'साखरेच्या दरात वाढ झाल्याशिवाय ऊसउत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार नाही. साखरेचे दर वाढले, तर त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका न बसता शेतकऱ्याला न्याय देण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे,' असे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिराळा येथील यशवंत सहकारी दूध उत्पादित प्रक्रिया संघाच्या प्रशासकीय इमारतीची पायाभरणी, कोल्ड स्टोरेज उद्घाटन व मशिनरी बसविणे या कामांचा शुभारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'राज्यात ऊस शेती पिकविणाऱ्या क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या साखर कारखान्याद्वारे ऊसाचे गाळप निर्धारित वेळेत न झाल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे साखर कारखान्यांची संख्या वाढविणे आवश्यक बाब आहे. तथापि, सहकारातील दोन सहकारी साखर कारखान्यामधील अंतराच्या नियमामुळे नवीन कारखाने उभारण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्य पातळीवर दोन सहकारी साखर कारखान्यामधील नियमानुसारचे अंतर कमी करून नवीन सहकारी साखर कारखाने उभारण्याबाबत लवकरच सहकार कायद्यात याबाबतचा बदल करण्यावर राज्याच्या मंत्रिमंडळात निर्णय करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार आहे,' असे आश्वासन पाटील यांनी दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट