भारत विकास सर्व्हिसेस प्रायव्हेट लि. हावेरी या संस्थेकडून ५० हजार रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून शहर व परिसरातील सुमारे २०० महिलांची दोन लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रेश्मा बाळासो नदाफ या महिलेच्या विरोधात सना युनूस सनदी यांनी बचत गटाच्यावतीने शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रेश्मा नदाफ हिने चार महिन्यापूर्वी भारत विकास सर्व्हिसेस प्रा. लि. या संस्थेतर्फे बचत गटाला ५० हजार रुपयापर्यंत कर्ज मिळवून देण्याचे सांगत बचत गटाच्या महिलांकडून सभासद होण्यासाठी १०५० रुपयाप्रमाणे २१ हजार रुपये घेतले. त्यावेळी कंपनीच्या छापील अर्जावर माहिती भरून घेऊन आवश्यक कागदपत्रेही घेतली होती. दिवाळी काळात पहिल्यांदा ५० हजार रुपये कर्ज देऊन प्रतिमहा १५०० रुपये हप्ता भरुन त्याची परतफेड करण्याची असल्याची माहिती दिली. त्यानंतर आठवड्यानंतर रेश्मा नदाफ व अन्य चार लोकांनी येऊन सभासद झालेल्या महिलांच्या घरांची पाहणी करून लक्ष्मी पूजन दिवशी कर्ज वाटप केले जाईल असे सांगत व्हाउचरवर सह्या घेतल्या. त्यानंतर लक्ष्मी पूजनाच्या दोन दिवस अगोदर गल्लीत राहणाऱ्या सफुरा शेख या महिलेने नदाफ आल्या असून तुम्हीपण या असा निरोप देत सर्वांना बोलवून घेतले. त्यावेळी सफुराने आमच्या संस्थेसाठी १४ बचत गट मिळवून दिल्याचे रेश्माने सांगत दोन दिवसांत कर्ज दिले जाईल, असे सांगून ती निघून गेली. त्यानंतर दोन दिवसांचा कालावधी लोटूनही पैसे मिळत नसल्याने बचत गटातील महिलांनी रेश्माचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती मिळून आली नाही. तसेच तिने दिलेल्या कंपनीच्या कोल्हापुरातील पत्त्यावर चौकशी करता त्याठिकाणी कंपनीचे कार्यालय नसल्याचे समजले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट