म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
साखर आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे १५ एप्रिलपर्यंत ८०:२० फॉर्म्युलानुसार दुसऱ्या टप्प्यातील एफआरपी साखर कारखानदारांनी न दिल्यास सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर जप्त करावी, साखर जप्त करण्याचे आदेश देण्यात निष्क्रीयता दाखवल्यास संघटना काय करायचे ते ठरवेल. तरीही कारखानदारांनी एफआरपी न दिल्यास एक मे रोजी सहकारमंत्र्यांना ध्वजारोहण करु न देता जिल्ह्यात फिरणे मुश्कील करु,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात देण्यात आला. कारखानदार आणि संघटनेने घेतलेल्या भूमिकेमुळे एफआरपीच्या मुद्यावरुन पुन्हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
एक एप्रिल रोजी गळीत हंगाम संपलेल्या साखर कारखान्यांनी राज्य ऊसदर नियंत्रण समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उर्वरीत २० टक्के देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या जिल्हा बँकेतील साखर कारखान्याच्या बैठकीत मे महिन्यापासून उर्वरीत एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र रविवारी (ता.३) झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात
कारखानदारांनी उर्वरीत एफआरपी न दिल्यास सहकार मंत्र्यांनाच गर्भित इशारा दिला आहे. केवळ ८०: २० फॉर्म्युलानुसार संघटना दर घेवून गप्प बसणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
हंगामाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये साखर दर कमी झाल्याने ८०:२० टक्क्याचा व्यवहार्य फॉर्म्युला स्वीकारला होता. याच बैठकीत साखर दर प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांच्यावर गेल्यास व्याजही घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सध्या ३५०० ते ३७०० रुपयांपर्यंत साखरेचा दर गेल्याने व्याजाची रक्कमही सोडणार नसल्याचे ठणाकवून सांगण्यात आले आहे. यासाठी प्रसंगी विराट संख्येने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला असल्याने दुसऱ्या हप्त्यातील एफआरपीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना व कारखानदारांमध्ये तीव्र संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट