Aunradha.Kadam
@timesgroup.com
आयुष्यात बारावीसारख्या महत्त्वाच्या वळणावर अपयशाची ठेच लागली. नैराश्याने ग्रासलेल्या मनाने काहीकाळ खच खाल्ली. पण आई वडील आणि भाऊ यांनी पुन्हा नव्याने प्रयत्न कर, या शब्दातून दिलेला आधार त्याला उभारी घेण्याचे बळ ठरला. बारावी पास होत लॉ ची ड्रिगी मिळवली. अभ्यासाचे तंत्र आणि गोडी यांची नस सापडली आणि काही वर्षापूर्वी अपयशाने कोमेजलेल्या डोळ्यांत यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेचं शिखर गाठण्याचं स्वप्न आकाराला आलं. एक अपयशाची ठेच ते केंद्रीय प्रशासकीय सेवेच्या परिघात घेतलेली झेप हा प्रवास शीतल वाली या मध्यमवर्गीय कुटुंबातील एका मुलाचं आयुष्य घडवणारा ठरला. समाजाकडे पाहण्याची दृष्टी आणि समाजासाठी काम करण्याची जाणीव मला या परीक्षेच्या निमित्ताने झाली, अशा शब्दांत शीतल यूपीएससीच्या यशानंतर त्याच्या प्रवासाला जबाबदारीचा आयाम देतो. नापास झालेल्या मुलांचे खच्चीकरण करून त्यांच्या शिकण्याच्या प्रवासाला खीळ घालू नका, असे सांगत शीतल समाजातील अतिमहत्त्वाकांक्षी पालकांनाही चिमटा काढतो. ठेच लागली तरी झेप घ्या, या एका वाक्यात शीतलने खूप काही सांगितले.
०००००
मला हेच करायचे होते
मराठी माध्यमात शालेय शिक्षण, बारावीत गणित हुकलं आणि नापास झाल्याचा शेरा, त्यानंतर ऑक्टोबर वारी करून पास होत पुढे लॉ चा टफ अभ्यासक्रम झेलत मिळवलेली पदवी अशा नेहमीच्या चौकटीतच शैक्षणिक प्रवास सुरू असताना मला यूपीएससीच करायचं आहे पक्कं होतं. अर्थात त्यासाठी जे कष्ट घ्यायचे आहेत ते मलाच याचीही खूणगाठ मी बांधली. आजपासून सहा वर्षांपूर्वी २०१०ला अभ्यासाला सुरुवात केली. स्पर्धा परीक्षा म्हणजे दिवसाचे आठ-दहा तास अभ्यास, शरीराचा आणि मनाचाही व्यायाम याची तयारी आलीच. त्यासाठी नियोजन केले. अनुभव काहीच नव्हता. स्पर्धा परीक्षा द्यायची आहे हे घरी सांगितलं आणि नेहमीप्रमाणे पाठिंबा मिळाला. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करायचा तर दिल्लीत क्लासेस चांगले आहेत, त्यामुळे दिल्ली गाठली. तिथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना गाठलं. चांगल्या क्लासची माहिती मिळवली. क्लासचालकांना भेटलो. या यंत्रणेची काही तरी माहिती हवी आणि अभ्यासातील नेमकेपणा यावा यासाठीच हा क्लासप्रपंच मांडला. त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे एकेका मार्काने हुकणाऱ्या रँकसाठी धडपडणाऱ्या या स्पर्धा परीक्षेसाठी एकत्र आलेल्या मुलांमध्ये सहकार्याची भावना किती ओतप्रोत भरली आहे. जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्याला सांगण्यासाठी इथे नेहमीच खुलेपणा आहे. अभ्यास करूनही माझे अजून काहीच झाले नाही म्हणत वर्गात पहिले येणारे स्कॉरल मित्र आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यामुळेच हरतऱ्हेची मदत करण्यासाठी पुढे असलेल्या दिल्लीतल्या मुलांकडून, इतरांना मदत करण्याचा धडा गिरवला. दरम्यान, सलग सहा वर्षांत कधी पूर्व परीक्षेपर्यंत जायचो, तर कधी मुख्य परीक्षेपर्यंत. एक वर्ष मुलाखतीपर्यंत जाऊन आलो, पण यश आले नाही. गेल्यावर्षी पास झालो, पण रँक वाढावी यासाठी यावर्षी प्रयत्न केला. करून दाखवायचेच ही जिद्द होतीच. त्याचे फळ मिळाले.
चुकांमधून शिकत गेलो
सहा वर्षांत परीक्षा देत होतो, पण पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत एकावेळी काही तरी चुकायचे. परीक्षा झाली की विचार करताना कुठे चुकलं हे लक्षात यायचे. शिवाय परीक्षा आणि अभ्यास हे इतकं भिनलेलं की, या परीक्षेतील माझा निकाल काय असेल हे ताडण्याचाही एक अनुभव आला. मग त्याच अनुभवाचा वापर चुकांच्या मूल्यमापनासाठी करायचे ठरवले. प्रश्नपत्रिका संच चाळला. मुलाखतीतील प्रश्नांची दिलेली उत्तरे आठवली. सगळ्याचा एक चार्ट बनवला. पूर्वपरीक्षा क्रॅक केली, त्यावर्षी मुलाखतीत मागे पडलो होतो. त्याची कारणं शोधली. हाती येणाऱ्या कारणांचाच अभ्यास केला. जीएसमध्ये रँक वाढायला या पद्धतीचा इतका उपयोग झाला की, हा केवळ अभ्यास किंवा परीक्षेची तयारी नव्हती तर यातून मी यशाच्या अधिक जवळ जात होतो.
यूपीएससीच का निवडलं
आधी एमपीएससी देऊन बघू, पास होऊन पोस्ट घेऊ आणि त्यानंतर यूपीएससीकडे वळू असा विचार करणारे मित्र माझ्याही आसपास होते, पण माझा निर्धार ठाम होता. मला असं वाटतं की, हे खूप बहुआयामी क्षेत्र आहे. माझे आई-वडीलही सरकारी नोकरदार आहेत. अशा प्रकारच्या कामातून समाजाशी जोडण्याची संधी मिळते. यूपीएससीमुळे शहरात, निमशहारात, खेड्यापाड्यात काम करण्याची संधी आहे. अधिकार देणारं हे क्षेत्र आहे. आपल्या एका सहीमुळे कुणाचे तरी आयुष्य सुकर करण्याचा आनंद या क्षेत्रातील सेवेत आहे असे मला वाटते. व्यक्ती म्हणून मला राजकारणी, संघटना, समाजसेवक यांचे विचार आवडू शकतात, पटू शकतात. मात्र, निर्णय घेताना मात्र माझ्यात तटस्थपणे सारासार विचार करण्याची क्षमता असलीच पाहिजे. आणि हेच मला करायचे आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही वाट माझीच आहे असे वाटते. भविष्यात महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबत विश्वासार्हता असणे ही देशाची ताकद आहे. त्याचा एक भाग बनून मला सेवा करायची आहे.
यूपीएससी सोपी आहे...
यूपीएसी एमपीएससीपेक्षा अवघड आहे, हा मोठा गैरसमज आहे. यूपीएससीचा अभ्यासक्रमात नेमकेपणा आहे. पाठांतरापेक्षा एखाद्या गोष्टीच्या तार्किक मताला येथे महत्त्व आहे. एखाद्या विषयावरे तुमचे मत किती लॉजिकल आहे आणि समोरच्या व्यक्तीला ठामपणे पटवून देऊ शकता याला महत्त्व आहे. इंग्रजीचाही बाऊ केला जातो, पण माझे इंग्रजीही जेमतेम आहे. पण थिंकिंग पॉवर कशी आहे यावर तुमचं मूल्यमापन होत असतं. संकल्पना समजून घेता आली पाहिजे. तुलनात्मक मांडणी करण्याचे कौशल्य सशक्त असले पाहिजे. शिवाय आपल्या बायोडाटावर आधारित आपली मुलाखत होत असते. त्यामुळे आपण स्वतःला ओळखणं या प्रवासात खूप गरजेचे असते. प्रत्येक मुद्यावर तुमचे मत हवे आणि ते मांडण्याचा आत्मविश्वास असेल तर यूपीएससी परीक्षा अवघड नाही. मात्र, अजूनही याबाबत जागृती नाही. मुलांच्या मनातील न्यूनगंडाची जागा आत्मविश्वासाने घेतली तर यश दूर नाही. मराठी मुलांमध्ये खूप टॅलंट आहे. त्यांच्या मनातून स्पर्धा परीक्षांची भीती गेली तर या क्षेत्रात मराठी नावांची यादी वाढेल. सीबीएससी अभ्यासक्रमावर ही परीक्षा असल्यामुळे दडपण येणे स्वाभाविक आहे.
इंटरनेटमुळे माहितीचा खजिना
या परीक्षेसाठी नॅशनल न्यूज पेपर, पुस्तके आणि स्वतः काढलेल्या नोट्स यावर मी अभ्यास केला. मात्र, या सगळ्या माध्यमांमध्ये मला इंटरनेटची सर्वांत जास्त मदत झाली. माहितीचा खजिना आहे यामध्ये. फक्त त्यातून नेमके काय घ्यायचे याचे तंत्र जाणून घेतले. नाहीतर वेळ वाया जाऊ शकतो. केवळ सर्चिंग नव्हे तर परीक्षेतील प्रश्नांच्या अनुषंगाने काय हवे यांचा नेमका शोध मला उपयोगी ठरला.
हाच तो यू टर्न
सहा वर्षाच्या प्रयत्नांनंतर यंदा माझा हा शेवटचा प्रयत्न होता. हातात लॉची पदवी होती, वकिली करणार हा पर्याय होताच, पण कसून अभ्यास केला. चुका सुधारत पुढे आलो. प्रशासकीय सेवेचा ध्यास घेत एकेक पायरी चढत गेलो. यावेळी हरलो तर लढण्याचीही संधी नव्हती. जे येतं ते मांडलं. आत्मविश्वासाची कास सोडली नाही. हा माझा अखेरचा प्रयत्न असला तरी यूपीएससी परीक्षा पास होत आयुष्याला नव्याने सामोरे जाण्याची सुरुवात आहे.