कोल्हापूर शहराच्या विकासासाठी जनतेने त्यांच्या हातात महापालिका दिली. कारभारी म्हणून ते शहराला विकासाचा चेहरा देत आहेत. पण, अलिकडे वाढलेल्या काही आक्षेपार्ह घटनामुळे महापालिकेत माफियाराज सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सावकारी, गुंडगिरी, मटका, बेटिंग, गैरव्यवहार, ढपला, मारामारी अशा अनेक प्रकरणांत नगरसेवकांची नावे येऊ लागली आहेत. हा प्रकार कोल्हापूर शहराला नक्कीच शोभणारा नाही.
....................................
गुरुबाळ माळी
०००००००००
कार्यकर्त्याचा पिंड आणि चेहरा, प्रामाणिकपणे लोकांसाठी धडपड करणाऱ्याला पूर्वी जनता निवडून द्यायची. मग ती निवडणूक कोणतीही असो. महापालिकेपासून ते जिल्हा परिषदपर्यंत आणि पंचायत समितीच काय साध्या बँका आणि कारखान्याच्या निवडणुकीत अशा चेहऱ्यांना जनता नक्की संधी द्यायची. त्यामुळे या संस्थेला एक चेहरा असायचा. संस्थेत कोण कारभार करतो, कोण सत्ताधारी आहे यावरून त्या संस्थेचा चेहरा कळत असतो. त्या संस्थेचे ते केवळ कारभारी अथवा चालक नसतात, तर विश्वस्त आणि ब्रँड अॅम्बेसिडर असतात. पण, अलिकडे अनेक संस्थात ज्या काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे यामुळे संस्थांचे कौतुक कमी आणि बदनामी जास्त होत आहे. मुळातच चांगल्या संस्थांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहे. शहराच्या दृष्टीने महापालिका ही सर्वांत महत्त्वाची संस्था. शहराच्या विकासाची नाडी या संस्थेच्या अर्थात नगरसेवक आणि प्रशासनाच्या हातात आहे. पण, अलिकडे या संस्थेत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत, वाढत आहे. यामुळे जे चांगले चार चेहरे आहेत, त्यांची चर्चा कमी आणि चांडाळ चौकडीची चर्चा जास्त होत आहे.
गेल्या काही दिवसांत कोल्हापूर अधिकच चर्चेत आली आहे. नगरसेवक आणि त्याच्या भावाने कर्मचाऱ्यास केलेली 'मनसे' मारहाण, शिवीगाळ, आजरा जळित हत्याकांड प्रकरणातील आरोपी अमोल पवारला सावकारीच्या माध्यमातून कर्ज देणारे सावकार नगरसेवक, त्याला लुबाडणारे नगरसेवक, बेटिंगबाबत आरोप झाल्याने वादग्रस्त झालेले सभापती, मटका व्यवसायात असणारे नगरसेवक आणि त्यांचे नातेवाईक, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारात अडकलेले अधिकारी आणि कर्मचारी हा सर्व प्रकार पाहता महापालिकेत नक्की चाललंय तरी काय? अशी विचारणा करण्याची वेळ आली आहे. महापालिकेत निवडून येण्यासाठी किमान पन्नास लाख रूपये खर्च करावे लागतात. हा आकडा कमीतकमी आहे. दीड कोटी खर्चून काहीजण निवडून आले आहेत, तर एवढा खर्चू करुनही काहींना या पदापर्यंत पोहचता आले नाही. एवढा पैसा मिळवताना अनेकजण दोन नंबरचा व्यवसाय पसंत करतात. अशांना निवडून देताना जनतेलाही काही वाटत नाही. कारण त्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य झालेल्या असतात. मात्र याच पैशाच्या जोरावर सध्या जे काही सुरू आहे ते भयानक आहे. यामध्ये सुक्याबरोबर ओलेही जळत आहे.
निवडून येण्यासाठी जो खर्च येतो तो काहीही करून कमवण्यासाठी काहींची धडपड सुरू होते. यातूनच नको तो मार्ग निवडण्याचे धाडस केले जाते. महापालिका निवडणुकीत अनेक पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिली. त्याची पार्श्वभूमी काय आहे यापेक्षा त्याची निवडून येण्याची क्षमता आहे का हे पाहून तिकीट दिले गेले. यामुळे मटकाचालक, गुंड, बेटिंगवाले निवडून आले. बेटिंगच्या गुन्ह्यात यापूर्वी सापडलेले मुरलीधर जाधव आता सभापती आहेत. एका नगरसेविकेचा पती मटका व्यवसायात आहे. अनेक नगरसेवक सावकार आहेत, मात्र तशी त्यांनी परवाना घेतला नाही. काहींच्या घरात सावकार आहेत. हे सारे अनेकांना निवडून येण्यासाठी उपयुक्त ठरतात. जनता आपल्याला निवडून देते, त्यामुळे आता आपण काहीही करायला मोकळे आहोत या अर्विभावात काहीजण वागत आहेत. यामुळे अनेकांची बदनामी होत आहे.
गुंडांसाठी पदाधिकारी स्वस्त
शहरात गुंड, सावकार, मटकाचालकांच्या ज्या वाढदिवसाच्या जाहिराती झळकतात त्यामध्ये नगरसेवकांचे फोटो सर्रास असतात. या गुंडासाठी हे नगरसेवक, पदाधिकारी एवढे स्वस्त का होतात हेच कळत नाही. यामुळे मात्र अशा गुंडांना विनाकरण बळ येते, प्रतिष्ठा मिळते, त्यांच्या अवैधधंद्यांना अभय मिळते. त्यांच्यावर कारवाई करताना पोलिसांचे हात थरथरतात. गुंड म्हणून फार कोणत्या नगरसेवकांची प्रतिमा नक्की नाही. पण अनेक नगरसेवकांच्या भोवती जे गुंड वावरत आहेत त्यामुळे नगरसेवकांच्या प्रतिमेला मात्र धक्का बसत आहे. या गुंडांच्या जिवावरच नगरसेवकही मारामारी करण्यात रस दाखवतात. त्यांच्यावर थेट गुन्हे कमी असले तरी अशा घटनांत त्यांचा सहभाग मात्र भरपूर आहे.
कर्मचाऱ्यांना मारहाणीतही नगरसेवकच
शिवाजी पेठेतील दोन-तीन नगरसेवक कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात माहीर. आज ते नगरसेवक नसले तरी त्यांच्या घरातच हे पद असल्याने त्यांची दादागिरी अजूनही सुरूच आहे. अशा नगरसेवकांच्या विरोधात तक्रार करण्याचे धाडस कर्मचारी संघ कधीच करत नाही. एकाने तर अधिकाऱ्याला खुर्ची फेकून मारली होती. तो तेव्हा नगरसेविकेचा पती होता. त्याचा हा जर रूबाब असेल तर इतरांचे काय? कर्मचाऱ्यांवर दादागिरी करतच बोलणारे नगरसेवक कमी नाहीत. खून, अपहरण अशा प्रकरणातही नगरसेवक अडकले. एका नगरसेवकावर तर राजकारणातून दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे त्याला महासभेत पोलिस बंदोबस्तात यावे लागत होते. आता सावकारी, बेटिंग प्रकरणात त्यांची नावे येत आहेत. यातूनच ठराविक नगरसेवकांच्या 'कर्तृत्वा'मुळे बदनामी मात्र सर्वांचीच होत आहे.
ठराविकच तुपाशी...
बहुसंख्य नगरसेवकांचा भर पैशाच्या कमाईवर राहतो. कारण काही ठराविक नगरसेवक महापालिकेत एवढे कमवतात की सर्वांना वाटते की महापालिका म्हणजे चरण्याचे मोठे कुरण आहे. दोन महिन्यांपूर्वी सर्व नगरसेवकांना निनावी पत्रे आली. त्यामध्ये पाच वर्षांत कोणत्या नगरसेवकाने किती पैसे खाल्ले याची आकडेवारीच मांडण्यात आली होती. हे पत्र पाहता यामागे एखादा नगरसेवकच होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण, यातून एक स्पष्ट झाले की, सर्व नगरसेवक उपाशी राहतात, ठराविक जणच तुपाशी राहतात. याच नगरसेवकांची चर्चा जास्त होते. त्यामुळे या नगरसेवकांची श्रीमंती नजरेत भरते. गणेशोत्सवाची वर्गणी देण्यासही काही नगरसेवकांकडे पैसे नसतात, त्यांची व्यथा बाहेर येत नाही. यामुळे नगरसेवकांचा एकच चेहरा सतत समोर येत असल्याने बदनामी होते ती सर्व नगरसेवकांची. याच नगरसेवकांमुळे महापालिकेचा नको तो चेहरा पुढे येतो. विशेष म्हणजे असे ठराविक नगरसेवक असतानाही तेच सतत चर्चेत येत असल्याने महापालिका गुंडाच्या दावणीला बांधल्याचे चित्र समोर येते.
अधिकारीही लँडलॉर्ड
नगरसेवकाबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रवृत्तीही खाबूगिरीचीच आहे. ते सापडत नाहीत म्हणून त्यांचे हे 'कार्य' अंधारात राहते. अनेक अधिकारी टक्केवारी घेतल्याशिवाय कोणत्याच फाइलवर सही करत नाहीत. मुद्दाम फाइल अडवतात. 'मी नाही त्यातला..,' असा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून तर आज ज्या प्रमाणे अनेक नगरसेवक लँडलॉर्ड आहेत, टीडीआर सम्राट आहेत, त्याप्रमाणे अधिकारीही लँडलॉर्ड आहेत. त्यांच्यामुळेही महापालिकेची बदनामी होत आहे.
सध्या नगरसेवक अथवा नेत्यांना कशाचेच सोयरसुतक राहिले नाही. कुणालाही पदे मिळतात. एकदा मटकावाला महापौर होतेय म्हटल्यावर अनेकांनी विरोध केला. त्याला महापौरच काय साधा नगरसेवक होऊ दिला नाही. एका नगरसेवकाला पदापासून दूर ठेवले. पण, गेल्या दहा वर्षांतील इतिहास तपासला तर किती मटकेवाले पदावर बसले, मटका वसुली करणारेच नव्हे तर दारू दुकानदार, मटका व्यवसायातील भागीदार मोठमोठ्या पदावर विराजमान झाले ते लक्षात येईल. त्यांनी म्हणे शहराला विकासाचा चेहरा दिला. त्यांनी शहराला विकासचा चेहरा दिला की नाही माहित नाही पण त्यांच्या चेहरा बदलण्यात मात्र ते यशस्वी झाले हे नक्की.
शहरात गल्लीबोळात गुंडांचे लोण वाढत आहे. या गुंडांकडे मताचे पॉकेट आहे. त्यामुळे नगरसेवक, नेते त्याच्याशी चांगले संबंध ठेवतात. मग गुंडच व्यासपीठावर रूबाबात मिरवतो. सध्या सावकारीचा आरोप असलेले टोणपे आणि साखरे यांच्या वाढविसाला शहरभर जे फलक लागले होते त्याच्यावर कोणाकोणाचे फोटो होते, हे पाहिल्यावर शहराची प्रगती लक्षात येते. राष्ट्रीय नेत्यांच्या अविर्भावात लागणारे गुंडांचे फोटो आणि त्यावर आमचे नेते, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक म्हणून झळकणारे नगरसेवक यामुळे महापालिकेत काय चालले आहे? याची झलक पहायला मिळते.
जनतेच्या प्रश्नासाठी जीव तोडून भांडणारे नगरसेवक कमी नाहीत. त्यांचा आवाजही मोठा आहे. पण हे चांगले नगरसेवक अनेकदा अंधारात राहतात. बहुतेकवेळी केवळ राजकारणातून नगरसेवकांना बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जातात. सावकारीपासून ते बेटिंगपर्यंच्या प्रकरणात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे काही संबंध नसताना नगरसेवक बदनामीच्या जाळ्यात अडकतात. पण सध्या जे काही घडते आहे ते फारच चिंताजनक आहे, यामुळे महापालिकेचा चेहराच बिघडत चालला आहे.
gurubal.mali@timesgroup.com
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट