मोर्चावेळी कोणत्याही राजकीय नेत्याची लुडबूड खपवून घ्यायची नाही. कुणी गोंधळ, घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न करत असेल तर स्पेशल टीमला तत्काळ सूचना द्या. मोर्चा संपून लोक घरी जाईपर्यंत नेमून दिलेली जागा सोडायची नाही. स्वतः बोलायचे नाही व कुणालाही बोलू द्यायचे नाही. घोषणाबाजी कुणी करत असल्यास त्यांना तत्काळ रोखा. कुणालाही स्वतःचे बॅनर घेऊन येऊ द्यायचे नाही. सेल्फी काढायचा नाही व काढू द्यायचा नाही, अशा मराठा क्रांती मोर्चातील कडक आचारसंहितेचे शब्द आणि शब्द जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून स्वयंसेवक बनण्यास आलेले युवक, युवती कानात साठवून घेत होते. निमित्त होते मराठा क्रांती मोर्चासाठी स्वयंसेवकांच्या बैठकीचे.
मराठा क्रांती मोर्चासाठी विविध पातळीवर तयारी सुरू आहे. त्याचपद्धतीने मोर्चातील शिस्त राखण्यासाठी महत्त्वाचा भाग असलेल्या स्वयंसेवकांसाठीच्या तयारीसाठी सोमवारी शिवाजी मंदिरमध्ये नियोजनाची पहिलीच बैठक घेण्यात आली. त्यासाठी जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून युवक, युवती उपस्थित होते. त्यामुळे शिवाजी मंदिर खचाखच भरले होते. अक्षरशः जिथे जागा मिळेल तिथे युवक बसले होते. दहा हजार स्वयंसेवक नेमण्यात येणार असून सोमवारअखेर सात हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाली आहे. त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येत असून अकरा तारखेनंतर ओळखपत्रे, टी शर्ट, जॅकेटस वितरित करण्यात येणार आहेत. त्यापुर्वी स्वयंसेवकांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत कडक आचारसंहितेची ओळख करून देण्यात आली.
स्वयंसेवक संयोजन समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत आचारसंहिता स्पष्ट करण्याबरोबरच अनेकांकडून सूचनाही घेण्यात आल्या. मोर्चाच्या एक किलोमीटर अंतरावर एक हजार अशा प्रमाणात स्वयंसेवक युवक, युवती नेमण्यात येणार आहेत. शंभर स्वयंसेवकांचा एक गट अशा पद्धतीने नियोजन केले जाणार असून प्रत्येक गटातील सदस्यांपर्यंत सूचना पोहचवण्यासाठी त्यातील दोन प्रमुख नेमले जाणार आहेत.
मोर्चामध्ये शिस्त राखण्याची मोठी जबाबदारी स्वयंसेवकांवर आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणूनच काम करायचे असल्याने जबाबदारीने वागण्याची सुरुवात आतापासूनच करा,’ असे मार्गदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्याशिवाय हा मूक मोर्चा असल्याने कुणीही बोलणार नाही. कोणत्याही घोषणा त्यात नसतील. कुणी देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला बाहेर काढण्याची जबाबदारी या स्वयंसेवकांवर देण्यात आली आहे. भगवे झेंडे सोडल्यास स्वतःच्या संघटनेचे, पक्षाचे, संस्थेचे बॅनर आणण्यास परवानगी नाही. महिला, लहान मुले, वृद्धांसाठी तातडीने सुविधा द्यायच्या. स्वयंसेवकांनी सेल्फी काढायची नाही, फोटो घ्यायचे नाहीत. त्याचपद्धतीने मोर्चात सहभागी होणाऱ्यांनाही सेल्फी अथवा फोटो काढू द्यायचे नाहीत. ११ तारखेच्या दरम्यान आणखी एक बैठक होणार असून त्यानंतर नेमणुकीच्या जागांविषयची माहिती तसेच टी शर्ट, जॅकेटस, ओळखपत्र देण्यात येणार आहे.
लाखो नागरिक रस्त्यावर असल्याने त्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी असलेल्या स्वयंसेवकांनी सोबत मौल्यवान वस्तू आणू नये. संयोजन समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सूचनांचाच अवलंब करायचा आहे.
लूडबूड खपवून घ्यायची नाही
कुणी राजकीय नेता ऐनवेळी काही सांगून लुडबुड करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे वर्तन खपवून घ्यायचे नाही. त्याच्या लुडबुडीचा परिणाम होऊ द्यायचा नाही. गोंधळ निर्माण होत असेल तर नेमण्यात येणाऱ्या स्पेशल टीमकडे तत्काळ सूचना करा. पोलिसांचे सहकार्य लागणार नाही. पण त्यांना त्रास होईल, असे काहीही होऊ द्यायचे नाही. मोर्चामध्ये स्वच्छता हे प्रमुख कर्तव्य आहे. त्यामुळे मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांनाच प्लास्टिकच्या पिशवीचा, पाण्याच्या बाटलीचा कचरा होऊ द्यायचा नाही याबाबतचे मार्गदर्शन करायचे आहे. सर्व लोक घरी गेल्याशिवाय जागा सोडयची नाही असे आवाहनही केले.
तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह व भानही
आचारसंहितेची माहिती दिल्यानंतर ज्यांना सूचना करायची, त्यांनी करावी असे सांगितले. त्यावेळी अनेक युवक, युवतींनी मराठा समाजाच्या दबलेल्या भावनांना वाट मोकळी करुन देत असताना सामाजिक जबाबदारीचे भानही राखले जात असल्याचे पहायला मिळाले. पानिपतच्या युद्धानंतर मराठा समाज एकत्रित आला आहे. त्या एकत्रितपणाला कोणतेही गालबोट लावता कामा नये, हे अनेकांनी सांगितले. इतक्या वर्षांनी एकत्रित झालेला हा समाज या मोर्चानंतरही एकत्रित राहिला पाहिजे. अनेकांनी व्हॉटस अॅप ग्रुप बनवले आहेत. त्यावर मराठा समाजाला शोभेल असेच संदेश टाकण्याची सूचनाही करण्यात आली. ‘महाराष्ट्राच्या मातीचा रंग लाल असून ते मराठ्यांच्या रक्ताने ती लाल झाली आहे,’ असेही भावनाप्रधान वक्तव्य करुन उपस्थित युवक, युवतींमध्ये चैतन्य निर्माण केले. ‘आता मराठ्यांकडून दिल्लीचे तख्त राखायचे नाही तर ते तख्तच ताब्यात घ्यायचे आहे. त्यासाठी राजकारण्यांवर विश्वास ठेवू नका,’ असेही काहींनी निक्षून सांगितले. काहींनी जिल्ह्यातून पहाटेपासून येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची सूचना केली.
१४ व १५ रोजी मंगल कार्यालये उघडी
मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठया प्रमाणावर नागरिक येणार आहेत. त्यांच्या सोईसाठी १४ च्या मध्यरात्रीपासून १५ तारखेला दिवसभर शहरातील मंगल कार्यालये उघडी ठेवण्यात येतील, असे संयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.
ड्रेसकोड
स्वयंसेक (तरुण)
काळा टि शर्ट, निळी जीन्स, पांढरा बूट, गळ्यात ओळखपत्र
स्वयंसेवक (तरुणी)
निळी जीन्स व कोणताही टॉप अथवा स्वयंसेवक म्हणून काम करण्यास योग्य असा वेश, त्यावर जॅकेट, पायात पांढरा बूट, गळ्यात ओळखपत्र
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट