कोल्हापूर ते मुंबईपर्यंतच्या प्रवासाचे अंतर नजीकच्या काळात अर्ध्या तासाने कमी होणार आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर बोगदा तयार करण्यात येणार आहे. हा बोगदा तयार झाल्यानंतर या मार्गावरून प्रवास करणे आता वाहनधारकांना सुलभ जाणार आहे. शिवाय पुण्यातील वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहनधारकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक (उपक्रम) बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात याची घोषणा केली.
कोल्हापूरला टोलमुक्त केल्याबद्दल आयोजित विजयोत्सव सोहळ्यात बोलताना मंत्री शिंदे यांनी राज्य सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्पही सांगितले. नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर-मुंबई एक्स्प्रेस वेसारखा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोणावळयापासून नवीन बोगदा तयार करण्यात येणार आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. या कामामुळे पुर्ण पुण्यापर्यंतचा परिसर बायपास होणार आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे या दरम्यानच्या
खंडाळा घाटातील प्रवास कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी कोल्हापूर ते मुंबई हे अंतरही कमी वेळात गाठता येणार आहे. याबरोबरच सहा पदरी रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यामुळेही मुंबईपर्यंतच्या प्रवासाला लागणारा वेळ बराच कमी होणार आहे.
राज्य सरकारची इच्छाशक्ती असेल तर लोकोपयोगी निर्णय होऊ शकतात, मोठ्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाऊ शकते हे युती सरकारने कोल्हापूरला टोलमुक्त करून दाखवून दिले आहे.
जनतेच्या भावना लक्षात घेऊन सरकार कामकाज करत आहे. कोल्हापूरच्या टोलप्रश्नी यापूर्वी काही मंडळी आयआरबी कंपनीची वकिली करत होते. परिणामी कंपनीचे प्रतिनिधी जुमानत नव्हते. टोलमुक्तीसंदर्भात झालेल्या पहिल्याच बैठकीत आयआरबीच्या प्रतिनिधींनी टोल रद्द करता येणार नाही अशी आडमुठी भूमिका घेतली. तेव्हा टोलमुक्तीच्या मार्गात आडवे आल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करू, असा इशारा दिल्यावर कंपनीच्या प्रतिनिधींना घाम फुटला होता याची आठवण करून देत मंत्री शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलमुक्तीचा शब्द दिला होता. त्याची पूर्तता झाली हा माझ्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय असल्याचे नमूद केले. टोलमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी
सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट