म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी घोडेबाजार झाल्याची टीका करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व विरोधी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीने एकमेकावर चिखलफेक केली. विकासात्मक राजकारण नव्हे तर, घोडेबाजार हेच ताराराणी आघाडीचे प्रमुख हत्यार आहे. जुने, गंजलेले हे हत्यार पुन्हा वापरुन स्थायीची सत्ता मिळवण्याचा त्यांच्या खटाटोपाला भाजपाची अप्रत्यक्षरित्या साथ लाभल्याची खरमरीत टीका महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे नेते प्रा. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. भाजप, ताराराणी आघाडीचे नेते सुनील कदम, गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी यांनी काँग्रेसनेच शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्याठी घोडेबाजार घडवून आणला. शिवसेनेला शहराच्या विकासाशी देणेघेणे नाही, असा प्रतिटोला लगाविला.
महाडिकांचे घाणेरडे राजकारण
स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीने आव्हान उभे केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जोरदार टीका करण्यात आली. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, ‘खासदार धनंजय महाडिक यांचा नेमका पक्ष कुठला आहे ? काँग्रेसच्या नगरसेविका रिना कांबळे यांना खासदार महाडिक यांच्या पंढरपूर येथील कारखान्याच्या गेस्टवर ठेवले आहे. महाडिक हे जिल्ह्याच्या विकासाऐवजी घाणेरडे राजकारण करत आहेत. आयुक्त पी. शिवशंकर हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दबावाखाली काम करत आहेत. विरोधी गटात सामील झालेल्या नगरसेविका कांबळे यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.’
प्रा. जयंत पाटील म्हणाले, ‘नगरसेवक देसाई यांच्या जातीच्या दाखल्याप्रकरणी हायकोर्टाने दिलेली स्थगिती ऑक्टोबर महिन्यात उठली आहे. देसाई यांच्या विरोधी उमेदवाराच्या वकीलांने दोन महिन्यापूर्वी निवेदन देऊनही आयुक्तांनी कार्यवाही झाली नाही. महापालिकेचे हायकोर्टातील वकील अभिजीत आडगुळे यांनी नगरसेवक देसाई यांच्या दाखल्यासंदर्भात स्थगिती नसल्याचा स्पष्ट अभिप्राय देवूनही आयुक्तांनी कारवाई केली नाही. या प्रकरणी आयुक्तांवर कोर्टाचा अवमान केला म्हणून फौजदारी दाखल करण्यात येईल. आयुक्त हे नियमानुसार कामकाज करत असल्याचा केवळ आव आणतात. त्यांना त्या पदावर काम करण्याचा अधिकार नाही. दोन्ही काँग्रेसच्या नेते मंडळीशी चर्चा करुन त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय होईल.’ पत्रकार परिषदेला उपमहापौर अर्जुन माने, सभागृह नेते प्रवीण केसरकर, मुरलीधर जाधव, प्रताप जाधव, आदिल फरास, सचिन चव्हाण, गणी आजरेकर, शिवानंद बनछोडे आदी उपस्थित होते.
शिवसेनेसाठी काँग्रेसकडून घोडेबाजार
ताराराणी आघाडीने घोडेबाजार केला नाही तर काँग्रेस आघाडीने शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी घोडेबाजार घडवून आणला असा प्रतिटोला भाजप, ताराराणी आघाडीचे नेते सुनील कदम यांनी लगाविला. ज्या नेत्यांनी शहरातील जागा हडपल्या, आयआरबी प्रकल्प, थेट पाइपलाइन योजना, एसटीपी प्रकल्पावरुन ज्यांच्यावर आरोप झाले अशा नेते मंडळींना पाठिंबा देऊन शिवसेनेने आपला खरा चेहरा दाखवून दिला आहे. सभागृहात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खाली आवाजात बोला, असे म्हणणाऱ्या माजी महापौर अश्विनी रामाणे यांना वर्षभरातच जातीच्या दाखल्यावरुन महापालिकेबाहेर पडावे लागल्याचा टोलाही त्यांनी लगाविला.
रीना कांबळे गगनबावड्याच्या कारखाना स्थळावर
सत्यजित कदम म्हणाले, ‘काँग्रेसच्या नगरसेविका रीना कांबळे यांच्याशी भाजप, ताराराणी आघाडीचा काही संबंध नाही. काँग्रेस आघाडी अंतर्गत प्रचंड धुसफूस, अस्वस्थता आहे. नगरसेविका कांबळे या स्थायी समितीत काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात मतदान करतील या भीतीपोटीच काँग्रेसने त्यांना गायब केले आहे. नगरसेविका कांबळे या गगनबावडा येथील साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर ठेवण्यात आले आहे.’
विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेत नजीकच्या काळात सत्ता परिवर्तन अटळ आहे. मात्र शिवसेनेची भूमिका ही शहर विकासाच्या विरोधात असल्याचे सामोरे आले.’ नगरसेवक आशिष ढवळे यांनी स्थायीतील पराभवाचे दुख नाही. सत्ताधारी काँग्रेसचा घोडेबाजार यशस्वी झाला असा टोला त्यांनी मारला. पत्रकार परिषदेला किरण शिराळे, राजसिंह शेळके, अजित ठाणेकर, शेखर कुसाळे, विजय खाडे आदी उपस्थित होते.
भाजपला औकात दाखविली
शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांनी घोडेबाजाराचा आरोप फेटाळून लावला. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मातोश्री आणि वरिष्ठ नेत्यांच्या तसा स्पष्ट आदेश होता. संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांचा भाजपच्या विरोधात मतदान करा असा मेसेज आला असल्याचे लिंग्रस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्थायीच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा देऊन भाजपला ‘औकात’ दाखवल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी सदस्या प्रतिज्ञा निल्ले यांनी शिवसेनेचा स्वाभिमान दाखविला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला. घोडेबाजार झाला नाही. गटनेते नियाज खान यांनी घोडेबाजाराचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक अभिजित चव्हाण उपस्थित होते.
काँग्रेस नगरसेवकांची आयुक्तांसोबत खडाजंगी
जात पडताळणी समितीच्या नगरसेवक निलेश देसाई यांच्या जातीच्या दाखला अवैध ठरविण्याच्या निर्णयाला हायकोर्टाने दिलेली स्थगिती ऑक्टोबर महिन्यात संपली आहे. तसा स्पष्ट अभिप्राय महापालिकेचे वकील अभिजित आडगुळे यांनी आयुक्तांना रात्री दोन वाजता दिला, मात्र त्यानंतर आयुक्तांनी देसाई यांचे पद रद्द केले नाही आयुक्त पक्षपाती वागत आहेत असा आरोप उपमहापौर अर्जुन माने, गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सचिन चव्हाण आदींनी केला. आयुक्तांनी कारवाईचे पत्र द्यावे यासाठी रात्री दोन वाजेपर्यंत काँग्रेसचे नगरसेवक महापालिकेत व आयुक्त बंगला परिसरात थांबून होते. मंगळवारी सकाळी पत्र मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा आयुक्तांचा बंगला गाठला. देसाई यांच्यावरील कारवाईवरुन काँग्रेसचे पदाधिकारी व आयुक्तांत खडाजंगी झाली. आयुक्तांनी देसाई यांच्या दाखल्याच्या स्थगितीप्रश्नी हायकोर्टाचे रजिस्टार यांच्याकडे पुन्हा अभिप्राय मागविला असल्याचे स्पष्ट केले. त्याला काँग्रेसने आक्षेप घेत त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट