‘आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, याची दिशा कॉलेज जीवनात ठरते. त्यासाठी मनातील निश्चित इतरांना न सांगता टार्गेट फिक्स करा. आपल्या अंगभूत कलागुण आणि इच्छाशक्तीच्या बळवावर हळुवारपणे मार्गक्रमण करताना कधी अपयश आले, तर खचून जाऊ नका’, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी तरुणाईला मंगळवारी दिला. युवा महोत्सवाच्या बक्षिस वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. डी. आर. मोरे होते. लोककला केंद्रात विद्यार्थ्यांच्या जल्लोषात बक्षिस वितरण झाले.
अभिनेते शिंदे यांनी पारंपरिक शैलीत भाषण करण्यापेक्षा थेट युवकांशी संवाद साधला. त्यांचा संघर्षमय प्रवास, सामाजिक उपक्रम, मराठी चित्रपटसृष्टीसह हॉलीवूड, टॉलीवूडमधील प्रवासातील आठवणींमुळे त्यांचा संवाद उत्तरोत्तर रंगतदार होत गेला. ‘पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षात असताना मी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होतो. त्याचवेळी अभिनेता व्हायचे ठरवले आणि त्याच दिशेने वाटचाल केली. वयाच्या २० व्या वर्षी धडपड केली, तेव्हा कुठे ४० व्या वर्षी यश लाभले. त्यामळे यशाकडे मार्गक्रमण करताना हळुवार करा, म्हणजे धोका कमी असतो. दादरच्या फुटपाथवर अभिनय साधना पुस्तकाने करिअरचा मार्ग दाखवणारे ठरले. आयुष्यात लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असे काहीच नसते. आई आणि वृक्ष दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक जन्म देते आणि दुसरे श्वास. या दोन्ही गोष्टींची उतराई कोणत्याही पद्धतीने शक्य नाही’ असे शिंदे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी आपल्यातले अंगभूत गूण पुढे आयुष्यभर जोपासावेत, त्यांचा विकास करावा. आपले कलागुण कधीही हरवू देऊ नका.’ डॉ. सैनी यांनी अभिनेते शिंदे यांच्या माण, खटाव तालुक्यांतील वृक्षसंवर्धनाच्या कार्यक्रमाचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. मोरे यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या संयोजनात मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानले. एआययूचे निरीक्षक प्रा. एस. के. शर्मा, मुंबई विद्यापीठाचे नीलेश सावेकर यांची भाषणे झाली. क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे, भारती विद्यापीठाचे डॉ. हणमंतराव कदम, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, डॉ. डी. के. गायकवाड उपस्थित होते. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी अहवाल वाचन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले.
चौकट
नमस्कार कोल्हापूरकर
तेजस युनिर्व्हसिटीच्या संघव्यवस्थापक भुपाली कश्यप यांनी केवळ चार दिवसात मराठी भाषा आत्मसात केल्याचे दाखवून दिले. मनोगताला उभे राहताच ‘नमस्कार कोल्हापूरकर’ अशी साद त्याने घालताच, एकच कल्ला झाला. त्यांनी कॅम्पसमधील हिरवाई टिकऊन ठेवण्याचे आवाहन केले. स्पर्धेच्या निमित्ताने आलेल्या सर्व आठवणींचा ठेवा जवळ ठेवून मार्गक्रमण करणार असल्याचे सांगून त्यांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल संयोजकांना दिलखुलास अभिनंदन केले.
कोल्हापुरकांचे आदरतिथ्य
यापूर्वी महोत्सवात पाच विभागातून केवळ विजेत्या, उपविजेत्या संघांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळत होती. यावर्षी प्रथमच एआययूने स्पर्धेच्या निकषात बदल करत पहिल्या तीन संघांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या दीड हजारवर गेली. सर्व विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था उत्कृष्ट पद्धतीने केली होती. स्पर्धेतील सहभागानंतर परराज्यातील विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहराची सफर केली. विद्यापीठातील व्यवस्था आणि शहर पर्यटनादरम्यान आदरतिथ्याचा चांगला अनुभव आल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.
सेल्फीची लखलख
बक्षिस समारंभास प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित राहणार असल्याने सकाळपासून लोककला केंद्र विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने हाऊसफुल्ल झाले होते. साडेआकरा वाजता अभिनेते शिंदे यांची एन्ट्री होताच युवकांनी जल्लोष केला. ते व्हीआयपी कक्षात स्थानापन्न झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतली. बक्षिस वितरणावेळीही विजेत्या संघांनाही हा मोह आवरता आला नाही. बक्षिस समारंभानंतर ते विद्यार्थ्यांच्या गराड्यातच अडकले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट