म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कामकाजाचा सावळागोंधळ सोमवारी पुन्हा एकदा उघडकीस आला. नव्या पाइपलाइनची दुरुस्ती करण्याऐवजी गेली पाच वर्षे बंद असलेल्या जुन्या पाइपलाइन दुरुस्तीचे काम विभागाने केले. विभागातील अधिकाऱ्यांच्या पाइपलाइनविषयक अज्ञानामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी पुरवठा विभागाने मंगळवारी नव्या पाइपलाइनची दुरुस्ती हाती घेतल्यामुळे बुधवारी दिवसभर शहरातील विविध भागांना पाणी पुरवठा होणार नाही. गुरुवारी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
सोमवारपासून अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने बुधवारी पाणी टंचाईची तीव्रता वाढणार आहे. राजारामपुरी सायबर चौक येथील शिंगणापूर योजनेवरील पाइपलाइनला क्रॉस कनेक्शन करणे व पाइपलाइन गळती काढण्याचे काम सोमवारी हाती घेतले. पुईखडी येथील स्लुईश व्हॉल्व दुरुस्तीचे काम पूर्ण केले. पण नवीन पाइपलाइनऐवजी जुनी पाइपलाइन दुरुस्त केल्याची चूक मंगळवारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. विभागाने त्यावर सारवासारव तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने बुधवारी विविध भागात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे म्हटले आहे.
या भागात पाणी पुरवठा बंद राहणार
बुधवारी राजारामपुरी, बागल चौक, उद्यमनगर, शास्त्रीनगर, सागरमाळ, राजेंद्रनगर वैभव सोसायटी, दौलत नगर, शाहूनगर, माळी कॉलनी, टाकाळा, वड्डवाडी, सम्राटनगर, इंगळेनगर, काटकर माळ, जाधववाडी, कदमवाडी, मुक्त सैनिक वसाहत, रुईकर कॉलनी, मार्केट यार्ड, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, शाहूपुरी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. या भागासाठी महापालिकेच्या आठ टँकरद्वारे पाणी वाटपाचे नियोजन असल्याचे प्रभारी जल अभियंता एस. के. कुलकर्णी यांनी सांगितले.
दिवसभरात ५० फेऱ्या
जवाहरनगर, सुभाषनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, शाहू मिल चौक, यादवनगर, राजारामपुरी, कदमवाडी, राजेंद्रनगर या भागाला मंगळवारी पाणी पुरवठा झाला नाही. कळंबा फिल्टर हाऊस व कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून पाणी पुरवठा विभागाच्या टँकरमधून संबंधित भागांना पाणी पुरवठा करण्यात आला. मंगळवारी टँकरच्या ५० हून अधिक फेऱ्या झाल्या. बावडा फिल्टर हाऊसमधून ३०, कळंबा फिल्टर हाऊस येथून २० टँकर पाणी वाटप झाले.
अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना त्रास
शिंगणापूर योजनेंतर्गत सायबर चौक ते कळंबा अशी जुनी पाइपलाइन आहे. पाच वर्षापासून ही पाइपलाइन वापरात नाही. याच मार्गावर नवीन पाइपलाइन टाकली आहे. या पाइपलाइनला गळती काढण्याऐवजी पाणी पुरवठा विभागाने जुनी पाइपलाइन दुरुस्त केले. त्याला क्रॉस कनेक्शन जोडले. पण वापरात नसल्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकत नाही. अधिकाऱ्यांच्या अशा अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. बुधवारपर्यंत नव्या पाइपलाइनची दुरुस्ती झाली नाही तर सायबर चौकात अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक सुरेश ढोणुक्षे यांनी दिला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट