@timesgroup.com
Tweet : @Uddhavg_MT
कोल्हापूर शहरातील चारही पोलिस ठाण्यांमध्ये मंजूर पदांपेक्षा पोलिस उपनिरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षकांची पदे रिक्त आहेत. गेल्या महिन्यात तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर रिक्त जागांवर अद्यापही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने नव्याने पदे भरण्याची शक्यताही कमी आहे, त्यामुळे तपासकामे रखडण्याची शक्यता आहे. याशिवाय वाढत्या कामांमुळे पोलिसांवर अतिरिक्त ताणही वाढत आहे.
कोल्हापूर शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे एकूण ४३८ पोलिस कार्यरत आहेत. यात सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांची संख्या केवळ ३० आहे. गेल्या महिन्यात तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी काही पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या. मुळातच मंजूर पदांपेक्षा अपुरे मनुष्यबळ असल्याने या बदल्यांनी पोलिस ठाण्यांतील खुर्च्या रिकाम्या पडल्या आहेत. वाढत्या चोऱ्या, आंदोलने, मोर्चे, दोन गटांतील राडे यांचे प्रमाण वाढत असतानाच पोलिसांची संख्या कमी होत असल्याने कामांचा ताण वाढला आहे. गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी प्रशिक्षित आणि अनुभवी अधिकाऱ्यांची गरज असते. सध्या मात्र शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये तपासासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची वानवा आहे. यामुळे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय विश्रामगृह असल्याने सतत मोर्चे, आंदोलने यासाठी अधिकचा बंदोबस्त गरजेचा असतो. सध्या शाहूपुरी ठाण्यात ३ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३ पोलिस उपनिरीक्षक आहेत. मात्र, बंदोबस्ताच्या कामांमुळे बऱ्याचदा अधिकाऱ्यांना सलग ड्युटी करावी लागत आहे. शहरात सर्वाधिक १०२ कर्मचारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासाठी मंजूर आहेत. मात्र ३ अधिकाऱ्यांसह एकूण १४ कर्मचाऱ्यांची पदे गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त आहेत. सहायक पोलिस निरीक्षकांचे पद सध्या रिक्त असल्याने तपास कामे खोळंबली आहेत. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात ५ पोलिस अधिकारी आहेत, मात्र, २ अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर ही पदे रिक्त आहेत. राजारामपुरी पोलिस ठाण्यातही फार वेगळी स्थिती नाही. शहर वाहतूक नियंत्रण शाखा तर मंजूर पदांच्या केवळ ६० टक्के पदांवरच शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. ही स्थिती कायम राहिल्यास गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना अडचणी येणार आहेत, त्याचबरोबर गुन्ह्यांचा तपासही रखडणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट