म. टा. वृत्तसेवा, सातारा लोणंद नगरपंचायतीच्या सत्तास्थापनेच्या डावाने वेगळीच कलाटणी घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अपक्ष नगरसेवक सचिन शेळके काँग्रेसच्या गुहेत शिरल्याने राष्ट्रवादीच्या गोटात शांतता पसरली आहे. अपक्षासह काँग्रेस-भाजपचे नगरसेवक लोणंदच्या बाहेर असले तरी भाजपाने आपली भूमीका गुलदस्त्यात ठेवल्याने राजकारणाला ऐनवेळी कलाटणी मिळू शकते. लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली होती. मात्र, त्यांना संपूर्ण बहुमत प्राप्त करता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, काँग्रेसचे ६, भाजपाचे २ तर अपक्ष १ उमेदवार निवडून आला आहे. एकूण १७ जागांपैकी सत्तास्थापनेसाठी किमान ९ जागा जिंकणे आवश्यक होते. परंतु, राष्ट्रवादीला ८ जागा मिळाल्यामुळे सत्तास्थापनेसाठी आता त्यांची मदार सचिन शेळके या अपक्षावर राहणार आहे. अपक्ष सचिन शेळके मूळचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून सचिन शेळके यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करणे सहज शक्य असल्याच्या चर्चा निकालानंतर सुरू होत्या. मात्र, अपक्ष नगरसेवक संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. गुरुवारी त्यांच्या मातोश्री नागीरबाई शेळके यांनी मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद दिल्यानंतर पडद्यामागच्या खऱ्या घडामोडी राजकीय पटलावर उमटल्या. माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने ममास्टर प्लॅनिंगम करून अपक्षाला भुरळ घालून राष्ट्रवादीला खिंडीत पकडले आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षासह सत्ता समीकरणाच्या चाव्या आता आमदार जयकुमार गोरेंनी आपल्या हाती ठेवल्या आहेत. भाजपाने अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली दिसत नाही. अपक्षामया साथीने काँग्रेसने राष्ट्रवादीचा डाव उधळण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपाच्या भूमीकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट