म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'पालकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. समस्यांच्या सोडवणुकीमध्ये बहुतांश वेळ जात असल्याने पाल्यांच्या विकासावरील लक्ष विचलित होत आहे. अशावेळी पालक आणि पाल्यांमध्ये संवाद घडणे आवश्यक आहे. कुटुंबातील वातावरण तणावविरहित ठेवण्याबरोबरच त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोनाची बीजे रोवण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा,' असे आवाहन प्रा. शशिकांत कापसे यांनी केले.
महाराष्ट्र टाइम्स आणि ओम सायन्स अॅकॅडमीतर्फे 'अकरावी सायन्सकरिता यशाचा कानमंत्र' या दोनदिवसीय मोफत कार्यशाळेत ते बोलत होते. दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम, परीक्षेतील बदलाची माहिती, पेपर कसा सोडवावा, उत्तरपत्रिका कशी लिहावी. कोणत्या घटकांचे पाठांतर करावे, लेखन कौशल्य आणि वेळेच्या नियोजनासह तणावमुक्त परीक्षा कशी द्यावी, याचा कानमंत्र कार्यशाळेत मार्गदर्शक प्रा. कापसे यांनी दिला. रविवार पेठेतील जैन गल्ली येथील अॅकॅडमीच्या हॉलमध्ये कार्यशाळा सुरू आहे.
प्रा. कापसे म्हणाले, 'दहावीत ९० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी बारावी सायन्समध्ये केवळ ५५ टक्के गुण मिळवितात. याबाबत मी चार वर्षे संशोधन केले असून, विद्यार्थ्यांमध्ये २८ प्रकारच्या समस्या दिसून आल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यात एक शास्रज्ञ दडलेला असतो. मानसिक ताण, अभ्यासाचे नियोजन कुटुंबामध्ये सातत्याने संवाद ठेवल्यास या समस्या त्वरित निकालात निघू शकतात. दहावीनंतर बारावी हा करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असून, यावेळी अभ्यासात चिकाटी आणि ध्येय निश्चित केल्यास उज्ज्वल करिअर घडू शकते. पालकांनी मुलांकडून जरूर अपेक्षा ठेवाव्यात. मात्र, यासाठी त्यांनी त्यांच्याशी संवाद ठेवण्याची गरज आहे. संवादातून अनेक समस्यांची निर्गत होऊन मुलांच्या विकासावर लक्ष केंद्रित करता येते.'
प्रा. सुहास देशपांडे म्हणाले, 'राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) एकूण ७२० गुणांची घेतली जाते. गुणवत्ता यादीत येण्यासाठी ५०० गुण मिळवावे लागतील. यासाठी विद्यार्थ्यांनी अकरावी व बारावीला पीसीएमबी (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथॅमेटिक्स, बायोलॉजी) ग्रुप ठेवावा लागेल. 'नीट'बरोबरच सीईटी व जेईई परीक्षांचीही तयारी करण्यासाठी अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमांचा सखोल अभ्यास करावा. प्रत्येक पाठावर २५ प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची तयारी करण्यासाठी पाया मजबूत असायला हवा. असे झाल्यास कोणत्याही परीक्षेमध्ये हमखास यश मिळते. यासाठी सराव आणि वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.'
प्रा. प्रदीप जनवाडे म्हणाले, 'आयटी क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी मॅथ्स विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उपग्रह, दळणवळण यामधील सांख्यिकी आकडेमोडींचा अंतर्भाव होतो, तर सीईटी परीक्षेसाठी 'ए' ग्रुपमध्ये मॅथ्स अनिवार्य आहे. मॅथ्सचा इतर विषयांशी समन्वय असल्याने कम्प्युटर प्रोग्रॅम, c++ प्रोग्रॅमध्ये वापर होतो. अॅडव्हान्स कम्प्युटर टेक्निक्समध्ये मॅथ्समधील समीकरणांचा वापर केला जात असल्याने या विषयांतून विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.'
यावेळी प्रा. शगुप्ता मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. रविवारी होणाऱ्या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
मी दहावीची परीक्षा दिलेली असून, निकालाचे वेध लागले आहेत. चांगले गुण मिळणार याची शंभर टक्के खात्री असल्याने कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा याच विचारात होतो. मटाच्या कार्यशाळेतून एक दिशा मिळाली आहे. केवळ अकरावी प्रवेशाबाबतच नाही, तर नीट, सीईटी व जेईई प्रवेश परीक्षेचीही चांगली माहिती मिळाली.
रविराज पाटील, विद्यार्थी
दहावीनंतर करिअरला सुरुवात होते. अशावेळा अनेकांकडून वेगवेगळे मार्गदर्शन मिळते. मात्र, मटाच्या कार्यशाळेतून नेमके काय करायला हवे, याबाबतच उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले. याचा फायदा पुढील अभ्यासाची दिशा ठरविण्यात उपयोगी ठरेल. अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करून महाराष्ट्र टाइम्सने आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे.
प्रणाम राजाज्ञा, विद्यार्थी
कार्यशाळेतून चांगल्या टिप्स मिळाल्या. अनेकवेळा पालकांकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या जातात. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक तणाव निर्माण होतो. काहीवेळा पालक व विद्यार्थ्यांमध्ये संवादच घडून येत नाही. अशावेळी विद्यार्थ्यांबरोबर कसा संवाद साधावा याची उत्कृष्ट माहिती मिळाली.
सविता नाईक, पालक
पालकांनी मुलांशी अधिकाधिक संवाद साधताना कुटुंबातील वातावरण कसे खेळीमेळीत राखावे याबाबद कार्यशाळेतून चांगली माहिती मिळाली. अभ्यासाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा याचेही बहुमोल मार्गदर्शन मिळाले. दहावीचा निकाल लागण्यापूर्वी अशा कार्यशाळेचे नियोजन करून विद्यार्थ्यांच्या करिअरला चांगले वळण दिले आहे.
मीना विभूते, पालक