म. टा. वृत्तसेवा, मिरज
बलात्कार पीडित विवाहिता स्वाती अमर कुडचे हिच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अमित अण्णासाहेब कुरणे (२७), वडील अण्णासाहेब तमण्णा कुरणे (६०) आणि आई सुनीता तमण्णा कुरणे (६० रा. तिघे शिवाजीनगर) यांना अटक केली. शनिवारी रात्री विवाहितेने कुरणे मळा कुरणे यांच्याच बंगल्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अटक केलेल्या आरोपींची धिंड काढण्याच्या मागणीसाठी विविध राजकीय व सामाजिक महिला संघटनांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. पोलिस राजकीय दबावातून धिंड काढत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान तिन्ही आरोपींना मिरज कोर्टासमोर उभे केले असता, कोर्टाने बारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
स्वातीने ६ जुलै रोजी अमितच्या विरोधात शहर पोलिसांत बलात्काराची फिर्याद दिली होती. फिर्याद दिल्यानंतरही अमितने स्वातीला पुन्हा फूस लावून तिला कृष्णाघाट येथील आपल्या फॉर्म हाउसवर ठेवले होते. मात्र, तेथेही अमितच्या आई-वडिलांकडून तिचा छळ सुरूच होता. कुरणे कुटुंबीयांनी स्वातीवर घर सोडून जाण्यासाठी त्याला धमकीही दिली होती. मात्र, स्वातीने स्पष्ट नकार दिल्याने अमितची आई सुनीता कुरणे हिने शनिवारी सायंकाळी स्वातीच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलिसांत खंडणीची तक्रार दिली होती. त्याच रात्री स्वातीने कुरणे मळ्यातील बंगल्यातील स्वयंपाक घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. कुरणे कुटुंबीयांच्या जाचाला कंटाळून स्वातीने आत्महत्या केल्याने रविवारी सकाळी तिचे नातेवाईक आणि महिला संघटनांनी शहर पोलिसांत धाव घेऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी रविवारी रात्री अमितचे वडील अण्णासाहेब कुरणे आणि आई सुनीता कुरणे यांना अटक केल्यानंतर स्वातीवर अंत्यसंस्कार करण्यात आला.
महिला पदाधिकाऱ्यांचा गोंधळ
आरोपींना कोर्टात उभे करणार असल्याचे कळताच नगरसेविका संगिता हारगे, अभिजित हारगे, मनसे महिला जिल्हाध्यक्षा अॅड. स्वाती शिंदे, अॅड. प्रविणा हेटकाळे, राष्ट्रवादीच्या राधिका हारगे, शिवसेनेच्या सुवर्णा मोहिते, सुनीता मोरे, शोभा अडसूळ यांच्यासह शहरातील विविध सामाजिक आणि राजकीय महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलिसांत गर्दी केली. त्यांनी आरोपींना धिंड काढत कोर्टात नेण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी मागणी नाकारल्याने महिला संतप्त झाल्या. त्यांनी शहर पोलिस ठाण्यातच गोंधळ घातला. आरोपींच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. या झटापटीत मनसेच्या स्वाती शिंदे यांनी आरोपी अमितच्या कानशिलात लगावल्या. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.
पीआय सुवर्णा पत्की निलंबित
बलात्कार पीडितेवर खंडणीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौकीच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. नजीकच्या पोलिस ठाण्यात आपल्यावर बलात्कार झाल्याची फिर्याद देणाऱ्या महिलेच्या बाबतीत संवेदनशीलता न दाखविता, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता उलट त्या महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची घाई पत्की यांनी केल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मिरजेतील बलात्कार पीडित महिलेने संशयिताच्या घरात आपल्यावर अत्याचार करणाऱ्या संशयिताचे नाव भिंतीवर लिहून ठेवून आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ माजली. अत्याचाराची सीमा ओलांडणाऱ्या या घटनेला पोलिसही तितकेच जबाबदार असल्याचे समोर येताच संतापाची तीव्रता वाढली. कोल्हापुरात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना आवर घालण्यासाठी कार्यरत होत असलेल्या निर्भया पथकाच्या शुभारंभासाठी आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर याही सांगलीकडे धावल्या.
रहाटकर म्हणाल्या, 'मिरजेतील पीडितेवरील बलात्काराचे आणि नंतर तिच्यावर अगदी असंवेदनशीलतेने खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे प्रकरण चीड आणणारे आहे. पीडितेच्या बाबतीत जे काही घडले ते दुःखदायी आहे. अत्यंत वाईट पद्धतीने तिला त्रास दिला गेला. वास्तविक पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेऊन वेळीच तिला न्याय आणि आधार द्यायला हवा होता. परंतु, महात्मा गांधी पोलिस चौकीच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की या एक महिला असतानाही त्यांना त्या महिलेची दया आली नाही. पत्की यांनी पीडितेवरच खंडणीचा गुन्हा दाखल केला. रक्षकही आपल्या बाजूने नसल्याने त्या बिचारीला आत्महत्या करावी लागली. तिचा हाकनाक बळी गेला, ही साधीसुधी घटना नाही. नजीकच्या पोलिस ठाण्यात पीडितेने बलात्काराची फिर्याद देऊन न्याय मागितला आहे. तिच्यावरच खंडणीचा आरोप होतो, ती बलात्कार पीडित आहे. हे माहित असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता सुवर्णा पत्की यांनी खंडणीसारखा गंभीर गुन्हा दाखल करून निष्काळजीपणा दाखविला आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केली आहे.'
आत्महत्या करण्यापूर्वी आपल्यावर बलात्कार झाल्याची फिर्याद देण्यासाठी संबधित पीडितेला मिरजेच्या शहर पोलिस ठाण्यात अनेक हेलफाटे घालावे लागल्याचेही समोर आले आहे. त्या बाबत पोलिस अधीक्षक शिंदे यांच्यांकडे राहटकर यांनी खुलासा मागितला आहे. त्यावर तत्काळ कार्यवाही करीत शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
विशेष वकील देणार : रहाटकर
रक्षकांनी रक्षकाचेच काम केले पाहिजे. केवळ महिलाच नाहीतर कोणीही सर्वसामान्य व्यक्ती आपल्यावरील अन्याय झाल्याची कैफीयत घेऊन आली तर पोलिसांकडून निष्काळजीपणा होता कामा नये. निष्काळजीपणा झाल्याचे समोर येताच कारवाई अटळ असल्याचे सांगून रहाटकर म्हणाल्या, मिरजेतील प्रकरणात हवे त्या प्रकारचे सहकार्य करण्यास महिला आयोग कटिबद्ध आहे. जलद न्यायालयात हा खटला सुनावणीला घेऊन विशेष वकिलांची नियुक्ती करून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न राहतील.
फौजदार बनसोडेच्या बडतर्फीचा प्रस्ताव
गडचिरोलीतून सांगलीत बदली झालेला आणि उस्मानाबादमध्ये पिस्तूलचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला फौजदार प्रेम बनसोडे याला निलंबित करण्यात आले आहे. बदलीनंतर सांगलीत हजर होताच सुट्टी घेऊन उस्मानाबादला गेलेल्या बनसोडेचा गुन्हा समोर येताच त्याला पोलिस कोठडीत धाडले आहे. घटनेतील ३११ कलमानुसार त्याच्यावर बडतर्फीचा प्रस्ताव तयार करुन तो गृहखात्याकडे पाठविण्यात आला आहे.
मसूचीवाडी प्रकरणी सरपंचाकडून निष्काळजी
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मसूचीवाडी प्रकरण मध्यंतरी राज्यभर गाजले. छेडछाडीला वैतागून गावातील मुलींनी कॉलेजला जाणे बंद केले होते. या बाबत त्या गावात येऊन तुम्ही दिलेल्या आदेशांचे पालन झाले का? असा सवाल पत्रकारांनी करताच रहाटकर म्हणाल्या, त्या गावातील मुलींसाठी बसेस सुरू करण्याचे आदेश दिले होते. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्यही काही उपाययोजना सुचविल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झाली की नाही, याची माहिती देण्यासाठी सरपंचाना सांगितले होते. परंतु, त्यांनी काहीच कळविले नाही. त्या ठिकाणी बस सुरू झाली आहे. त्या प्रकरणात अद्यापही चौथा आरोपी गजाआड झालेला नसल्याबाबतही राहटकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना त्वरीत कारवाईच्या सूचना दिल्या.
सलमान खानला तीन नोटीसा
प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने महिलांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यांबाबत महिला आयोगाकडे कोणी तक्रार दिली नाही, म्हणून आयोग गप्प बसले नाही. त्या वक्तव्यांबाबत सलमानला तीन नोटीसा बजावल्या आहेत. त्यांने दिलेले उत्तरही खूप मोठे आहे. त्याचा अभ्यास सुरू आहे. मुद्दा महिलांच्या सन्मानाबद्दलचा असल्याने त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही रहाटकर यांनी दिली.
निर्भया पेटीचा उपक्रम राबणार
सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी दहापेक्षा अधिक महिला असतील तर त्या ठिकाणी लैंगिक शोषणाबाबतच्या तक्रारीचे निवारण, वेळ प्रसंगी संबधितांवर शिक्षेची कारवाई करण्यासाठी विशाखा समिती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, कार्यपद्धतीच माहित नसल्याने समित्यांचे काम ठप्प आहे. त्या सर्वाना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळा, कॉलेजांत 'निर्भया पेटी' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये लिखित तक्रारी टाकता येतील. त्याची दखल पोलिसांकडून घेऊन त्वरीत कार्यवाही करण्यात येईल.