म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील ७२ कोटींच्या विकासकामांना गती येऊ लागली आहे. फोर्ट्रेस कंपनीने तयार केलेला एकूण २५५ कोटी रुपयांचा हा सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुरीसाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. आता त्याची पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या माध्यमातून तांत्रिक तपासणी सुरु आहे. आठ दिवसांत ही तपासणी पर्ण होईल. त्यानंतर तो विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर लगेच टेंडर प्रक्रिया होईल.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे तीर्थक्षेत्र म्हणून विकासासाठी २00८ साली राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. या तीर्थक्षेत्र प्रारूप आराखड्याचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश २0१५ साली नगरविकास विभागाने दिले होते. २0१३ साली तत्कालीन जिल्हा दरसूचीप्रमाणे १९0 कोटी रुपयांचा हा आराखडा २0१४-१५ साली २५५ कोटींवर पोहोचला. सुधारित आराखडा २५ ऑगस्ट २0१६ राजी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला.
सध्या पुण्यात शासकीय तंत्रनिकेतनच्या माध्यमातून या आराखड्याची तांत्रिक तपासणी करण्याचे काम सुरु आहे. तपासणीनंतर अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर होईल. आराखड्यातील पहिल्या टप्प्यात पुरातन वास्तू संवर्धन, दर्शन मंडप, भक्तनिवास, पार्किंग, डिझास्टर मॅनेजमेंट यांसारखे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. मूळ मंदिरामध्येही सिमेंट पॉयटिंग, वॉटरप्रुफिंग, दरवाजांचे सुशोभीकरण, मणकर्णिका कुंड तलाव बांधणी यांसारखी कामे केली जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील कामे
पहिला टप्प्यात मंदिर पुरातत्व वास्तू संवर्धनांतर्गत होणाऱ्या कामांमध्ये मूळ वास्तूचे संवर्धन, दरवाजे, नगारखाना, देवस्थान समिती कार्यालय, गरुड मंडप, दीप माळ, अंबाबाई मंदिरातील बागेचे सुशोभिकरण, कारंजा आणि स्वच्छतागृहासाठी ७ कोटींची तरतूद केली आहे. भवानी मंडप परिसराचे सुशोभिकरण ४ कोटी, जुना राजवाड्याच्या वापरात नसलेल्या जागेचे सुशोभिकरण करुन तेथे विशेष दालन उभारणीसाठी १.५ कोटी, आपत्कालीन व्यवस्थापनात फायर इंजिन, फायर हाउस व अन्य सुविधांसाठी १ कोटी, हेल्थ अँड केअर सेंटरसाठी ५० लाख आणि सुरक्षा यंत्रणेसाठी ५ कोटी, सरस्वती चित्रपटगृह, व्हीनस कॉर्नर, बिंदू चौक येथे पार्किंगच्या सुविधेसाठी ५० कोटी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ३.५ कोटी, युटीलिटी शिफ्टींग १० कोटी असा आराखडा करण्यात आला आहे.
तीर्थक्षेत्र आराखड्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडून शासकीय तंत्रनिकेतनकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. हे काम आठ दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर पुन्हा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर केला जाईल. त्यानंतर सरकारची मंजूरी मिळेल. त्यानंतर त्वरीत कामे सुरू होतील.
नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट