म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न नाही. याउलट २१ मुख्याध्यापक पदे आणि ६ पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. लवकरच ती भरण्यासाठी प्रयत्न केले जातील' असे असे राज्याचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी केले. महासैनिक दरबार हॉल येथे जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हा शिक्षण पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील होत्या.
माने म्हणाले, 'शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, त्यांच्याशिवाय विद्यार्थी प्रगत होऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षकांनीच पुढाकार घेऊन शाळा शंभर टक्के प्रगत करणे आवश्यक आहे. पूर्वी खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांना कमी लेखले जायचे. मात्र, शाळांनी वेगवेगळे बदल, उपक्रम राबवित शाळांची गुणवत्ता वाढवत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला आहे. आता सर्व शाळा प्रगत होण्यासाठी शिक्षकांनी प्रतिज्ञा केल्यास १०० टक्के शाळा प्रगत होऊ शकतील. तसेच शिक्षकांच्या प्रश्नाबाबत शिक्षकांना संच मान्यता दिलेली असून, सर्व शिक्षकांना सरल डाटा बेसमध्ये याबाबत महिती मिळू शकते. याचबरोबर शिक्षकांना ४ टक्के तादील अनुदान देण्यात आले आहे.'
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख म्हणाले, 'ज्या व्यक्तीला कसं आणि का जगायचं हे कळले ती व्यक्ती आयुष्यात नेहमी यशस्वी होते. व्यक्तीने केवळ भाव, विचार, कृती आणि वाणी या चार गोष्टी दिल्यास त्याला आयुष्यात खूप काही मिळू शकते.'
यावेळी सभापती अभिजीत तायशेटे, स्मिता गौड यांनी मार्गदर्शन केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगले यांनी प्रास्ताविक केले.सहायक आयुक्त व माजी शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श प्रशासक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गणेश देशपांडे, शाहूवाडीचे सभापती पंडित नलवडे, हिंदुराव चौगुले, सीमा पाटील, ज्योती पाटील, अरुण इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते.
सहा हजार बेंच
इतर विद्यार्थ्यांप्रमाणे तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनाही बेंचची सुविधा मिळावी म्हणून या वर्षी जिल्हा परिषदेला सहा हजार बेंच मंजूर करण्यात आले. त्यापैकी तीन तालुक्यांना दीड हजार बेंच पाठविण्यात आले. ज्या शाळांना बेंचची आवश्यकता आहे, अशाच शाळांना प्राधान्य द्या. नाहीतर बेंच पळविले जाण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचा टोला माने यांनी मारला.
यांना मिळाले शिक्षक पुरस्कार
२०१४ - तानाजी पावले, रेखा पाटील, रमेश कोळी, विलास पाटील, कलाप्पा अभिमनभावी, राजेंद्र भोरे, नंदकुमार जाधव, वर्षा केनवडे, दिलीप खाडे, शिवाजी पाटील, शाहू चौगुले, समीर चौगुले, समीर मुल्लाणी, दिलीप कोळी व विशेष पुरस्कार नंदकुमार वड्ड आणि आनंदा मोगणे यांना देण्यात आला.
२०१५ - शामराव कांबळे, प्रकाश पाटील, रघुनाथ शिंदे, सुहा शिंत्रे, अशोक वसगडे, मारुती लांबोरे, संजय दाभाडे, नारकर नामदेव, शशीकुमार पाटील, राजश्री काळे, नवीद पटेल, चित्रगार चिदंबर तर विशेष पुरस्कार सुनिल देसाई आणि तानाजी रानमाळे यांना देऊन गौरविण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट