म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत विडी कामगारांना धान्य पुरवठा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना दिले. राज्य सरकार विडी कामगारांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, धान्य मिळणार असल्यामुळे पहिल्या टप्प्यात सुमारे ७० हजार विडी कामगारांना दर रोजच्या पोटापाण्याची सोय झाली असून, आता दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच २५ एप्रिलपासून विडी कारखाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालकमंत्री तथा कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बुधवारी माजी आमदार व कामगार नेते नरसय्या आडम, विडी कामगारचे नेते विष्णू कारमपुरी, नारायण जाधव यांच्यासह विडी कामगार महिलांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सोलापुरातील विडी कारखाने बंद असल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काम नसल्यामुळे व काढलेली कर्जे फेडता येत नसल्यामुळे विडी कामगार आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे सोलापुरातील ७० हजार विडी कामगार व त्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांसाठी म्हणून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी विनंती केली. आडम, कारमपुरी तसेच विडी कामगार महिलांनीही कारखाने सुरू न झाल्यास आमचे जगणे मुश्कील होईल, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले.
अडचणी मोदींच्या कानावर घालणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कामानिमित्त मुंबईत आलेले जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना सोलापुरातील विडी कामगारांसाठी तातडीने अन्नसुरक्षा कायद्याखाली धान्य पुरवठा करण्याचे आदेश दिले. तसेच आपण कोणत्याही परिस्थिती विडी कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे आपण विडी कामगारांची एकूणच परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालून मार्ग काढू असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वीस दिवसांपासून कारखाने बंद
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने विडी वेस्टनावरील ८० टक्के भागात धोक्याचा इशारा तसेच सूचना सचित्र छापण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास कारखानदारांना थेट जेलची हवा खावी लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात देशभरातील दहा राज्यांतील विडी कारखानदारांनी एक एप्रिलपासून बेमुदत बंद पुकारला आहे. कारखाने बंद पडून २० दिवस झाले आहेत. सोलापुरातील सुमारे ७० हजार विडी कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्यामुळे हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता.
विडी कामगारांना एक हजार अॅडव्हान्स?
मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपल्या निवासस्थानी सोलापुरातील विडी कारखानदारांना बोलावून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. कारखाने सुरू करण्याची विनंती केली. कारखाने बंद असल्यामुळे कामगारांचे पोटापाण्याचे हाल होत असून, त्यांना एक हजार रुपये अॅडव्हान्स देण्यास सांगितले. कारखानदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आज पुण्यात होणार बैठक
देशभरात दहा राज्यांमध्ये विडी कारखाने गेल्या वीस दिवसांपासून बंद आहेत. केंद्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. कारखानदारही धोका पत्करण्यास तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र विडी उद्योग संघाची एक बैठक आज (गुरुवार) पुण्यात होणार आहे. बैठकीत विडी कामगारांना अॅडव्हान्स देण्याबरोबरच बंद बाबतही चर्चा होणार आहे.