Tweet : @bhimgondaMT
कोल्हापूर : सरकारच्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेतर्गंत आता १ एप्रिल २०१६ नंतर जन्मलेल्या दारिद्र्यरेषेवरील कुटुंबातीलही मुलीच्या खात्यावर १८ वर्षानंतर १ लाख रूपये जमा होणार आहेत. यापूर्वी केवळ दारिद्ररेषेखालील कुटुंबासाठी ही योजना कार्यरत होती. सुधारणेमुळे सर्व मुलींना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी मुलीच्या पालकानी महिला व बालकल्याण विभागच्या कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यात अर्ज भरून देणे बंधनकारक आहे. सुधारित आदेशानुसार या योजनेची अंमलबजावणी करण्याची सूचना तालुका पातळीवरील महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जाणीव जागृती करण्याचाही आदेश आहेत.
मुलगाच वंशाचा दिवा या गैरसमजुतीमुळे अजूनही गर्भातच स्त्री भ्रूणहत्या केली जात आहे. परिणामी स्त्री जन्मदर घटत आहे. मुलगा, मुलगीचे प्रमाण व्यस्त होत आहे. हे चित्र बदल्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. मुलगी जन्माचे स्वागत केले जात आहे. सरकारच्यावतीने १३ फेब्रुवारी, २०१४ रोजी दारिद्र्य रेषेखालील दात्पंत्यास मुलगी जन्माला आल्यास तिच्या नावावर १८ वर्षानंतर १ लाख रुपये जमा केले जातात. त्यामध्ये सुधारणा करून दारिद्र्य रेषेवरील कुटुंबातही मुलीचा जन्म झाल्यास या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची आता अंमलबजावणी सुरू झाली आहे.
नव्या आदेशानुसार आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरून दिल्यास त्या मुलीच्या नावे आयुर्विमा महामंडळ २१ हजार २०० रुपये भरणार आहेत. त्यासाठी पालकांना पैसे भरण्याची गरज नाही. योजनेत पात्र झाल्यानंतरच विविध टप्यात लाभ दिला जाणार आहे. जन्मोत्सव साजरा करण्यासाठी पाच हजार रुपये, तिच्या आजी, आजोबांना सोन्याची नाणे भेट देण्यासाठी पेच हजार, ती मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत प्रत्येक वर्षी पोषणासाठी दोन हजार, ती मुलगी शाळेत गेल्यानंतर पहिली ते पाचवीपर्यंत प्रत्येक वर्षाला शिक्षणासाठी अडीच हजार मिळणार आहेत. त्यानंतर मुलीस सहावी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षाला तीन हजार दिले जाणार आहेत. योजनेचे निकष, अटींसंबंधी अधिक माहितीसाठी महिला व बालकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावे लागणार आहे.
शिक्षण, पालन पोषणासाठीही
पात्र मुलीस १८ वर्षानंतर एक लाख रुपये मिळणार आहेतच. शिवाय विविध टप्यात शिक्षण, पालनपोषणासाठीही पैसे मिळणार आहेत. योजनेच्या नावाप्रमाणे माझी कन्या भाग्यश्रीचा खरा आनंद पालकांना देण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे.
सुधारित सरकारच्या निर्णयानुसार दारिद्रय रेषेवरील कुटुंबांतील मुलीसही १८ वर्षानंतर एक लाख रुपये मिळणार आहे. महिला व बालकल्याण विभागृतर्फे तालुका पातळीवर बैठका घेऊन व्यापक अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या आहेत. अधिक माहितीसाठी पालकांनी कार्यालयात जाऊन चौकशी करावी, आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यातील अर्ज दाखल करावेत.
शिल्पा पाटील, उममुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण अधिकारी)
लाभासाठी महत्त्वाचे निकष
कुटुंबातील पहिल्या दोनच मुली लाभास पात्र
मुलीचे वडील महाराष्ट्रातील रहिवाशी असावेत
बालिकेचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
१८ वर्षानंतर रक्कम मिळण्यासाठी मुलगी अविवाहित व १० पुर्ण केलेली असावी.
दत्तक, अनाथ, बालसंकुलातील मुलगीही पात्र
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट