महामार्गावर वाहनधारकांची लुबाडणूक करणे, घरफोड्या आणि मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. गणेश रतन नवले (वय २५), संदीप चंद्रकांत सोनवणे (२८, दोघेही रा. पेठ वडगाव, ता. हातकणंगले), प्रशांत तानाजी ननवरे (२८, रा. निमशिरगाव), विकास काशीनाथ नाईक (२४, रा. नागाव) आणि अरुण रामू चव्हाण (२१, रा. शिरोली पुलाची) या पाच चोरट्यांनी कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटकातही चोऱ्या केल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील चार लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व पोलिस रेकॉर्डवरील सराईत चोरटे आहेत.
कागल येथे पुणे-बेंगळुरू महामार्गावर २६ सप्टेंबरला अज्ञात चोरट्यांनी शहावीर दिलीप गायकवाड या ट्रकचालकास अडवून मारहाण करीत त्यांच्याजवळचा मोबाइल आणि किमती ऐवज लांबवला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सराईत चोरट्यांच्या टोळीची माहिती मिळाली होती. पोलिसांनी संशयितांवर पाळत ठेवून शहरातील गुजरी येथे प्रशांत ननवरे आणि गणेश नवले या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो चोरीतील सोन्याचे दागिने विकायला आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर आणखी तिघांची नावे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी संदीप सोनवणे, विकास नाईक आणि अरुण चव्हाण या तिघांना पेठवडगाव येथून अटक केली. यांनी ट्रकचालकाची लूटमार केल्याची कबुली दिली. या टोळीचा म्होरक्या गणेश नवले असून, त्याच्यावर चेन स्नेचिंगचे १९, घरफोडी आणि ट्रक चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. इतरांवर चेन स्नेचिंगसह घरफोडीचेही गुन्हे दाखल आहेत. या टोळीने कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि निपाणी परिसरात चोऱ्या केल्या होत्या. पोलिसांनी चोरट्यांकडून चार मोटारसायकली, १० तोळे सोन्याचे दागिने, चार मोबाइल हॅण्डसेट आणि रोख दोन हजार रुपये हस्तगत केले. या टोळीने आणखी काही चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेशनचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या पथकाने चोरट्यांची टोळी जेरबंद केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट