यांकडून लिहून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मनपा सभागृहात येऊन महापौर आणि उपामहापौर यांचे अभिनंदन करून स्वच्छ आणि पारदर्शी कारभारासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, सरचिटणीस दत्तात्रय गणपा यांच्यासह शोभा बनशेट्टी यांचे वडील माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, पती श्रीशैल बनशेट्टी यांच्यासह बनशेट्टी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या ५० वर्षांची काँग्रेस पक्षाची सत्ता नेस्तनाबूत करून भाजपने सोलापूर महानगरपालिकेत एकहाती सत्ता स्थापन करून कमळ फुलविण्यात यश मिळविले आहे.

महेश कोठे विरोधी पक्षनेते

भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर सलग आठ वेळा निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांची सभागृहनेतेपदी वर्णी लागली. तर सेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक महेश कोठे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली. या शिवाय बसपाच्या गटनेतेपदी नगरसेवक आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी गटनेतापदी किसन जाधव, काँग्रेस गटनेतापदी चेतन नरोटे तर एमआयएमच्या गटनेतापदी नगरसेविका नूतन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

असे आहेत स्थायी समिती सदस्य

स्थायी समिती सदस्यपदी भाजपचे रवी गायकवाड, श्रीनिवास रिकमल्ले, नागेश वल्याळ, संजय कोळी, श्रीनिवास करली, राजश्री बिराजदार, मीनाक्षी कंपली, मनीषा हुच्चे तर काँग्रेसचे नरसिंग कोळी आणि प्रवीण निकाळजे या शिवाय शिवसेनेचे महेश कोठे, विठ्ठल कोटा आणि गुरुशांत धुत्तरगावकर, बसपाचे आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे नागेश गायकवाड आणि एमआयएमचे तौफिक शेख यांची निवड करण्यात आली.

परिवहन समिती सदस्य

भैरण्णा भैरमडगी, दैदिप्य वडापुरकर, संतोष कदम, गणेश जाधव, विरेश उंबरजे आणि मल्लेश सरगम (भाजप), परशुराम भिसे, तुकाराम मस्के आणि विजय पुकाळे (शिवसेना), नितीन भोपळे आणि भीमाशंकर टेकाळे (काँग्रेस) आणि झाकिरहुसेन सगरी (एमआयएम) यांची निवड करण्यात आली. बसपा आणि राष्ट्रवादी हे दोनही पक्ष परिवहमधून आउट झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​शिखर शिंगणापूरजवळसामूहिक बलात्कारएकाला अटक

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

मित्राबरोबर फिरायला गेलेल्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर शिखर शिंगणापूरजवळ घाटात तीन दिवसांपूर्वी सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी सुनील माने याला अटक करण्यात आली असून, अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.

पीडित विद्यार्थिनी अकलूज परिसरातील एका शिक्षण संस्थेत डिप्लोमा इंजिनिअरिंग शिकत आहे. ती व तिचा मित्र आठ मार्च रोजी सकाळी दुचाकीवरून शिखर शिंगणापूरला दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन परतताना घाटात थांबून ते दोघे बोलत होते. त्यावेळी आरोपीने जोडीदारासह त्यांना धमकविले. मित्राला पीडितेबरोबर बळजबरी करायला लावून त्याचे मोबाइलमध्ये शुटिंग केले. त्या नंतर हे शुटिंग व्हायरल करण्याची धमकी देत दोन्ही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. या नंतर दोघांचे मोबाइल, पैसे दागिने काढून घेऊन त्यांना सोडून दिले. मात्र, काढून घेतलेले ओळखपत्र व मोबाइल परत देण्यासाठी दहा मार्च रोजी दहा हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे नेण्यासाठी आलेला आरोपी माने यास लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

अटक करण्यात आलेला सुनील माने यास कोर्टाने १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शिखर शिंगणापूर येथील घाटात जोडप्याने लुटण्यात येत असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा खासगीकरणावरूनसोलापुरात ‛पारदर्शी’ कारभार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गहण बनत चालला आहे. भाजपाची सत्ता आल्यानंतर पहिल्याच दिवशी भाजपच्या पारदर्शक कारभाराची लक्तरे वेशीवर टांगत मनपा प्रशासनाने चढ्या दराने खासगी ठेकेदाराबरोबर कचरा संकलनाचा करार करून भाजपाला आहेर दिला आहे. नेमण्यात आलेला ठेकेदार भाजपच्या एका नेत्याचा जवळचा असून, त्याच्याकडे कचरा उचलण्याचे कोणतेही साहित्य नसताना प्रशासनाने करार केलाच कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

मोठ्या प्रमाणावर मलिदा मिळत असल्यानेच अधिकाऱ्यांनी साखळी करून त्याच ठेकेदाराबरोबर करार केल्याने पालकमंत्री विजयकुमार देशमुखही संतापले असून, खासगीकरणाला त्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.

शहरात दररोज सुमारे साडे तीनशे ते चारशे टन कचरा साचतो. हा कचरा उचलण्यासाठी मनपाने या पूर्वी समीक्षा कंपनीला टेंडर दिले होते. त्यांच्याबरोबर दहा वर्षांचा करार करताना प्रतिटन ६५० रुपयांचा दर दिला होता. कचरा उचलण्यासाठीची सर्व यंत्रणा या कंपनीकडे होती. दररोज ४२० टन कचरा उचलला जात होता, त्या बदल्यात समीक्षाला २ लाख ७३ हजार रुपये दिले जात होते. परंतु, तक्रारी करून प्रशासनाने समीक्षा कंपनीचा ठेका रद्द करून त्या ठिकाणी यशश्री इंटरप्रायझेसचे अश्विन मानवी यांच्याबरोबर करार केला हा करार केला. त्यांना प्रतिटन तब्बल १६७० रुपये देण्याचे ठरविले. यशश्री मार्फत दररोज २१० टन कचरा उचलण्यात येणार असून, त्यांना मनपा दररोज सुमारे ३ लाख ५० हजार ७०० रुपये मोजणार आहे. या शिवाय दुसरा ठेका ग्लोबल कंपनीला मंजूर केला असून, त्यांना प्रतिटन १६८० रुपये दर देण्यात आला आहे. २१० टन कचरा उचळण्यापोटी दररोज त्यांना सुमारे ३ लाख ५२ हजार ८०० रुपये मिळणार आहेत. केवळ पावणेतीन लाखात होणारे काम प्रशासनाने सुमारे सात लाखांवर नेले आहे. यामध्ये पदाधिकाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपासून अनेकांचे हाथ ओले झाल्याचे समजते. कचरा खासगीकरणाला या पूर्वी भाजपने कडाडून विरोध केला होता. आता मात्र खासगीकरण होऊनही भाजप पदाधिकारी काहीही बोलत नसल्याने संशय बळावला आहे. या पूर्वीचा ठेकेदार असलेल्या समीक्षा कंपनीला ठेका मंजूर करताना वार्षिक दरवाढ ३ टक्के ठरविण्यात आली होती. मात्र, यशश्री आणि ग्लोबल यांच्याशी करार करताना वार्षिक दरवाढ तब्बल १० टक्के ठरविण्यात आली असल्याने मोठे गौडबंगाल झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. समीक्षा कंपनीचा करार कायदेशीर संपला नसताना आता तिसऱ्यांदा मनपाने करार करून वादाला तोंड फोडले आहे.

दरम्यान, समीक्षा कंपनीला पहिल्या वर्षी सुमारे ९ कोटी ९६ लाख ४५ हजार मिळाले होते. आता नव्याने करार झाल्यामुळे यशश्री आणि ग्लोबल या दोघांना सुमारे २५ कोटी ६७ लाख ७७ हजार ५०० रुपये इतकी घसघशीत रक्कम मिळणार आहे. या पूर्वी समीक्षा कंपनीवर पाच वर्षांत ५२ कोटी ९० लाख रुपयांचा खरच होणार होता आता, या दोन कंपन्यांवर सुमारे १५६ कोटी ७६ लाख रुपये खर्च होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धांना समजून घेतले नाहीडॉ. आ. ह. साळुंखेंनी व्यक्त केली खंतसाळुंखे, सचिन पिळगावकरांना दमानी-पटेल पुरस्कार प्रदान

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

‘गौतम बुद्धांना भारतीय समाजाने समजून घेतले नाही, ही भारतीय समाजाची खूप मोठी शोकांतिका आहे,’ अशी खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केली. साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल दमानी-पटेल प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येणारा कर्मयोगी पुरस्कार डॉ. साळुंखे आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांना मंगळवारी सायंकाळी निर्मलकुमार फडकुले सभागृहात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी डॉ. साळुंखे बोलत होते. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख ५१ हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘छोट्याशा चिमणीला जसा चिवचीवण्याचा अधिकार आहे, तसा तो प्रत्येक व्यक्तीला आहे, हे बुद्धांनी पटवून सांगितले. धर्मग्रंथ आणि धर्मगुरुने सांगितलेले तसेच ऐकीव एवढ्या कारणावरून कोणतीही गोष्ट स्वीकारू नका. स्वतःला अनुभव येईल, तेव्हा ती स्वीकारा, मानवी संस्कृतीची प्रगती ही चिकित्सक दृष्टीकोनातून झाली असून, चिकित्सा न करता आंधळेपणाने जसेच्या तसे स्वीकारणे चुकीचे आहे,’ असेही डॉ. साळुंखे म्हणाले.

अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील कार्याचा आढावा घेताना राजाभाऊ परांजपे आपले पहिले गुरू असून, त्यानंतर महान गुरुंच्या हाताखाली काम करता आले असे सांगतानाच मीनाकुमारी यांच्यामुळे आपणास उर्दू भाषा शिकता आली आणि कट्यारमध्ये त्याचा आपणास फायदा झाल्याचे सांगितले. मी ज्या क्षेत्रात आहोत ते क्षेत्र अद्यापही नीट समजूही शकलो नसल्याने राजकारणात येण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सचिन यांनी सांगितले. ज्यांना राजकारणाचे ज्ञान नाही त्यांनी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांना वाकून नमस्कार करावा, असे पिळगांवकर यांनी सांगताच एकच हशा पिकला. आदेश बांदेकर यांनी एका महिलेला भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण, असा प्रश्न विचारला असता, त्या महिलेने शरद पवार असे उत्तर दिले होते, असा किस्सा सांगत पिळगावकर यांनी आपण राजकारणात शून्य असल्याचे सांगताच सभागृह खळाळून हसले. आपण आधी भारतीय आहोत आणि नंतर महाराष्ट्रीयन आहोत, असे सांगून देशाला जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा आपण योगदान देऊ असे पिळगावकर म्हणाले. या वेळी प्रेमरतन दमानी, बिपिनभाई पटेल, दत्ता गायकवाड, बाबुराव मैदर्गीकर, डॉ. मिर इसहाक शेख, डॉ. राजेंद्र घुली, अक्षय जव्हेरी यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी पाऊस: राज्यसरकारची ४ लाखांची मदत

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. अवकाळी पावसात दगावलेली व्यक्ती शेतकरी असेल तर त्यांच्या कुटुंबियांना 'गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने'अंतर्गत दोन लाख रूपयांची मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी पंढरपूरमधील गारपीटग्रस्त भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढाव घेतला. यावेळी अवकाळी पावसात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना चार लाखांची मदत केली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. राज्यातील ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांना बसला आहे. सोलापूरमध्येही पंढरपूरसह मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमध्ये पावसासह गारपीटीने झोडपले आहे. यात द्राक्ष बागांसह ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाच जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. तर लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

द्राक्ष बागांमध्ये तयार झालेली द्राक्षे काढली जात असताना अचानक झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा द्राक्ष बागांना फटका बसला आहे. या पावसामुळे सामान्य शेतकऱ्यांसह द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे. काही ठिकाणी आंब्याचा मोहोर गळाल्यानेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​एमआयएमचे तौफिक शेखवरस्थानबद्धतेची कारवाई

$
0
0



सोलापूर

सोलापुरातील एमआयएमचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सोमवारी केली. शेख याची रवानगी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

शेख याच्याविरुद्ध १९८९पासून फेब्रुवारी २०१७पर्यंत सोलापुरातील विविध पोलिस ठाण्यात विविध कालमांतर्गत एकूण २९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गुन्ह्यातून तो निर्दोष मुक्त झाला आहे. त्याच्याविरुद्ध दोनवेळा फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई आणि चारवेळा महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून त्याने त्याच्या साथीदारांसह एमआयडीसी, सदर बझार, विजापूर नाका, जेलरोड, सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत शस्त्रनिशी फिरून खुनाचा प्रयत्न करणे, हल्ला करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, अपहरण, गैरमंडळी जमाव जमवून गैरकृत्य करणे, बेकायदा दुकान घरजागा बळकावविणे, लोकांना किरकोळ कारणावरून घातक शास्त्रनिशी मारहाण करून परिसरात दहशत निर्माण करणे आदी गुन्हे दाखल आहेत. या वरून पोलिसांनी तौफिक शेख याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. तौफिक शेख याने मागील शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात एमआयएमकडून निवडणूक लढविली होती. त्याला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्या निवडणुकीत शेख याने प्रणिती शिंदे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना नामोहरम केले होते. या शिवाय नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत तौफिक याच्या नेतृत्वाखाली एमआयएमचे ९ नगरसेवकही निवडून आले आहेत. मनपा निवडणुकीत मतदानावेळी नई जिंदगी परिसरात राष्ट्रवादीचे माजी महापौर हरून सैय्यद याला तौफिक याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून रक्तबंबाळ केले होते, त्यावेळी त्याच्याविरुद्ध आणि त्याचा मुलगा अदनान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवस तौफिक फरार होता. मात्र पोलिस आयुक्त सेनगावकार यांनी अखेर तौफिकवर स्थाबद्धतेची कारवाई केली. तौफिक हा एकेकाळी सुशीलकुमार आणि कन्या आमदार प्रणिती यांचा कट्टर समर्थक होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात काँग्रेस किंगमेकर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आज, मंगळवारी दुपारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून, दोन्ही पदे आणि सत्ता मिळविण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी आणि भाजप आघाडीने ताकद पणाला लावली आहे. भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. भाजपने आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. तर राष्ट्रवादीकडून शितलदेवी आणि स्वरूपराणी मोहिते-पाटील यांची नावे चर्चेत आहेत. खासदार विजयसिह मोहिते-पाटील आणि माजी खासदार रणजितसिह मोहिते-पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. २३ जागा जिंकून राष्ट्रवादी पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाचीच मदत घ्यावी लागणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीने २३, भाजप-शिवसेना आघाडी २२, काँग्रेस ७, स्थानिक आघाडी १०, शेकाप ३ आणि अपक्षांनी ३ जागा जिंकल्या आहेत. ६८ सदस्य संख्या असलेल्या झेडपीमध्ये सत्ता स्थापन कारण्यासाठी ३५ जागांची जुळवाजुळव करण्यासाठी खासदार विजयसिह मोहिते-पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी २३, काँग्रेस ७, शेकाप ३ आणि अपक्ष किवा स्थानिक विकास आघाडीतील काहींना बरोबर घेऊन राष्ट्रवादी सत्ता स्थापन करू शकते, असे चित्र असतानाच भाजपने झेडपी ताब्यात घेण्यासाठी संजय शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. मोहिते-पाटील विरोधक आणि विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, मंगळवेढाचे समाधान आवताडे यांनीही भाजप पुरस्कृत महाआघाडीचे संजय शिंदे यांना मदत करण्याची तयारी दर्शविली असल्याने यामध्ये त्यांना कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादीचे २३ सदस्य निवडून आले आहेत, त्यामध्ये तब्बल ८ सदस्य एकट्या माळशिरस म्हणजेच मोहिते-पाटील यांच्या तालुक्यातील आहेत. अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गटाचे म्हणजेच काँग्रेसचे सहाजण आणि आणखी एक असे सातजण ज्या पक्षाबरोबर जातात त्या पक्षाची सत्ता झेडपीत येणार आहे. त्यामुळे आमदार म्हेत्रे हे सत्तेचे किंगमेकर ठरू शकतात. आघाडी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. शरद पवार यांनी लक्ष घातल्यास आणि शिंदे यांना बोलल्यास आघाडीचा अध्यक्ष होऊ शकतो, असे चित्र आज दिसून येत आहे. राष्ट्रवादी २३, काँग्रेस ७, शिवसेना ४, शेकाप ३ असे ३७ संख्याबळाची जुळवाजुळव राष्ट्रवादी आघाडीने केली आहे. तर भाजप १४, परिचारक गट ६, भीमा परिवार ३, आवताडे गट ४, अपक्ष २, शिवसेना १ अशी ३१ जणांची जुळवाजुळव भाजप आघाडीने केली आहे. सत्तेसाठी जवळपास सहा जागा कमी पडत असतानासुद्धा माढामधील ७ सदस्य यांना गैरहजर ठेऊन भाजप आघाडीने चमत्कार घडविण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच शेकाप आणि काँग्रेस तटस्थ राहिल्यास भाजपाला विजय आणखी सोपा करण्यासाठीसुद्धा प्रयत्न सुरु असल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. एकूणच सत्तेसाठीचा मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनीही आपली ताकद पणाला लावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सैराट'मधील आर्चीची छेड काढणारा ताब्यात

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । अकलूज (सोलापूर)

'सैराट'फेम आर्ची अर्थात, रिंकू राजगुरू हिची छेड काढल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अकलूज पोलिसांनी ही कारवाई केली असून संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय घरत असं या तरुणाचं नाव असून तो ठाण्याचा रहिवाशी असल्याचं समजतं.

मराठी सिनेसृष्टीत अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या 'सैराट' चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू अल्पावधीतच स्टार झाली आहे. तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तिला भेटण्यासाठी तरुण गर्दी करत आहेत. यापूर्वीही अनेकदा तिला धक्काबुक्की झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी एका तरुणानं तिची छेड काढल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशी करून दत्ता घरत याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजे यांच्या वाहनावर दगडफेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये नशीब आजमावणाऱ्या सुमारे ८१७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मशीनबंद झाले. जिल्ह्यात २,५८३ मतदानकेंद्रांवर सुमारे ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ अपवाद वगळता सर्वच मतदानकेंद्रांवर शांततेत मतदान झाले. मतदान संपता संपता राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जावली तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाहनावर खर्शी बारामुरे येथे दगडफेक झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. या घटनेचा अपवाद वगळता मिनीमंत्रालयासाठी सातारा जिल्ह्यात अंदाजे ७० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या आदेशाप्रमाणे सुमारे चार हजार महसूल कर्मचारी निवडणूक मोहिमेवर होते. २५८३ मतदानकेंद्रांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेऊन होते. सातारा, कराड, जावली, वाई फलटण या पाच तालुक्यातील सुमारे अकराशे मतदानकेंद्रे संवेदनशील असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

सातारा व कराड तालुक्यातही मतदानाचा टक्का ६० टक्क्यांच्या पुढे सरकल्याने राष्ट्रवादीची धाकधूक वाढली असून, आमदार गट बाजी मारणार की खासदार गट याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सातारा पोलिसांनी बंदोबस्ताची जय्यत तयारी ठेवल्याने फार कोठे तणावाच्या घटना घडल्या नाहीत. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीचे पडसाद पडसाद उमटत राहिले. राजे समर्थकांनी खासदारांच्या मोटारीवर दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने साताऱ्यातही तणाव होता. पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी तसे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.

उदयनराजे यांच्या

वाहनावर दगडफेक

वली तालुक्यातील म्हसवे गटातील खर्शी बारामुरे येथे राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांच्या समर्थकांकडून खा. उदयनराजे भोसले यांच्या वाहनावर दगडफेक झाली. हे वृत्त संपूर्ण सातारा जिल्ह्यात पसरल्याने जिल्हा परिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान संपता संपता तणावाचे वातावरण निर्माण झाले. दगडफेकीचे नक्की कारण समजू शकले नाही. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा पोलिस स्टेशन गाठल्याने दोन्ही नेते पुन्हा एकदा आमने सामने आल्याची चर्चा आहे. तक्रारीची नोंद मेढा पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.

कुडाळ गटामध्ये राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. म्हसवे आणि कुडाळ येथील दोन्ही लढती राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केल्याने या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे भोसले दुपारनंतर जावली तालुक्याच्या दौऱ्यावर होते. संध्याकाळी पाचनंतर खा. उदयनराजे खर्शी बारमुरे येथे आले असता त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक झाली. ही दगडफेक राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

मेढा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी खा. उदयनराजे भोसले आले असता, कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या घटनेचे वृत्त कळताच साताऱ्यातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व वसंतराव मानकुमरे हे सुद्धा तातडीने पोलिस ठाण्यात पोहोचले. दोन्ही गटांनी मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. पी. काठाळे यांच्याशी चर्चा केली. तक्रार दाखल करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी ठिय्या दिल्याने रात्री उशिरापर्यंत मेढ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याने परिस्थिती नियंत्रणात होती.

दगडफेकीचा राजकीय ताण मेढ्याने अनुभवला. तसा त्याचे पडसाद रात्री उशिरा साताऱ्यात उमटले. दगडफेकीचे वृत्त साताऱ्यात पसरताच सुमारे दोन हजार राजे समर्थकांचा जमाव पोलिस मुख्यालय परिसरात जमा झाला. समर्थकांनी मुख्यालय परिसरात तळ देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रात्री उशिरा उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल झाले. तेव्हा काही काळ समर्थकांची गर्दी आवरता आवरता पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. उदयनराजे यांनी रात्री पोलिस अधिक्षकांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मी बांगड्या भरलेल्या नाहीत: उदयनराजेंचा संताप

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर सातारा व परिसरात तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी उदयनराजे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 'भांडणं करून काही मिळणार नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांनी शांत राहावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मात्र, 'आम्ही बांगड्या भरल्या नाहीत,' असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानावेळी उदयनराजे जावळी तालुक्यातील खुर्शी मुरा गावी भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वसंत मानकुमरे यांनी ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. तर, मानकुमरे यांनीही उदयनराजे यांच्याविरोधात मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उदयनराजेंच्या समर्थकांनी मला आणि माझ्या पत्नीला धक्काबुक्की केली. त्यामुळंच चिडलेल्या जमावानं उदयनराजे भोसलेंच्या ताफ्यावर दगडफेक केली, असं मानकुमरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

भोसले बंधू आमने-सामने

या घटनेच्या निमित्तानं उदयनराजे व शिवेंद्रराजे हे दोन भोसले बंधू आमनेसामने आले आहेत. 'आमच्या ताफ्यावरील दडगफेकीत शिवेंद्रराजेंचाच हात असल्याचा दावा उदयनराजे यांनी केला आहे. तर, साताऱ्याचे खासदार हे दहशत माजवण्यासाठी जावळीत आले होते आणि त्यामुळंच लोकांनी राग व्यक्त केला,' असं प्रत्युत्तर शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​साताऱ्यात पुन्हा राष्ट्रवादी

$
0
0



अतुल देशपांडे, कराड

सातारा जिल्हा परिषदेच्या ६४ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागांवर विजय मिळवित पुन्हा आपली हुकुमत प्रस्थापित केली आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात या वेळी भाजपने सहा जागांवर विजय मिळवित चंचूप्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपच्या या मुसंडीचा भविष्यातील राजकीय उलथापालथीची नांदी झाल्याचे मानले जावू लागले आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण ६४ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ४१, काँग्रेस ७, भाजप ६, सातारा विकास आघाडी ३ अपक्ष २, पाटण विकास आघाडी १, कराड विकास आघाडी १ व अन्य ३, असे पक्षीय बलाबल झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकदा जि. प. वर आपला झेंडा फडकविला आहे. मात्र, या वेळी केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची करीत जि. प. व पं. स. साठी पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. पश्चिम महाराष्ट्र आणि भाजपा-सेना, असे व्यस्त राजकीय समीकरण असतानाही या वेळी भाजपाने सर्व पर्यायांचा वापर करीत पक्षाची बीजे रोवण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यामुळेच जि. प. मध्ये तब्बल सहा जागांवर विजय मिळवित स्थानिक स्वराज्य संस्थांतील आपले स्थान भक्कम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडत प्रस्थापितांना धक्का दिला आहे.

सातारा जिल्हा परिषद बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस- ४१

काँग्रेस- ७

भाजप- ६

सातारा विकास आघाडी ३

अपक्ष २

पाटण विकास आघाडी १

कराड विकास आघाडी १

अपक्ष ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ज्योती मांढरे अखेर माफीची साक्षीदार

$
0
0



सातारा

वाई हत्याकांड प्रकरणात ज्योती मांढरे ही माफीची साक्षीदार झाल्याचा निर्णय न्यायाधिशांनी दिला आहे. तिला काही अटीही घालण्यात आल्या आहेत. वाई हत्याकांड प्रकरणात एक एक खटला चालवायचा की सर्व खटले एकदम चालवायचे या बाबत सरकार पक्षाला विचार करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केल्यानंतर न्यायाधिशांनी २४ मार्च ही पुढील तारीख निश्चित केली आहे.

वाई हत्याकांड प्रकरणी या अगोदर सरकार पक्षाने ज्योतीला माफीचा साक्षीदार करावे, यासाठी युक्तिवाद केला होता, तर ज्योतीला माफीचा साक्षीदार करू नये, असा बचाव पक्षाने युक्तिवाद केला होता. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश कोणता निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. न्यायालयात या प्रकरणाच्या कामकाजाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच न्यायाधिशांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन ज्योतीला माफीची साक्षीदार केल्याचा निर्णय दिला. न्यायाधीशांनी तिला माफीची साक्षीदार होणार आहे का? त्यासाठी अटी असून, त्या मान्य आहेत का? असे तिला विचारले. त्यावर ज्योतीने माफीचा साक्षीदार होणार असल्याचे मान्य केले. या वेळी सरकार पक्षाला सर्व खरी माहिती सांगावी तसेच ज्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे त्यामधील तुझी व संतोष पोळ याची भूमिका सांगणे, अशा अटी सांगितल्यानंतर तिने त्या मान्य केल्या.

विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, संशयित आरोपीने पोलिसांकडे सर्व गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्या बाबतचा बंद लखोटा खुला करावा व तो सरकार पक्षाला द्यावा, अशी विनंती केली. न्यायाधिशांनी तो मान्य करुन सरकार पक्षाला वाचण्यासाठी दिला. मात्र, संतोष पोळ याचा कबुली जबाब इतर ठिकाणी खुला करु नये, असे न्यायाधिशांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यातील जवान जम्मूजवळ हुतात्मा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेजवळ पूंछ येथे पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी केलेल्या गोळीबारात सातारा जिल्ह्यातील फत्त्यापूर येथील जवान दीपक जगन्नाथ घाडगे (वय ३२) हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव आज, शुक्रवारी गावी आणले जाणार आहे.

गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने गुलपूर भागात भारतीय ठाण्यावर गोळीबार केला. त्यात घाडगे गंभीर जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. दीपक यांच्या मागे वडील, आई शोभा, पत्नी निशा, चार वर्षांचा मुलगा शंभू आणि एक वर्षाची मुलगी परी आणि विवाहित बहीण माला असा परिवार आहे.

घाडगे १५ मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते. दीपक यांच्या मृत्यूचा बातमी कळताच फत्त्यापूर गावातील व्यवहार व बाजारपेठ बंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुरुंगाधिकाऱ्याची बदली; सुभेदार निलंबितआरोपीकडे मोबाइल सापडल्याने कारवाई

$
0
0

तुरुंगाधिकाऱ्याची बदली; सुभेदार निलंबित

आरोपीकडे मोबाइल सापडल्याने कारवाई

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्हा कारागृहात मोक्काअंतर्गत कारवाई झालेला आरोपी निलेश घायवळ याच्याकडे मोबाइल सापडला होता. या प्रकरणी वरिष्ठ तुरुंगाधिकारी अवघडे यांची तडकाफडकी बदली तर सुभेदार कल्पना खरात यांना कारागृह महानिरीक्षकांनी निलंबित केले आहे.

मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आरोपी निलेश घायवळ याच्याकडे २३ फेब्रुवारी रोजी कारागृहात च मोबाइल सापडला होता आणि कारागृहाच्या दक्षता पथकाच्या झडतीत मोबाइल वापराचे हे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाचा अहवाल कारागृह अधीक्षक एन. एन. चोंदे यांनी कारागृह महानिरीक्षकांना पाठवला होता. या अहवालाची गंभीर दखल घेऊन सुभेदार कल्पना खरात यांना तातडीने निलंबित करण्यात आले. वरीष्ठ तुरूंग अधिकारी अवघडे यांची खुले कारागृह आटपाडी येथे तातडीने बदली करण्यात आली. या बदलीला प्रतिनियुक्तीचे गोंडस कारण देण्यात आले. कारागृह अधीक्षकांच्या आशिर्वादानेच घायवळला पंचतारांकित सुविधा मिळत असल्याची बातमी आहे मात्र, कारवाईचे झेंगट अवघडे व खरात यांच्या गळ्यात पडले. दक्षता समितीने कारागृहातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. यामध्ये १७ फेब्रुवारी रोजी खरात घायवळ यांच्याशी बोलताना आढळून आल्या. या अनुषंगाने चौकशी करून त्यांच्यार दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images