February 4, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पोस्ट खात्यात सुरू करण्यात आलेली कोअर बँकिंग सुविधा तांत्रिक दृष्ट्या क्लिष्ट असल्यामुळे कामावर परिणाम होत आहे. एकीकडे अपुरे मनुष्यबळ आणि दुसरीकडे संथगतीने सुरू असलेली कोअर बँकिंग प्रक्रिया याबाबत पोस्ट खात्याने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र सर्कल वर्किंग कमिटीच्या बैठकीत
करण्यात आली. नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल वर्कर्स संघटनेच्या तीन दिवसीय अधिवेशनास कोल्हापुरात गुरुवारी स्टेशन रोडवरील महालक्ष्मी हॉलमध्ये सुरुवात झाली.
यावेळी कर्मचाऱ्यांनी विविध समस्यांबाबत प्रशासनाने कार्यवाही न केल्यास आंदोलनाची दिशा निश्चित करण्याचा निर्णय घेतला. अधिवेशनाला राज्यभरातून संघटनेचे शंभर सभासद सहभागी झाले आहेत.
असोसिएशनचे अध्यक्ष विलास महाडिक यांच्या हस्ते अधिवेशनाचे उदघाटन झाले. यावेळी टी. आर. कुलकर्णी, संघटनेचे सहाय्यक महासचिव निसार मुजावर यांनी पोस्टल कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले. 'भारतीय टपाल खात्याने ग्राहकांच्या सुविधेसाठी कोअर बँकिंग सुविधा दिली आहे.
मात्र यासंदर्भातील सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी असल्यामुळे पोस्टल कामाची प्रक्रिया वेळखाऊ होत आहे' असे मुजावर यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, 'पोस्ट खात्यात सध्या ४० टक्के मनुष्यबळ कमी आहे. भरती प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्यामुळे कामाचा ताण सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर येत आहे. त्यातच अतिशय संथगतीने चालणाऱ्या कोअर बँकिंग तंत्रज्ञानाचा परिणाम कामावर होत आहे. त्यासाठी प्रशासनाने ही प्रक्रिया अधिक वेगवान होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
टी. आर. कुलकर्णी म्हणाले, 'कोअर बँकिंग सॉफ्टवेअरमधील त्रुटींसह अपुरा कर्मचारी वर्ग हीदेखील मोठी समस्या आहे. पोस्टखात्याने ग्राहकांसाठी सुविधा वाढवणे योग्य आहे.
मात्र त्यासाठी अद्याप चाळीस टक्के कर्मचाऱ्यांची गरज आहे. संपूर्ण राज्यात पोस्टल कर्मचाऱ्यांच्या १२०० जागा रिक्त आहेत, तर पोस्टमनच्या ९०० जागांवर अद्याप नोकरभरती झालेली नाही. काळासोबत पोस्टखाते बदलत असले तरी नव्या तांत्रिक सुधारणांच्या सक्तीमध्ये कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा पडत आहे. याबाबत टपाल खात्याने सुधारणा कराव्यात.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
February 4, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक केली नसल्यास १८ फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या बारावीला परीक्षेला सहकार्य केले जाणार नसल्याचा इशारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने दिला आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ८ फेब्रुवारी पासून १० फेब्रुवारी पर्यंत दररोज दुपारी साडेबारा वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बारावी परीक्षेच्या आदल्या दिवशी पुणे आयुक्त कार्यालयसमोर एक दिवसाचे उपोषण केले जाणार आहे. राज्य सरकारला राज्य संघाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित २५ मागण्यांचे निवेदन दिले आहे. मात्र राज्य सरकारने सोयीस्करपणे आतापर्यंत दुर्लंक्ष केले आहे. येत्या पंधरा दिवसांत सरकारने ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी. अन्यथा बारावीच्या परीक्षेला असहकार्य केले जाणार आहे. ८ फेब्रुवारीला संघटनेच्या नेतृत्वाखाली रिक्त पदावरील भरती झालेले शिक्षक आंदोलन करतील. मान्यता होऊनही वेतन नसलेले शिक्षक ९ फेब्रुवारीला आंदोलन करतील. वैयक्तिक मान्यता नसलेले, अर्धवेळ आणि सीएचबीचे शिक्षक आंदोलन करतील. ही माहिती अध्यक्ष एस. बी. उमाटे, नूतन कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर, सचिव प्रा. ए. डी. चौगुले यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 4, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या आवारातच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. विकास नामदेव दाभाडे (वय २९,रा. वडणगे, ता. करवीर) असे या तरुणाचे नाव आहे. साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे खळबळ उडाली. दाभाडेवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रश्नी त्याच्या पत्नीविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
विकास दाभाडे सेंट्रिंग कर्मचारी आहे. आठ वर्षांपूर्वी सदर बाजार परिसरातील राणी या तरुणीशी त्याचा विवाह झाला. पत्नी राणी व तीन मुलासमवेत तो वडणगेत रहातो. वाद झाल्यामुळे महिनाभर त्याची पत्नी सदर बाजारात माहेरी राहत होती. ती सातत्याने पैशाची मागणी करत असे. यापूर्वी तिने करवीर पोलिस ठाणे व शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. बुधवारी दुपारपासून तिने विकासकडे पैशासाठी तगादा लावला होता. त्याबदल्यात विकासने राणीकडे तिन्ही मुलांची मागणी केली. हा वाद शाहूपुरी पोलिस ठाण्यात आला. या दोघांतील वाद नातलगांनी मिटवण्याचा रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केला. गुरूवारी सकाळी अकरा वाजता राणी पुन्हा पतीविरूद्ध तक्रार देण्यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यात आली. यावेळी विकासने पोलिस ठाण्याच्या दारात विष प्याले. तो रस्त्यावर कोसळला. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागल्यावर नागरिकांनी शाहूपुरी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी विकासला ताबडतोब सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 4, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
अंबाबाई मंदिर देवस्थानतर्फे प्रसादाच्या लाडूसंदर्भात नव्याने निविदा काढण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या सिद्धार्थ मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेकडे लाडू पुरवठा करण्याचा ठेका आहे. त्यांच्याकडून दर्जाहिन व क्षमतेपेक्षा अपुरा लाडूपुरवठा होत असल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याचे देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे यांनी सांगितले. आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
१५ ऑक्टोबर २०१६पासून सिद्धार्थ मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेकडे लाडू पुरवठा करण्याचा ठेका होता. मात्र गेल्या साडेतीन महिन्यांत लाडूच्या दर्जाबाबत आणि पुरवठ्याबाबत भाविकांच्या तक्रारी वाढल्या. नियमानुसार दीड महिन्यांनी ठेकेदाराला देवस्थानमार्फत नोटीस देण्यात आली, मात्र त्यानंतरही सुधारणा न दिसल्याने नव्याने निविदा काढण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 4, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे परिवहन मंत्र्यांनी हेल्मेट वापरण्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितल्याने कॉलेज युवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मात्र सध्या वाहनांच्या संख्येतील वाढीबरोबरच पार्श्वभूमीवर प्रत्येकाला सुरक्षेचे महत्व
समजत आहे. त्यामुळे कडक अंमलबजावणी नसतानाही स्वतःची सुरक्षा राखण्यासाठी हेल्मेट वापरणारे मात्र रस्त्यावर दिसू लागले आहेत. सुरक्षेचे महत्व लक्षात आल्यानंतर अनेकांनी आपोआपच हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले.
सुप्रीम कोर्टाने हेल्मेट वापरण्याचे आदेश दिल्यानंतर विविध ठिकाणी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. २००४-२००५ साली शहरात सुरू करण्यात आलेल्या या अंमलबजावणीवेळी मोठा विरोध झाला होता. तत्कालिन महापौर नंदकुमार वळंजु यांच्या नेतृत्वाखाली हेल्मेट सक्तीच्याविरोधात रॅली काढली होती. त्यामुळे येथे फारशी अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यानंतर दहा वर्षे झाली आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. यामुळे पुन्हा ही अंमलबजावणी कशी करणार, त्याबाबत कोणती यंत्रणा आघाडीवर असणार याची चर्चा शहरवासियांमध्ये सुरू झाली आहे.
तशीच यंत्रणेने जर अंमलबजावणी सुरू केली तर हेल्मेटला किती खर्च येणार, इतर त्रास न होणारे हेल्मेट कोणते याची चाचपणीही सुरू केली आहे.
यापूर्वी हेल्मेट वापरण्यासाठी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सक्ती केली जात होती. त्यामुळे जनतेतून एकप्रकारची उलट प्रतिक्रिया येत होती. त्याला कालावधी गेल्यानंतर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांमध्ये होणारी वाढ पाहता आपोआपच सुरक्षेचे उपाय अनेकांनी अवलंबण्यास सुरुवात केली. अनेक कंपनींनी आपल्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट आवश्यकच केले आहे. तर दुचाकीवरुन दररोज मोठा प्रवास करणाऱ्यांनी हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली आहे. मोठा प्रवास करणारे तर वापरतातच पण शहरातही अनेकजण दक्षता म्हणून हेल्मेट वापरत आहेत. त्यामध्ये युवा पिढीही आघाडीवर आहे. शहरातील रस्त्यांवर नजर टाकली तर हेल्मेट वापरणारे अनेक दुचाकीस्वार दिसून येतात. तसेच तरुणाईनेही नवनव्या फॅशनेबल पण हेल्मेटचा वापर करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसते.
'विशाल बोभाटे या युवकाचे तर कुठेही दुचाकीवरुन जात असाल तर हेल्मेट वापरणे आवश्यकच आहे' असे मत मांडले. 'अनेकांचा हेल्मेटवरून गैरसमज आहे. पण सध्या दहा हजार रुपयांच्या मोबाइलची स्क्रिन खराब होऊ नये म्हणून कव्हर घालत असाल तर मौल्यवान जीवन सुरक्षित बनवण्यासाठी हेल्मेट का वापरु नये?' असा सवालही त्याने उपस्थित केला आहे. नियम आहे म्हणून नव्हे तर सुरक्षेसाठी अत्यावश्यक म्हणून हेल्मेट वापरण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले. त्याच विचाराचा आदित्य सरनाईकही याबाबत सक्तीपेक्षा ज्यावेळी स्वतःला सुरक्षेचे महत्व समजते, त्यावेळी हेल्मेट आपोआपच वापरतात, असे समजतो. पण सुरक्षेसाठी सक्ती ही करायला हवीच असेही सांगतो.
शहरापेक्षा महामार्गावर मोठ्या वेगाने वाहने चालवली जातात. त्यावेळी तिथे दुचाकी चालवणाऱ्यांसाठी हेल्मेटची सक्ती केलीच पाहिजे. पण शहरात त्याची आवश्यकता वाटत नाही.
- नंदकुमार वळंजू, माजी महापौर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
February 4, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'पुरोगामी दलाल आणि ब्रोकर आहेत. पुरोगाम्यांकडूनच वैचारिक दहशतवाद पसरविला जात आहे. भोंदू पुरोगामी बेगडी आणि बनावट आहेत. त्यांच्याविरोधात लढा देण्यासाठी हिंदूनो संघटित व्हा', असे आवाहन हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर यांनी केले. राजारामपुरी येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ९ च्या मैदानावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या हिंदू जनजागृती सभेत ते बोलत होते.
'हे कोल्हापूर शिवरायांचे आहे, पानसरेंचे नाही' अशी टीका करून संजीव पुनाळेकर म्हणाले, 'पुरोगाम्यांकडून बुद्धिभेद केला जात आहे. ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे आणि डॉ. एम. एम. कुलबुर्गी यांचे उदात्तीकरण सुरू आहे. पानसरेंनी अनेकादा निवडणुका लढवल्या, मात्र ते कधीही जिंकले नाहीत. दाभोलकरांच्या ट्रस्टलाही परदेशातून पैसा आला. त्याची कधीही चौकशी झाली नाही. त्यांच्याविरोधात समितीने १८ प्रकरणे दाखल केली. दाभोलकरांचा अनेक गैरव्यवहारांत हात होता. बाराशे ढोंगी पकडून दिल्याचे दाभोलकर कुटुंबिय सांगतात. प्रत्यक्षात एकाही ढोंगी साधूचे नाव कुटुंब सांगत नाही. त्यांच्या कुटुंबियांकडून नावे सांगितले जात नाहीत. त्यामुळे दाभोलकर कुटुंबियच ढोंगी असल्याचा संशय निर्माण होतो. दाभोलकरांची हत्या त्यांच्याच निकटवर्तींच्यांकडून झाल्याचा संशय निर्माण होत आहे.'
संजीवन पुनाळेकर म्हणाले, 'श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर दलाली करणारे आहेत. सनातनच्या विरोधात कोम्बिंग ऑपरेशन करण्याची भाषा करणाऱ्या पाटणकरांनी कोल्हापूर ही त्यांची जहागिरी नाही, हे लक्षात ठेवावे. पाटणकर पाणी सोडण्यासाठी दादागिरी करतात. त्यांनी स्वःताचे खिसे भरण्याचे काम अधिक केले. पाटणकरांनी कधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या घरावर मोर्चे काढले नाहीत. शमशुद्दीन मुश्रीफ यांनीही 'हू किल्ड करकरे' हे बोगस पुस्तक लिहले आहे. ते बहुजन समाजाला प्यादे म्हणून वापरतात. पुरोगाम्यांनी संत तुकारामांच्या पंगतीला दाभोलकरांना बसविले आहे. त्यांची तुलना साँक्रेटिससोबत करा, मात्र तुकारामांची हत्या झाली असा खोटा इतिहास सांगू नका. अन्यथा समितीला 'रावण ते दाभोलकर व्हाया अफलजखान' असे पथनाट्य सादर करावे लागेल.'
'पुरोगाम्यांचा आतंकवाद आणि हिंदूची मुस्कटदाबी' या विषयावर बोलताना स्वाती खाड्ये म्हणाल्या, 'पानसरे, कुलबुर्गी आणि दाभोलकर यांनी हिंदू धर्म बुडविण्याचे काम केले. तपासात त्यांच्या नातेवाईकांची भूमिका संशयास्पद आहे. २५ लाख रुपये घेऊन सनातनचे नाव घ्या, अशी मागणी करणाऱ्याला जनतेसमोर आणा. काही क्षणात या खटल्याचा निकाल जनता लावेल. अंनिसचे श्याम मानवही संमोहन शास्त्राचा खोटा प्रचार करीत आहेत. काँग्रेसने शीखांच्या दंगली घडविल्या. अंनिसचे आणि नक्षलवाद्यांचे संबध असल्याचे स्पष्ट झाले. सनातन संस्था आतंकवादी असल्याचा बिनबुडाचा आरोप केला जात आहे.'
समितीचे राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले, 'सध्या खोटा इतिहास शिकविला जात आहे. मात्र तरीही २०२३मध्ये हिंदू राष्ट्र स्थापन केले जाईल. त्याची सुरुवात कोल्हापूरच्या हिंदू जनजागृती सभेतून झाली आहे.'
यावेळी समीर गायकवाड प्रकरणात सनातला सहकार्य करणारे वकील अॅड. एम. एस. सुहासे, समीर पटवर्धन, आनंद देशपांडे यांचा सत्कार झाला. शिवसेनेचे उपशहरप्रमुख रघुनाथ टिपुगडे यांच्या हस्ते मान्यवरांचा तलवार देऊन स्वागत करण्यात आले. आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, समितीचे मधुकर नाझरे आदी उपस्थित होते. राजन बुणगे यांनी समितीची माहिती दिली.
दाभोलकर हत्येमागे कोकण कनेक्शन?
'पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वेंगर्ला आणि कोकणात सुमारे ३ हजार एकर जमीन आहे. त्यातील काही जमिनी मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाला देण्यात आल्या. काही मोक्यांचे जागांचे वाटपही करण्यात आले. हिंदू जनजागृती समितीने जमिनीचा गैरव्यवहार बाहेर काढला. त्यावेळी वाद निर्माण झाले. यादरम्यानच नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येपाठीमागे कोकणचे कनेक्शन असू शकते', असे पुनाळेकर यांनी वक्तव्य केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 4, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
मैत्रिणीचा मोबाईल चोरणाऱ्याला पकडण्यासाठी विमा एजंट असल्याचे भासवून दोन तरुणींनी अलहदी शमशुद्दीन खान (वय ३३, रा. तुळजाभवानी कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) या मोबाइल चोरट्याला पोलिसांच्या मदतीने पकडले. पोलिसांनी खान याच्याकडून ३७ हजार ५०० रुपयांचे आठ मोबाइल जप्त केले. रुपाली दिलीप भिवटे (३०, रा. शनिवार पेठ) आणि रेश्मा बोंगाळे अशी या मैत्रिणींची नावे आहेत.
कपिलतीर्थ मार्केट येथे दिलीप वसंत मस्के यांचे कपड्यांचे दुकान आहे. मस्के स्वतः फॅशन डिझाइनचे प्रशिक्षण देतात. मस्के यांच्या दुकानात रुपाली भिवटे फॅशन डिझाइनचे शिक्षण घेतात. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास संशयीत अलहदी खान त्या दुकानात आला. माझ्या पत्नीला ड्रेस शिवायचा आहे, असे सांगून त्याने रुपालीला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यावेळी त्याने काऊंटर व शोरुममधील दोन मोबाइल चोरले. मोबाइल चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर रुपाली हिने रेश्मा बोंगाळे या मैत्रिणीला फोन करून मोबाइल चोरीला गेल्याचे सांगितले. त्या मोबाइलवर कॉल करून विमा एजंट बोलत असल्याचे सांगण्यास तिने रेश्माला सांगितले. रेश्मा बोंगाळेने ठरल्यानुसार रुपालीच्या मोबाइल क्रमांकावर कॉल केला. अलहदी खान याने कॉल उचलल्यावर 'मी विमा एजंट आहे. तुमचे पैसे द्यावयाचे आहेत' असे रेश्माने अलहदी खान याला सांगितले. खान याने रेश्माला विम्याच्या पैशांसाठी शिवाजी चौकातील अंबिका जनरल स्टोअर्सजवळ येण्यास सांगितले. त्यानंतर रुपाली व दिलीप मस्के यांनी जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांसमवेत रुपाली भिवटे, दिलीप मस्के, रेश्मा बोंगाळे शिवाजी चौकात गेले. त्यांना अंबिका स्टोअर्स परिसरात घुटमळणारा संशयित दिसला. पोलिसांनी संशयित अलहदीला झडप घालून पकडले. त्यांच्याकडे रुपाली व मस्के यांच्या दोन मोबाइलसह आणखी सहा मोबाईल मिळाले. खान रेकॉडवरील चोरटा आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 4, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रस्ते विकास महामंडळाकडून यापुढे नव्याने राबवण्यात येणाऱ्या बीओटी प्रकल्पांमधील टोलमधून छोट्या वाहनांना टोलमधून वगळले जाणार आहे. त्यामध्ये एलएमव्ही (लाइट मोटर व्हेइकल), राज्य परिवहन मंडळाच्या बस, स्कूल बस यांचा समावेश आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कोल्हापूरच्या टोलमुक्तीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आतापर्यंत राज्य सरकारने ७४ टोल बंद केले. आता केवळ एक्सप्रेस हायवेवरील पाच व मुंबईतील प्रवेशाचे पाच अशा शिल्लक दहा टोल नाक्यांच्या पर्यायाबाबत सरकार विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या टोलमुक्तीनंतर सरकारने बीओटी प्रकल्पांबाबत स्वीकारलेल्या धोरणांबाबत पाटील म्हणाले, 'यापुढे सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाच्यावतीने बीओटी प्रकल्पाचा आराखडा तयार केला जाईल. त्यात लहान वाहनांना (एलएमव्ही) टोल नसेल. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च व उद्योजकाला मिळणारे उत्पन्न यात जो फरक येईल, तो सरकार देईल. आतापर्यंत सरकारने ५३ टोल नाक्यांवर लहान वाहनांना टोलची सवलत दिली आहे. २१ नाके बंद केले आहेत. या प्रकारे ७४ नाके बंद केले आहेत. राज्याच्या अखत्यारितील एक्सप्रेस हायवे व मुंबई प्रवेशाचे असे १० नाक्यांवरील टोल बंद करण्याबाबत समिती नेमली होती. समितीचा अहवाल आला असून यात सूचवलेल्या पर्यायांवर सरकार विचार करत असून सकारात्मक निर्णय होईल.'
कोल्हापूर टोलमधील नुकसानभरपाईबाबत कंपनी दावा करु शकते का यावर ते म्हणाले, 'प्रकल्पाची सरकारकडून देण्यात येणारी पूर्ण रक्कम आयआरबीने मान्य केली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पात नुकसान झाले म्हणून नुकसानभरपाईचा दावा ते करु शकत नाहीत, पण टोल आंदोलनावेळी नाक्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत दावा करु शकतात.' कोल्हापूर ते सांगली चौपदरीकरण रखडले आहे. त्यासाठी भूसंपादनाची अडचण असल्याचे सांगत पाटील म्हणाले, 'या प्रकल्पातही लहान वाहनांना टोलमधून वगळले आहे. राज्यात टोलमधून सवलत दिलेल्या वाहनांची वर्षभराची ५३ कोटीच्या आसपासची रक्कम सरकार भरत आहे. त्याप्रमाणे या प्रकल्पातील रक्कमही सरकारकडून भरली जाईल. हे काम लवकर संपवण्यासाठी नुकतीच बैठक घेतली आहे. त्यामुळे रखडलेल्या कामाला वेग येईल.'
याप्रसंगी महेश जाधव, संदीप देसाई, विजय सुर्यवंशी, संभाजी जाधव, अशोक देसाई आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 4, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
नाशिक जिल्ह्यात झालेल्या कोट्यवधींच्या धान्य घोटाळ्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी कोल्हापुरातील गणपती रोलर फ्लोअर मिलचे मालक अश्विन सुरेश जैन आणि व्यवस्थापक प्रकाश माधवराव शेवाळे यांना अटक केली आहे. धान्य घोटाळ्यातील दोन हजार चारशे टन धान्य जैन यांनी खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांना विशेष मोक्का कोर्टाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली. जैन यांच्या अटकेने नाशिकमधील धान्य घोटाळ्याचे कोल्हापूर कनेक्शन समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वीच कोट्यवधींचा धान्य घोटाळा उघडकीस आला होता.
जैन आणि शेवाळे यांनी धान्य घोटाळ्यातील सुमारे २३ लाख ७८ हजार किलोपेक्षा अधिक धान्य खरेदी केल्याचा आरोप आहे. या व्यवहारात सुमारे सव्वातीन कोटी रुपयांचे धनादेश मुख्य सूत्रधार आणि फरारी संशयित आरोपी जितूभाई ठक्कर याच्या बनावट कंपन्यांच्या नावे दिले आहेत. साईबाबा अॅग्रो, ग्रीनफिल्ड, शिवशक्ती आदी कंपन्यांच्या नावे हे धनादेश वटविले आहेत. पोलिसांनी जैन व शेवाळे यांना अनेकदा चौकशीसाठी बोलाविले, मात्र त्यांनी पोलिसांची दिशाभूल केली होती.
जैन व शेवाळे यांच्या वकिलांनी विशेष मोक्का कोर्टात बाजू मांडताना धान्य खरेदी केल्याचे रितसर धनादेश दिले आहेत. ते कोणत्या ठिकाणी द्यावे याच्याशी संबंधितांचा कोणताही संबंध नाही. आत्तापर्यंत त्यांचा संशयितांत समावेश नसताना, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केल्याचे कोर्टाला सांगण्यात आले. मात्र मोक्काअंतर्गत दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामिनाची तरतूदच नसल्याचे सरकारी पक्षाने निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी संशयितांना सात दिवसांची कोठडी सुनावली. या प्रकरणात नाशिक येथील घोरपडे बंधूंसह तेराजणांची संशयित म्हणून नावे आहेत. संपत घोरपडे, विश्वास घोरपडे व अरुण घोरपडे सध्या न्यायालयीन कोठडीत असून, घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधारासह एक महिला फरार आहे.
दरम्यान, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता नाशिक पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अधिक तपासात शहरातील आणखी काही व्यापाऱ्यांची नावे पुढे येणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. नाशिक पोलिसांच्या कारवाईने शहरातील व्यापारी वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
February 4, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी थेट पाइपलाइन योजनेच्या प्रस्तावाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता मिळालीनंतर अन्य कुठल्याही परवानगी आवश्यकता नसल्याचे सांगूनही वन विभाग आणि वन्य जीव विभागाने दाद दिलेली नाही. या दोन्ही विभागांनी महापालिकेचे मान्यतेचे प्रस्ताव रखडवले आहेत. १६०० मीटर लांबीची पाइपलाइन, धरण्याच्या बाजूचे जॅकवेल, पंपींग स्टेशन ही महत्त्वाच्या कामांना त्यामुळे मुहूर्त लागलेला नाही.
गेल्या सोळा महिन्यांत योजनेच्या ६५ ऐवजी फक्त ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जानेवारी २०१६ अखेर तीस टक्के काम रखडले आहे. त्यामुळे उर्वरीत अकरा महिन्यांत तब्बल ६५ टक्के काम पूर्ण करण्यासाठी महापालिका आणि ठेकेदार कंपनीला युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे. कोल्हापूर शहराला थेट पाणी देणाऱ्या योजनेतील ५२ किलोमीटर लांबीच्या मार्गाला अद्यापही पूर्ण मान्यता मिळाली नाही. त्यात प्रमुख्याने वन विभागाकडून धरणाच्या उजव्या बाजूला बांधण्यात येणाऱ्या जॅकवेल, पंपिंग स्टेशन आणि १६०० मीटर लांबीच्या पाइपलाइन कामासाठी अजूनही मान्यता मिळाली नाही. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने ४ नोव्हेंबर २०१५ रोजी महापालिकेचा प्रस्ताव मान्य केला.
दरम्यान, महापालिकेने केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांच्या बैठकीतील आदेशाची प्रत जोडून राज्याच्या वनविभागाकडे परवानगी मागितली. मात्र अजूनही प्रस्ताव मान्य करण्यात आला नाही. महापालिका आणि जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतील करारानुसार २७ महिन्यांत योजना पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र ती शक्यता कमी आहे.
केंद्र सरकारच्या यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत पाइपलाइनसाठी ४२५.४१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. योजनेच्या प्रारंभी केंद्र सरकार ८० टक्के तर राज्य सरकार व महापालिका प्रत्येकी दहा टक्के निधी उपलब्ध करणार आहे. पहिल्या टप्प्यात केंद्राने १७० कोटी तर राज्य सरकारने २१ कोटी रुपये दिले आहेत. आता केंद्र सरकारने या योजनेत बदल करून ८० टक्केऐवजी साठ टक्के निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात लेखी आदेश मिळाले नसली तर केंद्राने धोरणात्मक निर्णय घेतल्यास त्याचा महापालिकेला आर्थिक फटका बसणार आहे. केंद्राकडून अजून १७० कोटी रुपये मिळायचे होते. मात्र केंद्राने साठ टक्क्याचा निर्णय घेतल्यास १७० कोटी केवळ ८४ कोटी रुपये मिळतील. यामुळे महापालिकेला आणखी ४२ कोटी रुपयांची उभारणी करावी लागणार आहे. योजनेची वाढीव ६३ कोटी, नव्या निर्णयानुसार ४२ कोटी आणि पूर्वीचा दहा टक्के निधी अंतर्गत ४२ कोटी असे १४७ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 4, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महापालिकेच्या स्थायी, परिवहन समितीत काठावरचे बहुमत असलेल्या सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीने धक्का देण्यासाठी फिल्डींग लावली आहे. महापौर आणि स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीत नामुष्की पत्काराव्या लागलेल्या भाजप आघाडीने स्थायी, परिवहनसह बागल मार्केट आणि ताराराणी मार्केट प्रभाग समिती चेअरमनपद निवडणुकीत सेनेला सोबत घेऊन चमत्कार घडविण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंद पाकिटातून कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय दिला आहे. हे पाकीट शुक्रवारी सभागृहातच उघडले जाईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता निवडीच्या प्रक्रियेला सुरूवात होईल. दोन्ही आघाड्यांनी सदस्यांना व्हीप लागू केला आहे. स्थायी समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे मुरलीधर जाधव आणि ताराराणी आघाडीचे सत्यजित कदम, रुपाराणी निकम असे तीन उमेदवार शर्यतीत आहेत. प्रत्यक्ष निवडी दरम्यान रूपाराणी निकम या माघार घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडे आठ तर भाजप ताराराणी आघाडीचे सात सदस्य आहेत. 'स्थायी' त सेनेचा एकमेव सदस्य असून त्यावर निकाल अवलंबून आहे. दुसरीकडे भाजप, ताराराणी आघाडीने सेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी फिल्डींग लावली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 5, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
करवीर तहसील कार्यालयात उमेदवारी करणाऱ्यावर कार्यालयासमोरच खुरप्याने सपासप वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. रमाकांत आनंदराव आयरेकर (वय ४१, रा. लक्ष्मी कॉलनी, शिंगणापूर रोड, चंबुखडी) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. बिगर शेत जमिनीच्या कागदपत्रास विलंब होत असल्याच्या कारणांवरून संशयित मनोहर मुळे (रा. निगवे दुमाला, ता. करवीर) यांनी हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. कार्यालयासमोरच हा प्रकार झाल्याने उपस्थित कर्मचारीही हादरून गेले.
आयरेकर गेली वीस वर्षे तहसील कार्यालयात उमेदवार आहेत. त्यांच्याकडे जमिनीच्या नोंदणीचे काम दिले आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता कार्यालयीन कामकाज संपवून ते घरी जाण्याची तयारी करत होते. कार्यालयात बाहेर आल्यावर त्यांनी सहकाऱ्यासमवेत कार्यालयाबाहेर चहा घेतला. यावेळी मुळे हे मित्रासोबत मोटारसायकलवरून आले. त्यांनी जमिनीच्या कागदपत्रासंबंधी आयरेकरांकडे विचारणा केली. कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कारण आयरेकर यांनी सांगितल्यानंतर मुळे व आयरेकर यांच्यात वाद झाला. त्यानंतर आयरेकर पार्क केलेली मोटारसायकल काढत असताना मुळे यांनी मागून त्यांच्यावर खुरप्याचे वार केले. आयरेकर प्रतिकार करत तहसील कार्यालयात पळत गेले. यावेळी मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती. जखमी अवस्थेतील आयरेकर यांचे कपडे रक्तांनी भिजले होते. हा प्रकार पाहून तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. आयरेकर यांच्या पाठीवर, कमरेवर व हातावर सात वार झाले आहेत. रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 5, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर सांगली चौपदरी रस्त्यावर लहान वाहनांना टोलमधून वगळल्याचे सांगताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या रस्त्यावर इतर वाहनांना टोल लागणारच हे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. जवळपास चार वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम अद्याप अपूर्ण आहे. या वर्षभरात तरी हे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. तरीही कंत्राटदाराकडून मात्र टोल नाक्याच्या उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे आगामी काळात हा प्रकल्प टोल आंदोलनाचे केंद्र राहण्याची शक्यता आहे.
बांधकाम मंत्री पाटील यांनी या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात कामाची परिस्थिती पाहिल्यास हा प्रकल्प पूर्ण होण्यास वर्षभर अवधी लागेल, असे दिसते. कामाची ही गती असल्याने टोलचा मुद्दा शांत होता. पाटील यांनी लहान वाहनांना टोलमधून वगळण्यात आल्याचे सांगितले पण इतर वाहनांना टोल लागेल, असेच सूचित केले. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टोलविरोधातील भूमिका मांडली आहे. जयसिंगपूर परिसराला आंदोलन नवीन नाही. संघटनेकडून तीव्र आंदोलने झाली आहेत. कोल्हापुरातील टोलबाबत वातावरण तापलेले असताना सांगली रस्त्यावरील काम पूर्ण होण्याआधी टोल नाक्यांच्या उभारणीसाठीचे काम सुरू करणे हे आंदोलनाला निमंत्रण देण्यासारखेच आहे. लहान वाहने (एलएमव्ही), स्कूल बस, एसटी बस यांना टोलमधून सवलत देण्यात येणार आहे, पण मालवाहक छोटा हत्तीपासून साऱ्यांना टोल असेल असे मंत्र्यांनी सांगताना माल वाहतुकीतील मग ऊस वाहतूक करणारीही वाहनेही त्यात येतील हे स्पष्ट केले आहे. ऊस आंदोलनामुळे संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयसिंगपूर परिसरात भविष्यात टोल आंदोलनाची धग कायम राहण्याची चिन्हे आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
February 5, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
नवी मुंबईत सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी सरकारने शिक्षकांना मंजूर केलेली 'विशेष नैमित्तिक रजा' उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली. ही रजा 'किरकोळ रजा' म्हणून गृहित धरण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले.
यापर्वी सिंधुदुर्गला २०१० मधील अधिवेशनावेळीही उच्च न्यायालयाने विशेष नैमित्तिक रजा रद्द केली होती. यंदा सरकारने ही रजा मंजूर केली. त्याविरोधात पैठणमधील शिक्षक ज्ञानेश्वर कपटी यांनी याचिका दाखल केली होती. या आदेशावर प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विशेष नैमित्तिक रजा रद्द करणे हा शिक्षकांवर अन्याय आहे इथपासून ते अधिवेशन पाच-सहा दिवसांऐवजी दोन दिवसांचे असावे, अशी मते नेत्यांनी व्यक्त केली. अधिवेशन कायमस्वरुपी बंद करण्याची भाषा कोणीही करू नये. त्याला विरोध करू, असा इशाराही शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी दिला.
नैमित्तिक रजा कधी मिळते?
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती नियम १९६४ नुसार फक्त आजारी असताना अथवा खेळाडूला क्रीडा स्पर्धांच्या काळातच विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. २००८ मधील प्राथमिक शिक्षण संघाच्या अधिवेशनावेळीही याचिका दाखल होती. त्यावेळी सुनावणीत अधिवेशन काळातील रजा ऑन ड्यूटी म्हणून देता येणार नाही. तो सरकारचा धोरणात्मक निर्णय नाही असे उच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २००८च्या आदेशात म्हटले होते.
शैक्षणिक धोरणांचा भाग
राज्यस्तरीय अधिवेशनाच्य नावाखाली कोणीही शिक्षक सहलीसाठी जात नाही. शैक्षणिक धोरणांचा भाग म्हणून राज्याच्या प्रत्येक ठिकाणी अधिवेशने भरविली जातात. त्यातून भौगौलिक परिस्थितीची ओळख होते. त्याचा अध्यापनाला चांगला फायदा होतो. सरकारने खास बाब म्हणून विशेष नैमित्तिक रजा देण्याची गरज आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी करता येणे शक्य आहे.
भरत रसाळे, राज्याध्यक्ष, राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती
अधिवेशनाचा कालावधी घटवा
प्राथमिक शिक्षकांना वर्षांची किरकोळ रजा १२ दिवसांची मिळते. त्यातच सहा दिवसांची रजा किरकोळ म्हणून गृहित धरल्यास त्याचा तोटा शिक्षकांना होईल. सरकार प्राथमिक शिक्षकांकडून अनेक कामे करून घेते. त्यामुळे फक्त अधिवेशनांचा कालावधी कमी करण्याची गरज आहे. अधिवेशन दोन दिवसांचे करता येईल. अधिवेशनाच्या नावाखाली मिनी ट्रीप काढणाऱ्यांना योग्य शिक्षा आवश्यक आहे. शाळा बंद करून आणि अध्यापनाचे तीन तेरा वाजवून कोणतेही अधिवेशन यशस्वी होऊ शकत नाही.
प्रभाकर आरडे, राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया फेडरेशन इलिमेंटरी टीचर्स
अधिवनेशनावर कायमची बंदी नको
न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. अधिवेशनाच्या नावाखाली काही शैक्षणिक संघटना मोठा निधी जमवतात. काही निधीचा गैरवापर करतात. संघटनेसाठी निधी लागतो. पण पाच-सहा दिवसांचे अधिवेशन हा गैरवापर आहे. शिक्षकांनी दिवसभर अधिवेशनाला उपस्थित राहणे आवश्यक आहे. खासगी वाहनांतून अधिवेशनाला गेलेल्या शिक्षकांनी परतीच्या मार्गावरील प्रेक्षणीय स्थळे पाहणे गैर नाही. अधिवेशनात शिक्षण क्षेत्राबाबत धोरणात्मक निर्णय होत असल्याने अधिवेशनावर कायमची बंदी आणण्याचा विचार नको. अन्यथा त्याला विरोध होईल.
राजेंद्र कोरे, विभागीय अध्यक्ष ,राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ,
नैमित्तीक रजा हवीच
विशेष नैमित्तिक रजांची अत्यावश्यक आहे. काही संघटनांचे अधिवेशन त्रैवार्षिक असते. तीन वर्षातून एकदा पाच-सहा दिवस नैमित्तिक रजेला काहीच हरकत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची टीका होते. मात्र, शाळेचे कामकाज व्यवस्थित चालण्याची दक्षता घेतली जाते. विद्यार्थ्यांचा राहिलेला अभ्यास जादा तास घेऊन पूर्ण केला जातो. अधिवेशनाला जाण्यापूर्वी किंवा अधिवेशनानंतर अभ्यास विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेतला जातो.
राजाराम वरुटे, राज्याध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ
मग कामाला कशाला जुंपता...?
नैमित्तिक रजा बंदीचा निर्णय म्हणजे शिक्षकांवर गडांतर आहे. राज्य सरकार प्राथमिक शिक्षकांकडून विविध प्रकाराची काम करवून घेते. त्याला शिक्षक विरोध करत नाहीत. मग नैमित्तिक रजेला काहीच हरकत नसावी. अधिवेशनाचा अधिकार सर्वांना आहे. त्याला राज्यातून शिक्षक येतात. प्रत्येक शाळेतून एक प्रतिनिधी येतो. त्यामुळे शाळा बंद करून कोणी अधिवेशनाला जात नाही. अध्यापन खोळंबत नाही. या निर्णयाचा फेरविचार करावा.
कृष्णात कारंडे, जिल्हा नेते, राज्य प्राथमिक शिक्षक समिती
अधिवेशन हा कामाचा भाग
अधिवेशनांना राज्य सरकारच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले जाते. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, पुढील दहा वर्षांचे शैक्षणिक धोरण, ठरावांवर चर्चा होते. अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षकांचे प्रश्न सरकारकडे मांडले जातात. काही मंत्री मागण्यांबाबत तातडीने घोषणाही करतात. त्याचा फायदा शिक्षकांना होतो. अध्यापनाच्या कामातून काही वेळा शिक्षकांना वेळ मिळत नाही. विशेष नैमित्तिक रजेमुळे शिक्षकांवरील दडपणही कमी होते. ही रजा कायम ठेवावी.
पी. एस. घाटगे, शहराध्यक्ष प्राथमिक शिक्षक सेवक समिती
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 5, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महापालिकेच्या स्थायी, परिवहन आणि महिला बालकल्याण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादीने बाजी मारली. सर्वाधिक चुरशीच्या स्थायी सभापती निवडीत राष्ट्रवादीच्या मुरलीधर जाधव यांनी भाजप, ताराराणी आघाडीच्या रुपाराणी निकम यांच्यावर आठ विरूद्ध सात मतांनी विजय मिळवला. 'स्थायी'च्या निवडीत किंगमेकर होण्याची संधी लाभलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा निवड प्रक्रियेपासून अलिप्त राहत सत्तारूढ काँग्रेस आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर केला. परिवहन सभापती निवडणुकीत काँग्रेसच्या लाला भोसले यांनी भाजप आघाडीच्या विजय खाडे यांच्यावर तर महिला बालकल्याण सभापतिपदासाठी काँग्रेसच्या वृषाली कदम यांनी भाजपच्या गीता गुरव यांच्यावर विजय मिळवला.
'स्थायी' सभापतीसाठी गेले दोन दिवस प्रचंड उलाढाली झाल्या. शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी सत्तारूढ काँग्रेस आघाडी आणि विरोधी भाजप आघाडीच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यापर्यंत फिल्डींग लावली. काँग्रेसच्या नेत्यांनी तर 'मातोश्री'पर्यंत धाव घेतली. काँग्रेसमधील नाराज घटकांची शेवटच्या घटकापर्यंत मनधरणी सुरू होती. यात आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांना मध्यस्ती करावी लागली. जनता बझारपासून पाइपलाइन योजनेपर्यंतचे उट्टे काढण्यात आले. गुरूवारी रात्री शिवसेनेचे सदस्य निवड प्रक्रियेला उपस्थिती दर्शविणार नाहीत याचा निर्णय झाला आणि सत्ताधाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
शिवसेनेची अलिप्त राहण्याची भूमिका रात्रीच स्पष्ट झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. 'स्थायी'ची लढाई जिंकल्याच्या आत्मविश्वासाने काँग्रेस, राष्ट्रवादीचे कारभारी व सदस्य शुक्रवारी महापालिकेत दाखल झाले. तर सेनेला सोबत घेऊन स्थायी, परिवहन आणि प्रभाग समिती सभापती निवडीत चमत्कार घडविण्याच्या तयारीत असलेल्या भाजप, ताराराणी आघाडीच्या आशेवर पाणी फिरले. सेनेच्या भूमिकेमुळे निकाल काय लागणार हे स्पष्ट झाल्याने स्थायी आणि परिवहनच्या निवडीची केवळ औपचारिकता उरली होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 5, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
हृदय जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो असे म्हटले जाते. याच उक्तीचा प्रत्यय शुक्रवारी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कल्चर क्लब सदस्यांना आला. विविध भाज्या आणि फळांची कलात्मक सजावट करून आकर्षकपणे सॅलड मेंकिंग करून कुटुंबातील सदस्यांना कसे तृप्त करायचे याच्या टिप्स मिळाल्या. विविध कुकरी शोमध्ये तसेच मोठ्या हॉटेल्सच्या डायनिंगवर पहायला मिळणारी प्रोटीनयुक्त सॅलड बनवण्याचे प्रात्यक्षिक देणाऱ्या सॅलड मेकिंग कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
'महाराष्ट्र टाइम्स'ने 'कल्चर क्लब' च्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली. ताराबाई पार्कमधील क्रिस्टल प्लाझा येथील हॉटेल कूकशॅक येथे कार्यशाळा झाली. मटा कल्चर क्लबच्या माध्यमातून सदस्य, वाचकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. विविध हॉटेल्समध्ये अनेक प्रकारचे सॅलड चाखायला मिळतात. कुकरी शोमध्येही सॅलडची विविधता दिसते. मात्र, अशा प्रकारची सॅलड तयार करताना प्रत्यक्ष पाहण्याची संधी 'महाराष्ट्र टाइम्स' ने उपलब्ध करुन दिली.
सेसर सॅलड, स्प्राउट सॅलड, वॉल्टरोब सॅलड, रशियन सॅलड, डाएट सॅलड अशा पाच प्रकारची सॅलड तयार करण्याचे प्रशिक्षण कार्यशाळेत देण्यात आले. या उपक्रमात व्हेन्यू पार्टनर असलेल्या 'हॉटेल कूकशॅक'मध्ये सॅलड प्रत्यक्ष तयार करताना पाहण्याची संधी मटा वाचकांना मिळाली.
जसराज खेबूडकर यांनी केसर सॅलडपासून प्रात्यक्षिकांना सुरुवात केली. प्रत्येक सॅलडमधील पदार्थांचे प्रमाण, मिक्श्चर यांची माहिती देत असताना महिलांच्या शंकांचेही निरसन केले. सॅलडमधील पौष्टिक मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी काय करता येईल, याच्या टिप्सही देण्यात आल्या. मोड आलेल्या कडधान्यांचा सॅलडच्या माध्यमातून आहारात समावेश कसा चविष्ट आणि आकर्षकपणे करता येऊ शकतो याची खेबूडकर यांनी सविस्तर माहिती दिली.
सध्या वजन कमी करणे, वाढवणे यासोबत मधुमेह, बीपी अशा आजारात पथ्य पाळावी लागतात. अशावेळी डाएट सॅलड असलेला आहार कसा तयार करावा याबाबत खास प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सीझननुसार भाज्या आणि फळे खावीत असे आहारशास्त्र सांगते. त्याची माहिती सॅलडच्या रूपातून देण्यात आली.
सॅलड हा आरोग्यदायी आहारात महत्त्वाचा भाग आहे. सध्या हेल्थ खूप जपली जात आहे. हॉटेलमधील या डिश घरी बनवणेही सोपे आहे हे यामधून महिलांना कळाले. मटाने हा कार्यक्रम आयोजित करून मनोरंजन आणि माहिती यांची नाळ जोडली आहे.
मंदार भुरके, संचालक कूकशॅक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 5, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) करवीर शाखेतर्फे ५ मार्चला राष्ट्रीय आयुर्वेद परिषद होत आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनात ही परिषद होत असून अप्लाइड पंचकर्म असा विषय आहे. परिषदेत राज्यभरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग आहे' अशी माहिती संयोजक सचिव डॉ. ऋषिकेश जाधव, अध्यक्ष डॉ. सचिन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. ऋषिकेश जाधव म्हणाले, 'निमा ही संघटना ७० वर्ष मिश्रवैद्यक व्यावसायिकांच्या न्याय आणि कायदेशीर हक्कासाठी लढा देणारी संघटना आहे. गेल्या काही वर्षात आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सा पद्धतीला चांगला प्रतिसाद आहे. पंचकर्म विषयावर सर्वांगीण चर्चेसाठी परिषद होत आहे. दुबई येथील ग्लोबल युनियन ऑफ आयंटिस्ट्स फॉर पीसचे कार्यकारी संचालक डॉ. जे. एस. कुमार यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता परिषदेचे उदघाटन होईल. परिषदेच्या दोन सत्रात आयुर्वेदाचे पदव्युत्तर विद्यार्थी, डॉक्टर्स, संशोधन पेपर सादर करतील. यामध्ये डॉ. अचला कुलकर्णी (कर्नाटक), अष्टवैद्य रवी मूस (केरळ), डॉ. संजय छाजेड (मुंबई), वैद्य आनंद ओक (सातारा), वैद्य सुनील पाटील (कोल्हापूर) आदी मार्गदर्शन करणार आहेत.'
आयुर्वेदाचा प्रसार वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. इच्छुकांनी परिषदेच्या नावनोंदणीसाठी आयुर्वेद पंचकर्म सेंटर, सत्यवादी प्रेस शेजारी, लक्ष्मीपुरी येथे संपर्क साधावा. नाव नोंदणीची अंतिम मुदत २५ फेब्रुवारी आहे असे सांगितले.
पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष डॉ. अभिजित मुळीक, कोषाध्यक्ष डॉ. आदित्य काशीद, विभागीय सचिव डॉ. यशपाल हुलस्वार उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
February 5, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज माघारीसाठी १७ फेब्रुवारीपर्यंत मुदत असून २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यात दिवशी मतमोजणी होईल. संस्थेच्या १५ जागांसाठी ५० अर्ज दाखल आहेत.
शिवाजी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी १९६९ मध्ये पतसंस्थेची स्थापना केली. स्थापनेपासूनच पतसंस्था राजकारणविरहीत आहे. सर्वंच सभासद पगारदार असल्याने वसुली पथकाची गरज आजअखेर भासलेली नाही. संचालक होण्यासाठी अनेक सभासद यंदाही इच्छुक आहेत. वर्ग तीन आणि वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांची संख्या निवडणूकीसाठी या वर्षीही कायम आहे. पतसंस्थेचे भाग भांडवल १ कोटी रुपये आहे. २५ कोटींच्या ठेवी असून वर्षाला सुमारे ७२ कोटींची उलाढाल आहे. संस्थेचे ६३० सभासद सहभागी आहेत. त्यापैकी ५५१ जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वसाधारण गटासाठी १०, महिला प्रतिनिधींसाठी २, अनुसूचित जाती-जमाती गटासाठी १, भटक्या विमुक्त जाती-जमाती गटासाठी १, इतर मागास वर्गासाठी १ अशा एकूण १५ जागा आहेत. अनिल कोळी हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 5, 2016, 1:30 pm
म. टा. वृत्तसेवा, चंदगड
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आधारित येळ्ळूरसह सीमाभागातील वास्तव मांडणारा मराठी टायगर्स चित्रपट शुक्रवारी शिनोळी (ता. चंदगड) येथे प्रदर्शित झाला. स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारूनही शिवसेना व सीमाबांधवांच्या पाठबळावर चित्रपट प्रदर्शित झाला. दुपारी दिड वाजाता चित्रपटाचे प्रदर्शन झाले. यावेळी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. आमदार संध्यादेवी कुपेकर, शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, बंडू केरवाडकर, संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, करमणूक अधिकारी विजय भारते, जिल्हाप्रमुख विजय देवणे उपस्थित होते.
शिनोळीत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे महिलांनी औक्षण केले. नागरिक भगवे फेटे घालून मिरवणुकीत सहभागी झालेे. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चित्रपटाला कर्नाटकात मनाई केली होती. शिनोळीतही प्रदर्शन थांबविण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. मात्र सीमावासियांच्या भावना लक्षात घेवून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली.
शिनोळी ग्रामपंचायतीने चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी सहकार्य केले. काल चंदगडचे तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांनी टुरींग टॅकीजल परवानगी नाकारली होती. मात्र पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देण्यास भाग पाडले. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पत्रकार परिषदेत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, 'कर्नाटक सरकारने आजवर मराठी बांधवांची मुस्कटदाबी केली आहे. कर्नाटकात चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही. इथे जनरेटा उपयोगी पडला. वाद मिटवा अशी भूमिका चित्रपटात मांडली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या दुसऱ्या लढ्याची ठिणगी आज पडली आहे.'
महाराष्ट्र एकिकरण समितीचे खानापूरचे आम. अरविंद पाटील म्हणाले, 'कर्नाटक सरकारने गेली साठ वर्षे मराठी बांधवांवर अत्याचार केला आहे. हे वास्तव चित्रपटातून दाखविले आहे.' शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचेही भाषण झाले. यावेळी सरपंच नम्रता पाटील, सचिन गोरुले, नायब तहसीलदार आर. टी. झाजरी, तलाठी विजय कांबळे, संजय सरोळकर उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 5, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महापालिकेतील औत्सुक्याच्या ठरलेल्या प्रभाग समितींमध्ये तीन प्रभाग समित्यांमध्ये सत्तारुढ गटाचे वर्चस्व राहिले. ताराराणी मार्केट प्रभाग समिती सभापतिपदासाठी सत्तारूढ आणि विरोधी भाजप आघाडीचे संख्याबळ समान झाल्याने चिठ्ठीद्वारे निकाल काढण्यात आला. यामध्ये ताराराणी आघाडीच्या राजसिंह शेळके यांना लॉटरी लागली. तर गांधी मैदान, शिवाजी मार्केट आणि बागल मार्केट येथे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत असल्याने सभापतिपदाच्या निवडणुकीची औपचारिकताच होती. गांधी मैदान प्रभाग समिती सभापतिपदी काँग्रेसच्या प्रतिक्षा पाटील, शिवाजी मार्केट समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे, बागल मार्केटच्या सभापतिपदी काँग्रेसच्या छाया पोवार यांनी बाजी मारली. यासाठी हात उंचावून मतदान झाले.
गांधी मैदानसाठी काँग्रेसच्या प्रतिक्षा पाटील आणि भाजप आघाडीचे राजू दिंडोर्ले यांच्यात लढत झाली. पाटील यांना १३ तर दिंडार्ले यांना ७ मते मिळाली. पाटील साळोखेनगर प्रभागातील नगरसेविका आहेत. शिवाजी मार्केटसाठी राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे आणि ताराराणी आघाडीच्या सुनंदा मोहिते यांच्यात लढत झाली. पिरजादे यांना ११ तर मोहिते यांना आठ मते मिळाली. पिरजादे सिद्धार्थनगर प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात. बागल मार्केट प्रभाग समितीत २० सदस्य आहेत. येथे सभापतिपदासाठी भाजपच्या भाग्यश्री शेटके आणि काँग्रेसच्या छाया पोवार यांच्यात लढत झाली.
पोवार यांना दोन्ही काँग्रेसचे मिळून १० तर शेटके यांना भाजप, ताराराणी आघाडीची ८ मते मिळाली. पोवार प्रतिभानगरातून निवडून आल्या आहेत. निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश सुभेदार, आयुक्त पी. शिवशंकर, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧