कोपर्डी घटनेबाबत खदखदत असलेला संताप आणि शिक्षण, रोजगारांच्या संधींसाठी सजग झालेला मराठा समाज मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून विविध प्रलंबित मागण्या घेऊन शनिवारी (१५ ऑक्टोबर) कोल्हापूरच्या रस्त्यावर उतरणार आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्याबरोबरच सांगली, सातारा तसेच सीमाभाग, कोकणातून प्रचंड संख्येने मराठा समाज शहरात दाखल होणार असल्याने हा मोर्चा ‘न भूतो...’ होईल. चार विविध ठिकाणाहून मोर्चा सुरू होऊन दसरा चौकात येणार असल्याने शनिवारी सकाळपासून शहरात येणाऱ्या नऊ मार्गावरील तसेच अंतर्गत वाहतूक मोर्चा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मोर्चामुळे शहरात अघोषित बंदचे वातावरण राहणार आहे.
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाचे नेतृत्व रणरागिणी करणार आहेत. सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित मोर्चाची सुरुवात शिवाजी पेठेतील गांधी मैदानातून सकाळी अकरा वाजता होणार आहे. राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदनेनंतर मोर्चा सुरु होईल. गांधी मैदानबरोबरच सायबर चौक, रूईकर कॉलनीतील संभाजी महाराज पुतळा आणि कसबा बावड्यातील भगवा चौक या ठिकाणांवरून एकाचवेळी मोर्चा सुरू होईल. मोर्चाच्या अग्रभागी युवती, महिला असतील. मोर्चा मार्गावरील शिवाजी महाराज, बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजाराम महाराज, महाराणी ताराराणी, दसरा चौकातील राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यांना मुलींच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता सहा मुलींचे शिष्टमंडळ विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना देणार आहे. त्यानंतर दसरा चौकात या मुलींची भाषणे होतील. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन मोर्चा विसर्जित होणार आहे.
प्रत्येक चौकाचौकात लावण्यात आलेले, वाहनांवर फडकणारे भगवे ध्वज, मोठमोठे फलक यामुळे शहरातील वातावरण भगवे बनले आहे. भगवे ध्वज घेऊन जाण्यासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यालयांत दिवसभर लगबग होती. मोर्चामार्गावर वॉच टॉवर उभारले आहेत. तसेच सर्व सहभागींना सूचना करण्यासाठीची ध्वनी यंत्रणाही उभारण्यात आली आहे. विविध चौकांत मोर्चा पाहण्यासाठी १५ स्क्रिन बसवले आहेत. शुक्रवारी दुपारपासूनच मोर्चाच्या विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. शनिवारी शहराच्या रस्त्यावर साडेचार हजार पोलिस राहणार आहेत. शिवाय मोर्चातील दहा हजार स्वयंसेवक नेमलेल्या ठिकाणी हजर राहतील. शहरात नऊ प्रवेशद्वारांकडून येणाऱ्या वाहनांची पार्किंगची ६५ ठिकाणी व्यवस्था केली आहे. शिवाजी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, राजाराम कॉलेज, शेंडा पार्क, तपोवन अशी पार्किंगची मोठी ठिकाणे असतील. जवळपास पाच लाखाहून अधिक वाहने कोल्हापुरात येतील असा पोलिसांचा अंदाज आहे. केएमटी तसेच रिक्षा वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट