म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
देशात आजही ८० टक्के व्यवहार रोखीने होतात. त्यामुळे भ्रष्टाचाराला आणि काळ्यापैशांना मोठा वाव मिळतो. हे सर्व टाळून पारदर्शी प्रशासन आणि काळ्या पैशाला वेसण घालण्यासाठी आता सर्वांनीच कॅशलेस पध्दतीचा अवलंब करावा, असे आवाहनही संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. कॅशलेस व्यवहाराबाबत जागरुकता व डिजीटल पध्दतीने आर्थिक व्यवहार करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित केलेल्या डिजीधन मेळाव्याचे उदघाटन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, महापौर हसिना फरास, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, निती आयोगाचे संचालक अनिलकुमार शर्मा, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक एम. जी. मुज्जाहीन, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचे व्हाईस प्रेसिडेंट महेंद्र जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भामरे म्हणाले, ‘केंद्राने नोटा बंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारास प्राधान्य दिले असून, त्यादृष्टीने सुविधाही उपलब्ध करुन दिल्या आहेत. देशातील जनतेला या पध्दतीची माहिती व्हावी यासाठी केंद्र शासनाने देशातील १०० जिल्ह्यांत डिजीधन मेळावे होत आहेत. आयटी क्षेत्रामुळे जगात झपाट्याने मोठे बदल होत आहेत. बदलत्या परिस्थितीत जगाच्या बरोबरीने चालण्यासाठी भारतालाही बदलावे लागत आहे. त्यामुळेच कॅशलेस व्यवहार सर्व पातळीवर होणे गरजेचे बनले आहे.’
मेळाव्याला जिल्ह्यातील व्यापारी, व्यवसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील विविध बँका, पेट्रोलियम कंपन्या, गॅस कंपन्या, स्वस्त धान्य दुकाने, महा-ईसेवा केंद्र, बचत गट, आधार लिंक प्रोग्रॅम, कृषी निविष्ठा धारक यांचे १०० स्टॉल्स उभारण्यात आले होते. सकाळपासूनच ग्राहक तसेच व्यवसायिकांनी गर्दी केली होती. बहुतांशी लोकांनी कॅशलेस व्यवहार करुन डिजीटल पेमेंट सिस्टीमचा अवलंब केल्याचे दिसून आले. तसेच कॅशलेस व्यवहाराबाबतची पध्दती लोकांना समजावून सांगितली. मेळाव्यात कॅशलेस बरोबरच मुद्रा बँक योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ, महा अवयवदान अशा प्राधान्य क्रमाच्या योजनांची माहितीही देण्यात आली असून विविध फ्लेक्स, बॅनर्स, स्टँडी याद्वारेही मुद्रा योजनेची जागृती करण्यात आली. दरम्यान, कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय बुध्दीबळपटू ऋचा पुजारी, नेमबाजपटू राधिका बराले, जितेंद्र विभुते आणि अनुष्का पाटील उपस्थित होते त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यास अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र खाडे, जिल्हा अग्रणी बँकअधिकारी एस.जी.किणिंगे यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिनाभरात रेशन डिजिटल
अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘महिन्याभरात राज्यातील सर्व रास्तभाव दुकाने POS मशिनच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत. जोपर्यंत ग्राहक आपल्या अंगठ्याचा ठसा देणार नाहीत तो पर्यंत रेशनिंगवरील वस्तुंचे त्यांना वितरण होणार नाही. या पध्दतीमुळे सुमारे ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपव्यय टळणार आहे.’
जिल्ह्यात ७.५० लाख जनधन बँक खाती आहेत. त्यापैकी ६ लाख खाती आधार लिंक करून त्यांना रुपेकार्ड देण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायत लेसकॅश झाल्या असून येत्या १५ दिवसांत आणखी ३५ ग्रामपंचायत लेसकॅश होतील.
- डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी
कॅशलेस इंडिया ही संपूर्ण देशव्यापी मोहीम झाली पाहिजे. आम्ही ८० रुपयांचे ताकही स्वाइप मशीनवर पेमेंट करून घेतो. अशाच प्रकारे आता मोठे सगळे व्यवहार अशाच प्रकारे झाले पाहिजेत. यामुळे आपसूकच काळ्यापैशांना आळा बसेल आणि अशा प्रकारच्या मेळाव्यांमुळे जनजागृती होईल.
- अभिजित पवार, नागरिक
सरकारनेही डिजिटल इंडिया कॅम्पेन अतिशय गांभीर्याने राबविण्याची गरज आहे. यात डिजिधन मेळावा ही एक चांगली संकल्पना आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता येण्यासाठी भविष्यात ऑनलाइन पेमेंट्स अतिशय गरजेची आहेत. नव्या जमाऩ्याची गुंतवणूक म्हणून आता नागरिकांनी म्युचिअल फंड्सकडेही वळावे, असे वाटते.
- दीपक पलंगे, व्यवसायिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट