‘साहित्य आणि चित्रपट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव होऊ शकत नाही. दोन्ही कला जीवनाची समग्रता वाढवतात. सर्व कला एकत्रीकरण समुच्चयाने चित्रपटाची निर्मिती केली जाते. दोन्ही कलाकृतीचा जगण्याचा शोध वेगळा आहे. साहित्य आणि चित्रपट या दोन्ही कला समान आहेत,’ असे मत मुक्तसंवादात व्यक्त करण्यात आले. पाचव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट (किफ्फ) महोत्सवांतर्गत साहित्य आणि चित्रपट या विषयावर मुक्तसंवाद झाला. राजर्षी शाहू स्मारक भवनात महोत्सव सुरू आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस, कृष्णात खोत यांच्याशी महोत्सवाचे समन्वयक चंद्रकांत जोशी यांनी मुक्तसंवाद साधला. डॉ. राजन गवस म्हणाले, ‘काहीजण कलाकृती म्हणून चित्रपटाकडे पाहतात. मात्र, चित्रपटातून संदेश पोहोचणे महत्त्वाचे आहे. त्याचे उत्तम उदाहरण जोगवा चित्रपट आहे. 'चौंडकं' आणि ‘भंडारभोग’ ही कांदबरी आणि चारूता सागर यांची 'दर्शन' ही कथा, अशा तीन साहित्यकृतींवर आधारित पटकथा झाली. त्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली. ‘जोगवा’ चित्रपटातून समाजातील वास्तव मांडले आहे. त्यातून सामाजिक स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले गेले. साहित्यातून निर्माण झालेल्या या चित्रपटाने सत्तर टक्के यश मिळविले. या चित्रपटानेच गुंतागुंतीचे जग कलाकृतीत आणले.’
ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे म्हणाल्या, ‘साहित्याला समाजात दर्जा मिळाला. लेखी स्वरूपात ही कला विकसित झाली. लेखक हा समाजजीवन वाचकांच्या डोळ्यासमोर ठेवतो. काही नामंवत लेखकांची नावे आणि त्याचे साहित्य आयुष्यभर आठवणीत राहते. वीस वर्षांनंतरही लेखकाचे साहित्य वाचनानंतर प्रगल्भता वाढते. मात्र, त्या तुलनेत चित्रपट ही लहान वयाची कला आहे. चित्रपटाला अभिजात दर्जा नाही. मात्र, चित्रपट ताकदीचे माध्यम आहे. जीवनाचा सर्वांगाने वेध घेतला जातो. काही दिग्दर्शकांचे चित्रपटही सामाजिक संदेश देतात. विधायक समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करतात.’
साहित्यिक कृष्णात खोत म्हणाले, ‘लेखक आणि दिग्दर्शक या दोघांचा सिनेमा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कथेशिवाय चित्रपटनिर्मिती शक्य नाही. साहित्य आणि चित्रपटाला वेगळे करता येणार नाही. अलीकडच्या काळातील काही कांदबऱ्यांवर सिनेमा शक्य नाही.
दरम्यान, मंगळवारी (ता. २७) भारतीय स्वातंत्र्यात चित्रपटांचे योगदान विषयावर संवाद होईल.
‘जिप्सी’ माहितीपट बुधवारी
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्येष्ठ लेखक ज्ञानेश्वर मुळे यांच्यावर आधारित जिप्सी या माहितीपटाला दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात स्पेशल ज्युरी अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. या माहितीपटाची निर्मिती युनिक अकादमीने केली असून त्याचे दिग्दर्शक धनंजय भावलेकर आहेत. या माहितीपटाचे प्रदर्शन बुधवार (ता. २८) सायंकाळी सहा वाजता केले जाणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट